Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 1, 2018 in जीवन प्रकाश

भारतात सुवार्तेवर झालेले हल्ले

भारतात सुवार्तेवर झालेले हल्ले

                                                                                                                                                                    क्रॉसी उर्टेकर

                                                               अॅलिक्सो मेंझिज  १५५९१६०५

थोमाच्या काळापासून केवळ मलबारमधील सिरियन मंडळीच धर्मविश्वास टिकवून होती. त्यांना अंकित करून घेण्याची प्रमुख कामगिरी पूर्ण झाल्यावर मेंझिज गोव्यातील व्हॉईसरॉय व आर्चबिशप असे दोन्ही पदभार सांभाळू लागला. त्यामुळे सिरियन चर्चवर त्याने १६०१ मध्ये जेसुइट बिशपची नेमणूक केली. १६०५ नंतर तो मायदेशी परतला. त्याच्या या कामगिरीमुळे तेथे त्याचा खूप सन्मान झाला. पोर्तुगिज राज्याच्या कौन्सिलचा तो अध्यक्ष झाला. हा तर त्याच्या सन्मानाचा कळस होता. पण लवकरच त्याची छी: थू होऊन तो पदभ्रष्ट झाला व शेवटी मरण पावला.

मेंझिजच्या यशाकडे थोडे अवलोकन करू या. पोर्तुगिजांना प्रतिकार करण्यास कोचीनच्या राजाने सिरियन चर्चला गुप्तपणे उत्तेजन दिले होते. कारण पोर्तुगिजांना एकटे पाडले तर परकीयांपासून आपल्या प्रांताचे रक्षण करणे आपल्याला सोपे जाईल असे त्याला वाटले. त्या राजाला मेंझिज पुरता ओळखून होता. याच राजाला त्याने ९५००  पौंड लाच दिली होती आणि पोर्तुगिज तुझे पारिपत्य करतील असा त्याला इशाराही दिला होता. तेव्हा चर्चच्या राजकारणात लुडबुड करणे त्याने सोडून दिले होते. राजाने आपल्याला सोडल्याचे पाहून चर्चची प्रतिकारशक्ती कमी झाली. त्यात सिरियन चर्चच्या धर्मपुढाऱ्यांनी संधीसाधूपणाचे, स्वार्थी, धरसोडीचे व सत्याची कास न धरता तडजोड करण्याचे वर्तन केले. त्यांच्या दगलबाजीमुळे सिरियन चर्च अधिकच शिथिल बनले व त्यांचे धैर्य खचून त्यांनी पडते घेतले.

त्यावेळी जागतिक धार्मिक अवस्था अशी होती की स्कॉटलंडमधील धर्मजागृतीला रोमन चर्चच्या धर्मगुरुंचा पाठिंबा नव्हता. राजाही धर्मजागृतीच्या विरुद्ध होता. बहुतेक लोक रोमन कॅथॉलिक पंथाला धरून होते. पण तेथील मंडळीने खंबीरपणे तेथे कॅथॉलिक पंथाचे उच्चाटन केले. जर्मनीत तसेच घडले. जर्मन लोकांच्या निर्धाराने कॅथॉलिक मंडळीला तेथेही माघार घ्यावी लागली. पण भारतात उलटा प्रकार झाला. देव, न्यायत्व, नीतिमत्वाचे पवित्रीकरणाचे जीवन, खरे सैद्धांतिक शिक्षण यावर येणाऱ्या घाल्यांना निधड्या छातीने तोंड देणारा एखादा लूथर किंवा नॉक्स भारतात झाला नाही. युरोपियनांची खंबीर व धार्मिक वृत्ती भारतातील सिरियन चर्चच्या लोकांमध्ये नव्हती. भारतातील युरोपियनांमध्येही ती खंबीर व धार्मिक वृत्ती आढळते. त्या बाबतीत मेंझिजचे यश उठून दिसते. एका युरोपियन नागरिकाने भल्या मोठ्या पौर्वात्य ख्रिस्ती समुदायावर प्रभुत्व मिळवण्याचे हे ठळक उदाहरण आहे. याच युरोपियनांची इतर देशात प्रगती खुंटली तर एकट्या मेंझिजने भारतात एकट्याने ते घडवून दाखवले. ही भारतीय प्रॉटेस्टंट समाजाची लाजिरवाणी कहाणी आहे. सिरियन मंडळीने ख्रिस्ताच्या चरणाशी बसून  सत्य टिकवण्याकरता तशी त्यांच्यासारखी धमक प्राप्त करून घेतली नाही.

मेंझिजच्या मते रोमच एकमेव सत्य चर्च होते. देवाकडे जाण्याची किल्ली त्यांच्याकडेच आहे अशी त्याची भावना होती. त्यासाठी मरणही पत्करण्याची त्याची तयारी होती. त्यांचे धर्मसिद्धांत व कामाची पद्धत कितीही चुकीची असली तरी मेंझिज प्रभावी निष्ठावंत होता. सिरियन चर्चमध्ये हा अभाव होता. एक ग्रंथकार या मंडळीविषयी म्हणतो, “दैवी विश्वास व कृपेचा काडीइतका पुरावा या मंडळीमध्ये दिसला नाही. शुभवर्तमान, आशा, विश्वास, प्रीती ही त्यांनी जतन केली नाहीत. त्यामुळे शुद्ध धर्मसिद्धांतांचे व आचार विचारांचे उच्चाटन झाले. ते आपला विश्वास जगत नव्हते तर रुढी परंपरा पाळत होते. म्हणूनच मेंझिजचा विजय झाला.”

त्याच्या विजयाचे परिणाम आजही टिकून असल्याचे आढळते. ते आपल्याला इशारा देतात. ऐक्याच्या नावाखाली कॅथोलिकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे ही तारण पावलेल्या विश्वासी जनांसाठी धोक्याची घंटा आहे. मेंझिजनंतर ५० वर्षांनी डच लोकांनी पोर्तुगिजांना भारतातून हाकून लावले. तेव्हा सिरियन लोकांनी बंड करून रोमच्या शृंखला तोडल्या व पुन्हा युरोपच्या ख्रिस्ती जगताशी पूर्ववत संबंध जोडला. पण निम्म्या लोकांना पश्चात्ताप झाला व रोमने पुन्हा त्यांना आपल्याकडे वळवून घेतले. सिरियन चर्चने त्या ५० वर्षात स्वीकारलेले कॅथॉलिक आचारविचार जतन करून ठेवले हे मात्र खरे आहे. आज कॅथॉलिकांची सात आकडी संख्या पाहून मेंझिजचा आवाज घुमत असल्याचा प्रत्यय येतो. एक माणूस किती प्रचंड काम करू शकतो एवढाच धडा सत्य सिद्धांतांचा पुरस्कार करणाऱ्या निष्ठावंत प्रॉटेस्टंट पुढाऱ्यांनी यातून घ्यायला हवा. प्रत्येक स्थानिक मंडळी शास्त्राभ्यास करून वचनात दृढ व्हायला हवी. म्हणून अनेक शास्त्राभ्यासगट सुरू व्हायला हवेत. अर्थात त्या वर्गांचे नेतृत्व करण्यास पुढारी तयार केले पाहिजेत. म्हणजे मंडळी जिवंत व खंबीर राहून खोट्या शिक्षणाला मुळीच थारा देणार नाही. सत्याचीच घोषणा करीत राहील. प्रभू आजही म्हणत आहे, “तू माझ्यावर सर्वोच्च प्रीती करतोस का? माझ्या कोकरांस चार… माझ्या मेंढरांस पाळ”