Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मार्च 19, 2024 in जीवन प्रकाश

वधस्तंभावरचा तो मनुष्य पहा

वधस्तंभावरचा तो मनुष्य पहा

जॉन ब्लूम


हात आणि पायातून खिळे ठोकून त्या लाकडी वधस्तंभावर एक मनुष्य टांगलेला आहे .

मानवी इतिहासातील विस्तृतपणे ओळखली जाणारी आणि आदरणीय अशी ही प्रतिमा आहे. कोट्यावधी लोकांनी गेल्या २० शतकामध्ये तिला वंदनीय लेखले आहे. हजारो चित्रकारांनी तिला चितारले आहे. अगणित हजारोंनी ही चित्रे आपल्या घरात लावली आहेत, पाकिटात ठेवली आहेत, गळ्यात आणि कानात  घातली आहेत,  आपल्या त्वचेत त्याचे टॅटू कोरले आहेत. एका मरणाऱ्या माणसाची प्रतिमा.

आणि तो फक्त मरत नाहीये, त्याचा वध करण्यात येत आहे. वधस्तंभावर. हे विचित्र वाटत नाही का? की संपूर्ण काळातील प्रसिद्ध प्रतिमा ही –  विपरीत मनाने तयार केलेला अतिशय रानटी भयाण मृत्युदंड –  वेदनामय मरण सहन करणाऱ्या मनुष्याची आहे! जेव्हा लोक अशा क्रूर छळाचे आणि मृत्यूचे चिन्ह धारण करतात, आणि दागिना म्हणून घालतात  तेव्हा ते सहसा चांगल्या नैतिक  वा मानसिक वृत्तीचे चिन्ह असू शकत नाही. ही विचित्र गोष्ट आहे.

येशूच्या यातनांमध्ये असे काय आहे की जे इतक्या लोकांना मोहित करते? त्यांनी आपल्याला का मोहित केले आहे?

जेव्हा त्याचा विश्वासघात केला, त्याचे जवळचे शिष्य त्याला सोडून गेले, अधिकाऱ्यांनी त्याला दोष देऊन शिक्षा ठोठावली आणि जे हा मरणाचा भयानक देखावा पाहायला आले होते त्यांनी त्याची थट्टा व उपहास केला, अशा या अत्यंत मानहानीच्या क्षणांमध्ये आपण एवढे तल्लीन का होतो? त्याच्याबद्दल आपल्याला हीच का आठवण करायची आहे? इतिहासात सर्वाधिक स्मरण करण्यात येणारा हाच क्षण आहे का? कसल्या प्रकारचे लोक आहोत आपण?

अस्वस्थ करणारे स्मारक

हा महत्त्वाचा प्रश्न आहे. रक्तसाक्षी झालेल्या महात्म्यांचा  इतिहासात अशा प्रकारे लोकांनी सन्मान केलेला नाही.

जरा विचार करा. कोणत्या  रक्तसाक्षी झालेल्या महात्म्याच्या स्मारकात त्याच्या हिंसक मरणाचे चित्र असते? अब्राहाम लिंकन  किंवा मार्टीन लूथर किंग यांच्या डोक्यावरील प्राणघातक जखमांची चित्रे फ्रेम करून आपण घरात किंवा शाळेत का लावत नाही? प्राचीन ग्रीक शिल्पात सॉक्रेटीसला विषबाधेने झालेल्या गुदमरण्याऱ्या वेदनांचे धड का तयार झाले नाही? महात्मा गांधींना छातीत  गोळी घातल्याचे स्मारक का नाही? आपल्या बळी गेलेल्या सैनिकांच्या छिन्नविछिन्न झालेल्या शरीराची चित्रे का दिसत नाहीत?

आणि येशूचे मरण हा उपांत्य (शेवटून दुसरा) भाग नव्हता का? त्याच्या गोष्टीचा कळस आणि ख्रिस्ती आशा ही पुनरुत्थान नव्हे काय? त्याच्या कबरीतून पुन्हा उठलेल्या विजयामुळे क्रूसावरचे त्याचे मरण ही एक प्रस्तावनाच नव्हती काय? आपल्या चर्चमध्ये आपण रिकाम्या कबरीचे चित्र का टांगत नाही? आपल्या घरात आपण ते का लावत नाही किंवा गळ्यात का घालत नाही? जो वधस्तंभ इतका भयानक होता की त्याच्या दृश्याने  आपल्यातील कित्येकांना पोटात मळमळते तर कित्येकांना घेरी येते. तरीही आपण या भयानक वधस्तंभाचीच आठवण करण्याचे का निवडले आहे?

त्याचे स्मरण कसे करावे अशी येशूची इच्छा होती?

जर येशूचे छळवादी मरण आपल्या खाजगी आणि सार्वजनिक आठवणीत केंद्रस्थानी ठेवणारे  जर आपण विचित्र  लोक आहोत  तर तसे येशूनेच आपल्याला करायला लावले आहे.

ती भयानक घटना घडण्यापूर्वी त्याने वारंवार शिष्यांना सांगितले होते की,  “मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसर्‍या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे”  (मत्तय १६:२१). त्याचे मरण आवश्यक होते.

त्यापुढे त्याने असेही सांगितले की, मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन” ( योहान १२:३२). आणि त्याने जे म्हटले त्याचा अर्थ आपल्याला समजावा म्हणून योहान लिहितो, “आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवण्याकरता तो असे बोलला” (योहान १२:३३). त्याचे मरण हा अखेरचा निकाल नव्हता.

याहून अधिक म्हणजे ज्या रात्री येशूला धोका दिला आणि धरून नेले, दोषी ठरवले  आणि शिक्षा ठोठावली त्या शेवटच्या भोजनाच्या रात्री त्याने आपल्या शिष्यांसाठी जे घडणार त्याची आठवण राहावी म्हणून एक विधी नेमून दिला. त्याने भाकर घेऊन  ती मोडली. हे त्याच्या शरीराच्या स्वत:हून केलेल्या यज्ञाचे चिन्ह होते. “मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे” (लूक २२ :१९-२०). त्याच्या मरणाचे स्मरण करावे अशी त्याची इच्छा होती.

एवढेच नाही तर त्याच्या पुनरुत्थानानंतर येशूने एका वाक्यात त्याचे मरण का आवश्यक होते व तो लोकांना त्याच्याकडे कसे ओढून घेईल हे सांगितले. “आणि त्याने त्यांना म्हटले, ‘असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसर्‍या दिवशी मेलेल्यांतून उठावे, आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.’” (लूक २४:४६-४७).

देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगाचे पाप दूर करण्यासाठी आवश्यक असलेला  वल्हांडणाचा अखेरचा कोकरा म्हणून दिला. आवश्यक – कारण रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही. आणि त्यामुळे जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.(योहान १:२९, ३:१६, इब्री ९:२२).

प्रेषित पौल येशूने स्थापन केलेले हे स्मरणाचे भोजन आणि राष्ट्रांना घोषणा करण्याची सुवार्ता याचा दुवा एका वाक्यात जोडतो: “कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता” ( १ करिंथ ११:२६).

आपण असे लोक आहोत

तर वधस्तंभी गेलेल्या मनुष्याच्या प्रतिमेने आपण  इतके मोहित झालेले लोक कसे? अशा प्रकारचे लोक की तसे असण्यास आपल्याला योग्य कारणही आहे. एक अत्युच्च कारण म्हणजे या माणसाने त्याला पूर्ण टाकून दिले असताना जे शब्द उच्चारले, त्याच्या शेवटच्या श्वासामध्ये आपल्यासारख्या लोकांसाठी हे शब्द वापरले ते असे : “हे बापा त्यांना क्षमा कर” (लूक २३:३४).
ज्या लोकांना क्षमेची गरज असते ते पापी लोक असतात आणि आपण तसेच आहोत (रोम ३:२३). पवित्र देवासमोर आपली एकच आशा आहे की त्याने त्याच्या दयेने, न्यायीपणाने आपल्या पापांची क्षमा करावी.  “देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला” (रोम ५:८).

यामुळेच येशू हा इतर हुतात्म्यांसारखा नाही. इतर  सर्व हुतात्म्यांनी आपला प्राण दिला कारण त्यांचे कारण मरणास योग्य होते. पण त्यांचे मरण त्या कारणासाठी स्वाभाविकपणे आवश्यक नव्हते. जर परिस्थिती वेगळी असती तर त्यांचा उद्देश दुसऱ्या रीतीने पूर्ण केला गेला असता. पण येशूचे मरण हेच त्याचे उद्दिष्ट गाठण्याकरता स्वाभाविकपणे आवश्यक  होते. “ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला” ( १ तीम. १:१५). ते विचित्र मरण होते कारण सार्वकालिक अंतिम वास्तवाच्या केंद्रस्थानी  नैतिक, कायदेशीर, दयाळू  अशा मरणाची  गरज होती.

पुनरुत्थानाच्या किंमतीत आपण येशूच्या मरणाची आठवण करत नाही कारण रिकाम्या कबरीशिवाय वधस्तंभ हा व्यर्थ ठरला असता (१ करिंथ १५:१२-१९). हे दोन्ही घनिष्ठपणे एकमेकाशी जोडलेले आहेत. यामुळेच येशूचे मरण हे इतके केंद्रस्थानी आहे की आपण त्याचे स्मरण करतो. यामुळेच ते इतिहासाचा सर्वात स्मरणीय क्षण आहे.  आपण जसे  लोक आहोत त्यामुळे.

पहा तो पुरुष

हात आणि पायातून खिळे ठोकून त्या लाकडी वधस्तंभावर एक मनुष्य टांगलेला हा पुरुष पाहा.

ते भीषण चित्र आहे.  ते सुंदर आहे. आणि ते आशादायी आहे. हा मनुष्य छळाचा विरोधाभास आहे. त्याचा वध त्याच वेळी इतिहासातील अन्यायाची सर्वात घृणास्पद कृती होती आणि न्यायाची सर्वात उदात्त कृती होती. एक पूर्णपणे दयाहीन मरण आणि एक पूर्णपणे दयावान मरण. द्वेषाचे सर्वोच्च  प्रदर्शन आणि प्रीतीचे सर्वोच्च प्रदर्शन.

यामुळेच आपल्यासारखे लोक विरोधाभासाने भीषणपणे येशू मरण पावलेल्या त्या दिवसाला उत्तम शुक्रवार म्हणतो. म्हणूच आपल्याला तो वधस्तंभ अद्भुत, काबीज करून टाकणारा वाटतो.