Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जुलाई 26, 2022 in जीवन प्रकाश

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

 संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक १

बायबलमध्ये इतिहासाचे चार भाग असून त्यातील तीन भाग बायबलच्या कथानकात इतिहासाने अनुभवले आहेत. निर्मिती, पतन आणि तारण. चौथा पुनरुध्दाराचा भाग अजून पूर्ण व्हायचा आहे. त्यात अधर्माचा पराजय व देवाचे या पृथ्वीवरील राज्य यांचा समावेश आहे. हाच तर बायबलचा प्रमुख उद्देश आहे.

बायबलमध्ये १/३ भाग भाकिते आहेत. हा उद्देश ख्रिस्ती व्यक्तीस आशादायी व उत्तेजनदायी आहे. मरणातून पुनरुत्थान याविषयी शिक्षण दिल्यावर पौल म्हणतो, “म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा व प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा” (१ करिन्थ १५:५८). योहान म्हणतो, “प्रियजनहो,आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झाले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. कारण जसा तो आहे तसा तो आपल्याला दिसेल. जो कोणी यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणास शुद्ध करतो (१ योहान ३: १,२). ख्रिस्ती व्यक्ती यामुळे आनंदित होते की एक दिवस सर्व क्लेश संपणार आहेत. मरण पराजित होणार आहे (१ करिन्थ १४; ५४-५५). आपल्या मृत प्रियजनांची भेट होणार (१ थेस्स. ४:१७). आम्ही प्रभूला प्रत्यक्ष पाहणार (प्रगटी. २२: ३-४) 

तरी हे कथानक येथेच संपत नाही. तर शेवटच्या काळी ज्यांनी येशूवर तारणासाठी विश्वास ठेवला नाही, त्यांना इशारा देत आहे की न्याय येत आहे, येशूवर विश्वास ठेवा व येणार्‍या क्रोधापासून पळा (१ थेस्स ५:२-३; लूक ३:७). येशूने तयार केलेल्या तारणाच्या योजनेचा जे धिक्कार करतील ते सर्व येणार्‍या गौरवी राज्यापासून व देवाच्या सानिध्यापासून वंचित राहतील (२ थेस्स. १:९). म्हणूनच देव भावी काळी विश्वाच्या इतिहासात काय करणार आहे ते पाहणे गरजेचे आहे. कारण हे सर्व भावी काळी प्रत्यक्ष घडणार आहे. बरेच काही धोक्यात असल्याची बाब त्यात प्रकर्षाने दिसते. शेवटचा काल हा पुनरुद्धाराचा अंतिम सिद्धान्त आहे. म्हणून येशूचे पुनरागमन, महासंकटचा काळ, मृतांचे पुनरुत्थान, न्याय व देवाचे राज्य या घटनाकडे पाहणे महत्त्वाचे आहे.       

  सार्वभौम देवाचे या सर्व घटनांवर आरंभापासून शेवटपर्यंत थेट नियंत्रण आहे. हा सर्वज्ञ देव आपण काय करत आहो हे जाणून आहे. ते सर्व तो अंमलात आणणार. सत्य व न्यायत्व विजयी होणार. अधर्माचा नाश होणार. देव स्वतः तसा दावा करतो. यशया ४६: ९,१०  मध्ये तो म्हणतो, “मीच देव आहे. दुसरा कोणी देव नव्हे. मजसमान कोणीच नाही. मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्‍या गोष्टी घडवण्यापूर्वीच त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धिस जाईल. माझा मनोरथ मी पूर्ण करीन.”

भावी घटनांचे दोन स्तर आहेत. (अ) वैयक्तिक पातळी (ब) वैश्विक पातळी                      

(अ) वैयक्तिक पातळी – मानवाच्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकणारे विषय यात येतात. मानवाचे मरण, मधली अवस्था, पुनरुत्थान, न्याय व त्याचे सार्वकालिक वास्तव्य. त्यातून मनुष्याच्या भावी जीवनाविषयीच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.

(ब) वैश्विक पातळी – शेवटच्या काळाविषयीचे बायबलचे  करार, लोकांतरण, महासंकटचा काळ, येशूचे द्वितियागमन, त्याचे हजार वर्षांचे या पृथ्वीवरील राज्य, नंतर अनंतकालचे वास्तव्य हे तपशील त्यात आढळतात. देव आपली संपूर्ण निर्मिती म्हणजे स्वर्ग व पृथ्वीला कसे हाताळतो याविषयीची ओळख यात करून दिली आहे.

बायबलच्या कथानकाचे आरंभ, मध्य व कळस असे तीन टप्पे आहेत. आरंभी देवाने अद्भुत विश्व निर्मिले. सैतानाच्या फसवेगिरीने देवाविरुद्ध झालेल्या पापामुळे त्याला एक काळोखी वळण मिळाले आणि जगात पाप व मरण ही आली. आता देव त्याची योजना आपली अभिवचने व करार, तारणारा व राजा येशूख्रिस्त याच्याद्वारे अंमलात आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे त्याच्या करारानुसार (उत्पत्ती १२:१-३) काही शतकानंतर हा तारणारा राजा आपल्या स्वकीयांकडे आला पण त्यांनी त्याला धिक्कारले (योहान १:११). त्याने हिंसक असे बदलीचे मरण सोसले. सर्वोच्च देवाशी मानवाचा समेट घडवून आणण्यासाठी ही मूलभूत गोष्ट आहे (कलसै १:१०). मग हा राजा स्वर्गात गेला आणि त्याने विश्वासीयांवर पवित्र आत्मा पाठवला. तेव्हापासून  मंडळी बांधणीचे काम चालू आहे. भावी काळात आपला क्रोध ओतून स्वत: प्रत्यक्ष पृथ्वीवर उतरण्याच्या तयारीत तो आहे (प्रकटी १९:११). त्याच्या संतांना पुनरुत्थित करून, त्यांना प्रतिफळ देऊन त्यांच्यासह तो या पृथ्वीवर हजार वर्षे राज्य करील (प्रकटी २०:४). त्या यशस्वी राज्यानंतर सैतान व त्याच्या लोकांचा न्याय करून त्यांना तो अग्नीसरोवरात टाकील (प्रकटी २०:११-१५). त्यानंतर परिपूर्णतेचे नवे आकाश व नव्या पृथ्वीवर सार्वकालिक जीवन सुरू होईल.

प्रश्नावली

सूचना:- वरील विवेचन वाचून त्यावरून खालील प्रश्नावली सोडवा. आवश्यक तेथे उत्तरासाठी संदर्भ दिले आहेत.                                               

प्रश्न १ ला – पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.                                                   

  • जगाच्या इतिहासाचे चार टप्पे कोणते?
  • पुनरुद्धारात कोणत्या दोन गोष्टींचा समावेश आहे?

पुनरुत्थानाच्या शिकवणींनंतर पौल १ करिंथ १५:५८ मध्ये ख्रिस्ती व्यक्तिला काय उद्दीष्ट ठरवून देऊन कोणता बोध करीत आहे ?                                                    

३.  आपल्याला १ योहान ३:१-२ नुसार कोणती आशा आहे? त्यासाठी आपण काय खबरदारी बाळगायची
      आहे?  यशया ४६:९-१० मध्ये देव स्वत:विषयी कोणते दावे करतो?                    

४. “माझा संकल्प सिद्धीस जाईल. माझा मनोरथ मी पूर्ण करीन.” ह्या देवाच्या दाव्याची पुराव्यादाखल एखादी
     घटना सांगा. (उत्पत्ति १५:१३-१४; ५०:२०)                                   

५. भावी घटनांचे दोन स्तर कोणते? प्रत्येक पातळीवरील घटनांची यादी लिहा.

प्रश्न ३रा- खालील वर्णनापुढे कंसातील योग्य संदर्भ लिहा.                                          
(१ थेस्स. ५:२-३; प्रकटी. २२:३-४; १ थेस्स. १:८-१०; १ करिंथ. १५:५५; १ थेस्स.४:१७)                            

  • एक दिवस सर्व क्लेश संपणार, मरण पराजित होणार. ——————-                            
  •  आम्ही प्रभूला पाहणार.————–                                                                    
  •  मृत प्रियजन भेटणार.——–                                                             
  •  इशारा: न्याय येत आहे, क्रोधापासून पळा. ———–                                                   
  • अविश्वासी लोक देवाच्या राज्यापासून वंचित राहतील. ————-