Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अगस्त 24, 2021 in जीवन प्रकाश

आता ते तुम्हाला समजण्याची गरज नाही

आता ते तुम्हाला समजण्याची गरज नाही

जॉन ब्लूम

क्रुसावर जाण्याच्या आदल्या रात्री येशूने बरेच महत्त्वाचे आणि खोल असे काही सांगितले. पण त्यातले एक विधान आपल्या डोळ्याखालून सहज निसटू शकते – कारण ज्या संदर्भात त्याने ते म्हटले त्यामुळे. तरी जे त्याच्या मागे जात आहेत त्या आपल्यासाठी वैयक्तिक रित्या त्यामध्ये खूप अर्थ मिळतो.

“मी करतो ते तुला आता कळत नाही; ते तुला पुढे कळेल” (योहान १३:७).

ह्या एका वाक्यात ख्रिस्ती या नात्याने आपल्या अनुभवात नेहमी येणारे एक खोल सत्य येशूने काबीज केले आहे: देव काय करत आहे (किंवा करत नाही) व ते का करत आहे  हे न समजणे. येथे येशूने काय म्हटले याचा व्यापक परिणाम आपण समजून घेणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण जर आपण तो समजू तर जेव्हा आपला हा उत्तम मेंढपाळ आपल्याला इतक्या गोंधळाच्या आणि दु:खाच्या मार्गाने का नेत आहे असा विचार करत असण्याच्या वेळी त्यामुळे आपल्याला खूप मदत होईल.

देव आता काय करत आहे हे आपल्याला हे बहुधा आपल्याला समजत नाही. आणि महत्त्वाचे सत्य हे आहे की त्याच्या मागे विश्वासाने जाण्यासाठी तो आता काय करत आहे हे समजण्याची आपल्याला गरज नाही.

तुम्हाला आता समजत नाही

शेवटच्या भोजनाच्या वेळी येशूने एक विचित्र गोष्ट केली. त्याने त्याची बाह्यवस्त्रे बाजूला काढून ठेवली, रुमाल घेऊन कमरेभोवती बांधला, पाण्याचे घंगाळ घेतले आणि प्रत्येक शिष्याचे पाय धुण्यास पुढे सरसावला. कदाचित यामुळे आपल्याला शिष्यांसारखा धक्का बसत नसेल कारण त्या भागातल्या आणि त्या काळच्या  सांस्कृतिक रीतीभाती आपल्यासाठी अगदी लांबच्या आणि परक्या आहेत. पण शिष्यांना हे फारच विचित्र वाटले. ते विसंगत आणि अयोग्य वाटत होते.

पेत्राला तर तसे नक्कीच वाटले. त्याच्या सर्व जीवनात त्याला समजले होते की, दुसर्‍या कुणाचे पाय धुणे हे एखाद्याने करण्याचे अगदी नीच काम होते – हे काम फक्त गुलामांनी करण्याचे होते. जर ते नसतील तर लहान मुले करत. प्रतिष्ठित परुषाने हे काम करणे तर लज्जास्पद होते. यामुळे जगातील सर्वात सन्मान्य व्यक्ती – येशू एका सामान्य दासाच्या रूपात स्वत:ला नम्र करतो स्वत:च्या पवित्र हाताने त्याच्या पायाला लागलेली घाण धुतो हे पाहून त्याला राग आला. हे अगदी उरफाटे होते! त्यापेक्षा पेत्राने स्वत:च्या गुडघ्यावर जाऊन त्याच्या गुरुचे पाय धुणे बरे होते.

जेव्हा येशू पेत्राजवळ आला तेव्हा या प्रामाणिक शिष्याने आपले पाय मागे घेतले आणि विचारले, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” (योहान  १३:६). येशूने दयाळूपणे पेत्राकडे पाहिले आणि म्हटले,  “मी करतो ते तुला आता कळत नाही; ते तुला पुढे कळेल.” (१३:७)

आणि इथे ते आहे: प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या विश्वासाच्या जीवनासाठी आवश्यक असे भारदस्त तत्त्व, जे शास्त्रलेखात आरंभापासून शेवटपर्यंत मुख्य विषय असे गुंफले गेले आहे. ते इथे त्या गोंधळलेल्या शिष्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून एका साध्या उत्तरात दिले आहे.

थोडेसे समजण्याचा वारसा

येशू जे करत आहे ते का करत आहे हे त्या क्षणी पेत्राला समजत नव्हते. त्यामुळे तो एका मोठ्या जमावाचा भाग झाला. उद्धाराची हकीगत अशा प्रकारच्या अनेक संतांच्या गोष्टीमागून गोष्टी सांगते जे स्वत:ला अशा गोंधळलेल्या परिस्थितीत पाहतात आणि त्यांना पुढे हे समजेल या आशेने देवावर भरवसा ठेवणे भाग पडते. विचार करा:

  • अब्राहामाला इसहाकासाठी इतकी वर्षे वाट पाहिल्यावर या मुलाचे अर्पण कर अशी सूचना दिली जाते (उत्पत्ती २२).
  • याकोब एसावाला भेटण्याच्या आदल्या रात्रीच देवाशी झोंबी करतो व त्याची जांध उखळल्याने त्याला लंगडत जावे लागले (उत्पत्ती ३२).
  • योसेफ विचार करत होता की त्याचे तरुणपण त्या मिसरी तुरुंगात वाया जात असताना देव काय करत आहे? (उत्पत्ती ३७-४१).
  • मोशेला समजत नव्हते की इस्राएलाना मिसरातून बाहेर काढण्यासाठी देवाने त्याला का निवडले असावे (निर्गम ३,४).
  • गिदोनाला पेलवत नव्हते इतके मोठे कार्य दिले गेले (शास्ते ७).
  • यहोशाफाटाला सूचना दिली गेली की एवढ्या मोठ्या समूहाने आलेल्या शत्रूविरुद्ध त्याने त्याच्या लष्कराच्या आघाडीला गायनवृंद पाठवावा.
  • नहेम्याला अनावश्यक शत्रूंना, अडथळ्यांना, कमतरतांना तोंड द्यावे लागले ज्यामुळे यरूशलेमाचे  कोट  बांधण्याचे काम रेंगाळू लागले.
  • येशूच्या पहिल्या काही वर्षात योसेफाला आकस्मिक, गोंधळून टाकणाऱ्या मार्गांतून जावे लागले (मत्तय १,२).
  • आपले अर्धे आयुष्य सरेपर्यंत जन्मान्धाला समजले नव्हते की त्याच्या दु:खामध्ये देवाचा काय हेतू असावा (योहान ९).
  • आणि मार्था आणि मरीया त्यांच्या दु:खातही गोंधळात होत्या की येशू लाझारसाला बरा करण्यास का आला नाही (योहान ११).

अर्थातच हा छोटा नमुना आहे. देव आता काय करत आहे हे आता समजत नाही (आणि ते नंतर समजण्यासाठी वाट पाहावी लागते). लहान मोठ्या प्रमाणात, प्रत्येक काळात  प्रत्येक संताचा हा अनुभव असत आला आहे.

यातले ‘नंतर’ याचा अर्थ पेत्राने अनुभवले तसे प्रभूभोजनानंतर  काही तासांनतर असेल किंवा त्याचा सोबतीचा शिष्य याकोब ज्याला वधापासून वाचवले गेले नाही त्याच्यासारखा येणाऱ्या युगातच समजेल (प्रेषित १२:१,२). हा

आपल्यासाठी आवश्यक, नम्र करणारा भाग आहे जो आपल्याला “डोळ्यांनी दिसते तसे नाही तर विश्वासाने चालणे”                           म्हणजे काय हे शिकवतो (२ करिंथ ५:७).

तुम्ही माझ्यावर भरवसा टाकलाच पाहिजे

आता न समजण्यात समाधानी असणे आपल्याला सहज जमत नाही. पेत्राला तर ते नक्कीच समजले नव्हते. येशूच्या उत्तराने तो गोंधळून गेला. आणि धीर हा त्याच्या स्वभावातच नसल्याने नंतर ते समजेपर्यंत थांबण्याची त्याची इच्छाच नव्हती. म्हणून त्याने जाहीर केले, “तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाहीत” (योहान १३:८).

मला असे वाटते की पेत्राला प्रभूचा सरळ अपमान करायला नको होता. त्याने जरी हे चांगल्या हेतूने केले तरी तो विचार चुकीचा होता. अशा प्रतिसादाने पेत्र जे न करण्याचा प्रयत्न करत होता त्यासाठीच दोषी ठरला: येशूचा अपमान. कारण येशूला पाय धुवू न देण्याने  पेत्र येशूचा अधिक अपमान करत नव्हता तर येशू जे म्हणत होता त्यावर  विश्वास न ठेवण्याने. हा मुद्दा आपण लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्याला देवापेक्षा जास्त कळते असे वाटते तेव्हा आपण कधी नव्हे इतक्या धोकादायक भूमीवर असतो.

येशू पेत्राचा योग्य हेतू पूर्ण जाणून होता. पण पेत्राचा चुकीच्या विचाराचा धोका, स्वत:च्या ज्ञानावर पूर्ण भरवसा ठेवण्याची आत्मविश्वासाची प्रवृत्ती सुद्धा तो पूर्ण जाणून होता. यामुळेच येशूचा प्रतिसाद गंभीर होता. त्याने पेत्राला मुळापासून हादरून टाकले. “मी जर तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही” (योहान १३:८). माझ्याबरोबर वाटा नाही. यावर भरवसा न टाकणे म्हणजे बाहेर काढले जाणे. पेत्राला तो मुद्दा लागलीच समजला आणि पश्चात्तापाने तो उद्गारला, “प्रभूजी, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा” (योहान १३:९).

आणि येशूचा मुद्दा काय होता? पेत्रा तू माझ्यावर भरवसा ठेवायलाच पाहिजे. नीतिसूत्रे ३:५- “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस” या प्राचीन नीतिवचनानुसार तू जगायला हवे.  तू फांदी म्हणून या द्राक्षवेलात राहून फलदायी होण्याचा एकच मार्ग म्हणजे जर माझ्या वचनावर तू विश्वास ठेवलास तरच (योहान १५:१-५,७). जर माझ्यावर भरवसा टाकण्यापूर्वी आताच समजले पाहिजे असा तुझा आग्रहच असेल तर तू तोडून टाकला जाशील, आध्यात्मिक रीतीने वाळून आणि मरून जाणाऱ्या फांदीसारखा होशील. (योहान १५:६).

आताच  समजण्याची तुला गरज नाही

येशूच्या मागे जाताना आपल्याला घोटाळ्यात टाकणारे अनेक अनुभव या पाय धुण्याच्या अनुभवापेक्षा वेदनामय आणि गोंधळात टाकणारे असतात. पेत्राला आपली सहानुभूती वाटली असती. त्याचे अनेक घोटाळ्यात टाकणारे अनुभव फारच वेदनामय आणि गोंधळाचे होते. या भोजनानंतरच्या  छोट्याश्या संवादानंतर काही तासातच पेत्रावर कसा उद्ध्वस्त होण्याचा अनुभव येणार होता याचा विचार करा. काही वेळा कमी तणावात मिळणारे धडे मोठा दिलासा देऊन जातात आणि मोठ्या तणावाच्या प्रसंगी आपल्याला स्थिर होण्यास मदत करतात.

सरळ सत्य हे आहे की, आता देव काय करत आहे हे बहुधा आपल्याला समजत नसते. आणि महत्त्वाचे सत्य हे आहे की, देवामागे विश्वासाने जाण्यासाठी तो आता काय करत आहे समजण्याची आपल्याला गरज नाही. त्याचे हेतू आपल्यापासून दडवण्यामध्ये देवाचा काही हेतू असतो. कित्येकदा पेत्राप्रमाणे याचा सबंध त्याच्या वेळाशी असतो. आणि काही वेळा देवाचे मार्ग आणि कल्पना आपल्यापेक्षा फार उंच (यशया ५५:८-९) असल्याने असतो. आपण जे ज्ञान पेलू शकणार नाही ते आपल्यापासून दूर ठेवणे ही देवाची दया होय.

देवाचे हेतू आताच समजण्याची गरज आपल्याला नाही. आपण त्याच्या हेतूसाठी आता त्याच्यावर भरवसा टाकण्याची गरज आहे. आपल्या समजण्यामुळे नाही तर आपल्या त्याच्यावरील भरवशाद्वारे देव आपल्या घोटाळ्याच्या मार्गात आपल्याला मार्गदर्शन करील (नीति. ३:६). आणि नंतर जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा – जवळच्या अथवा लांबच्या भविष्यात – आपल्याला लागणारे ज्ञान तो देईल.