सितम्बर 17, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

बंडखोरीविषयी मुलांना ताकीद देणे

जॉन पायपर

तरुणांना ( आणि प्रौढ लोकांनाही ) बंड करण्याच्या पथावर जाऊ न देण्याची ताकीद  देणे हे अत्यावश्यक आहे कारण हा रस्ता त्यांना त्यांच्या नाशाकडे नेतो हे वारंवार सिद्ध होत असते. तरुण जेव्हा या रस्त्यावर असतात तेव्हा त्याचा शेवट काय होईल याची त्यांना कल्पना नसते. त्यांना धोका दाखवण्याची गरज असते. ते तुमच्या सूचनेकडे कदाचित दुर्लक्ष करतील. ते ऐको किंवा न ऐकोत पालकांनी मुलांना देवाच्या वचनातून धोका दाखवणे हे  देवाने दिलेले त्यांचे कर्तव्य आहे

पतन झालेले तीन बंडखोर

दाविदाविरुद्ध एकामागून एक बंडांचा उठाव झाला.  दावीद हा देवाचा अभिषिक्त होता. देवाने त्याला आपल्या लोकांवर राजा म्हणून नेमले होते. स्तोत्र २ मध्ये देवाने स्पष्ट ताकीद दिली की देवाच्या अभिषिक्ताविरुद्ध उठणे हे मूर्खपणाचे व नाशकारकआहे. ते अगदी निरर्थक आहे. स्वर्गात बसलेला प्रभू त्यांना हसत आहे.

अबशालोम (दाविदाचा पुत्र), शबा (बन्यामीन वंशातला, याला दुष्ट माणूस म्हटले आहे), अदोनिया (अबशालोमानंतर जन्मलेला दाविदाचा पुत्र) – या तिघांनी एकामागोमाग एक असे देवाच्या अभिषिक्ताविरुध्द बंड करून हात उगारले. आणि यातील प्रत्येक जण यामुळे ठार केला गेला.

अबशालोम याने दावीद राज्य करत असताना इस्राएल लोकांची मने काबीज केली. त्याने त्यांना अभिवचन दिले की की मी तुम्हाला दाविदापेक्षा चांगला न्याय देईन. तो  बंडाचा नायक झाला पण अखेरीस त्याच्या सुंदर केसांमुळे तो झाडाला अडकला व तसाच लोंबकळतअसता यवाबाच्या लोकांनी त्याला भाला भोसकला.

अबशालोमावर मिळालेल्या विजयानंतर इस्राएलाचे दहा वंश व यहूदा यांच्यामध्ये दाविदाला कोणी परत आणावे याबद्दल वादंग माजले. तेव्हा या फुटीचा शबाने फायदा घेतला. त्याने दहा वंश आपल्या बाजूला घेऊन दावीद व यहूदा यांविरुद्ध बंड उभारले. पण अखेरीस त्याचे शीर (एबेल नावाच्या सुद्न्य स्त्रीद्वारे) कापून वेशीबाहेर फेकले गेले.

त्यानंतर अदोनिया दाविदाच्या वृद्ध वयाचा फायदा घेऊन राजा व्हायला पाहत होता – जरी दाविदाने शलमोनाची निवड केली होती. यावेळी त्याने यवाबाला आपल्या बाजूला करून घेतले. शेवटी यवाब आणि अदोनिया दोघेही मरण पावले. तर देवाच्या अभिषिक्ताविरुद्ध जो कोणी हात उगारतो त्याचे भवितव्य कधी हितकारक होत नाही.

या गोष्टींमधून आपण बरेच धडे शिकू शकतो.

१. पापाचे भाकीत केले होते म्हणून त्याची माफी होत नाही.

कुटुंबातील भांडणे व दु:ख यांचे भविष्य केले होते म्हणून जो भांडण व दु:खाला कारण आहे त्याची माफी होत नाही. दाविदाने राज्य करताना बथशेबेशी व्यभिचार केला, तिचा नवरा उरीया याचा खून केला. नाथान संदेष्ट्याने दाविदाला म्हटले, “तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरीया हित्ती ह्याची स्त्री आपल्या घरात घातली आहेस” (२ शमुवेल १२: १०).

यामुळे त्याच्या मुलांची व इतरांची  बंडे ही दाविदाच्या पापाचा परिणाम म्हणून भाकीत केली होती. पण अबशालोम, शबा, अदोनिया यांनी केलल्या दुष्टाई व बंड याला माफ केले असा या गोष्टींमध्ये कोणताही इशारा दिलेला नाही. भाकीत केलले पाप, पाप्याला माफ करत नाही. हा पहिला धडा आहे.

२. पालकत्व चुकले म्हणून पापाची माफी होत नाही.

तरुणांनी हे विशेष समजून घ्यायला हवे. पालकांनी मुलांना शिस्त लावण्यासंबंधी चुका केल्या म्हणून मुलांची पापे माफ होत नाहीत. आपल्या पापांसाठी पालकांनी केलेल्या चुका ही सबब म्हणून आपण सांगू शकत नाही. आपली काहीही पार्श्वभूमी असो आपल्यासाठी आपण जबाबदार असतो. आपल्या पापी कृतींसाठी आपण जबाबदार असणार आणि आपल्या पालकांच्या चुका आपले दोष दूर करणार नाहीत.

१ राजे १:६ मध्ये दिले आहे, ““तू हे काय करतोस?” असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते.” हा दाविदाने आपल्या पुत्राचा नको ते लाड केल्याचा आरोप आहे. ही त्याच्या शिस्तीमध्ये केलेली चूक आहे. तो अबशालोमाशी ही असाच वागला असेल कारण अबशालोमाच्या बंडाच्या अखेरीस त्याने दाखवलेल्या मवाळपणामुळे त्याच्यावर राज्य गमावण्याची पाळी आली होती. काहीही असो, पालकाचे चुकले असले तरी अबशालोम व अदोनिया हे दोघेही त्यांचे बंड व पाप यासाठी जबाबदार आहेत. त्याची चूक ते त्यांच्या पित्यावर लादू  शकत नाहीत.

३. बंड हे उच्च व नीच कोणत्याही ठिकाणी उठते.

तिसरा धडा : बंड हे विशेष हक्क व अधिकार असताना घडू शकते तसेच  ते कमीपणाच्या भावनेतूनही घडते. येथे परिस्थितीचा फायदा घेऊन अधिकार बळकावला जातो.

अबशालोम व अदोनिया दोघांनाही उच्च अधिकार होता. ते केवळ राजपुत्रच नव्हते तर अत्यंत देखणे होते. लेखक स्पष्ट  करतो की ते देखणे होते, आवडते होते आणि लोकांच्या संपर्कात होते. शबा हा कोणीच नव्हता. त्याला दुष्ट माणूस म्हटले आहे (२ शमुवेल २०:१). त्याने आपल्या जीवनात विशेष काहीच केले नव्हते. अबशालोम व अदोनिया यांनी आपल्या प्रतिष्ठेचा  उपयोग सामर्थ्य मिळवून पित्याला उलथून टाकण्यासाठी केला. शबाने प्रजेमध्ये चालू असलेल्या वादंगाचा चलाखीने फायदा घेतला. मुद्दा हा आहे की गरिबी आणि सामर्थ्य, उच्च पत किंवा क्षुद्रता, कोणीतरी असणे किंवा कोणीही नसणे ही बंडखोरीसाठी सबब असू शकत नाही. पाप हे उच्च ठिकाणी तसेच नीच ठिकाणी टपून असते. म्हणून तरुणांनो तुम्ही यापैकी कोठेही असा प्रभूच्या अभिषिक्ताविरुद्ध बंड करण्यापासून सावध असा.

४. स्वत:ला उंचावण्याचा शेवट नाशात होतो.

चवथे , “जो कोणी स्वत:ला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वत:ला नमवील तो उंच केला जाईल” (मत्तय २३:१२).  हे येशूचे शब्द आहेत. अदोनियाच्या कथेचा आरंभ हे स्पष्ट करतो. “त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनीया शिरजोर होऊन म्हणाला, “मी राजा होणार.” त्याने रथ, स्वार व आपल्यापुढे धावण्यासाठी पन्नास पुरुष ठेवले” ( १ राजे १:५). अबशालोम आणि शबाच्या बाबतीतही हेच सत्य आहे. हे फार महान पाप आहे. सर्व मुले व सर्व पालकांमध्ये असलेले एक खोल पाप. आपण महान असण्याची लालसा, खूप समर्थ किंवा सुंदर  किंवा स्मार्ट किंवा कूल, किंवा देखणे, धाडसी, श्रीमंत किंवा इतरांपेक्षा चांगले असण्याची लालसा. “आपल्यात  मोठा   कोण”  असा प्रेषित एकमेकांमध्ये वाद घालत होते.

जुन्या करारातही अशा अनेक गोष्टी आहेत यामुळेच येशूने मुद्दा मांडला. “जो कोणी स्वत:ला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वत:ला नमवील तो उंच केला जाईल”  (मत्तय २३:१२).

जो अभिषिक्त त्याच्या अधीन व्हा.

शेवटी आपण म्हणायला हवे. दावीद हा देवाचा अभिषिक्त होता. दाविदाचा पुत्र येशू हा अखेरचा अभिषिक्त आहे. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त. आणि या गोष्टींमधून आपण मुलांना ताकीद द्यायला पाहिजे  की बंडखोरी ही देवाच्या अभिषिक्ताविरुद्ध आहे. ती दाविदाविरुद्ध असो अथवा येशूविरुद्ध – ती कधीच यशस्वी होणार नाही. पण त्याच्या अधीन होणे, त्याला महान, गौरवी , सुज्ञ, समर्थ, न्यायी, कृपाळू राजा म्हणून पाहिले तर तो  आपले जीव तृप्त करील.

तरुणांनो, स्वत;ला उंचावण्याचे झगझगीत अभिवचन हे मृगजळ आहे. अबशालोम , शबा, अदोनिया यांच्या मार्गाने जाऊ नका. त्यात कधीही यश मिळणार नाही.

Previous Article

तुझा हात तोडून टाकून दे

Next Article

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

You might be interested in …

संपादकीय

किती भरकन् नवं वर्ष जुनं ही झालं ! जानेवारी २०१६ असं  लिहिणं विशेषत्रासाच वाटलंनाही हे तुमच्या ध्यानात आलं का?- नव्या वर्षात आल्यावर निदान मी तरी चुकीनं कोणत्याच पत्रावर वा लेखावरजानेवारी २०१५ असं लिहिलं नाही. सत्य […]

स्वत:वर भरवसा ठेवण्याचा मूर्खपणा जॉन ब्लूम

देव मानवी ज्ञानाच्या एवढा विरोधात का आहे? हे ऐका: “मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” (१ करिंथ १:१९) हे लढणारे शब्द आहेत. आणि प्रेषित पौलाद्वारे आणखी पुढे जाऊन तो म्हणतो: “कारण […]

 विल्यम केरी

(१७६१- १८३४) लेखांक १४                                        आतापर्यंत आपण जर्मन व डॅनिश मिशनरी पाहिले. डॅनिश मिशनचा अस्त झाल्यावर इंग्लंडने भारतात जे मिशनरी पाठवले, त्यातील हा पहिला मिशनरी. १६०० मध्ये भारतात ब्रिटिश कंपनी आली. व्यापारात उत्तम जम बसूनही भारतात […]