Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 23, 2021 in जीवन प्रकाश

उगम शोधताना

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

 प्रकरण २०

तुमच्या बंधूचा द्वेष करा ( लूक १४:२५-२६).

 ते म्हणाले, ‘मस्तच ! अगदी छान झाले’  नेहमीच भाषांतरानंतर ते असे उत्तेजन द्यायचे. यावेळेस मात्र मध्ये ‘पण’ आले.

आम्ही लूकात होतो. येशूने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. जोमात लोकसमुदाय त्याच्यामागे जात होता. काही जण मोल भरण्याची कल्पनाही न करता असेच त्याच्यामागे निघाले होते. शेवटी एका वेळी तो त्यांच्याकडे  मागे वळून म्हणाला;  “जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येत नाही” ( लूक १४:२६). भाषांतर लोकांना आवडले व मान्यही  झाले तरी ते म्हणाले, “पण एक छोटासा बदल करायलाच हवा.”

“कोणता? कसा?”

“जिवाचाही द्वेष करणार नाही तर….”  ऐवजी “शक्यतो जिवाचाही द्वेष करणार नाही…” असे म्हणावे. त्यांचा मुद्दा माझ्या लक्षात आला. त्यांना शुभवर्तमान चांगले माहीत होते. प्रमुख मुद्दा द्वेष नसून प्रीती आहे हे ते जाणत होते. अत्युच्च बांधीलकी असणे त्यांच्यासाठी नवीन नव्हते. त्यांच्या प्रांतांतील संस्कृतीत कौटुंबिक प्रीती व  बंधुप्रीती फार घट्ट असते. त्यात अपेक्षा व कर्तव्यांचा फारच मोठ्या प्रमाणात समावेश असतो. आपल्या बंधुंवर राग धरायचा नसतो, तर सतत शांती व ऐक्य जोपासायचे असते. अन्नपाणी, मालमत्तेत वाटेकरी करून घ्यायचे असते, शिकारीत, घर बांधण्यात, बागकामात, विवाहासाठी सोयरीक शोधण्यात, विवाहातील व्यवहार करण्यात पुढाकाराने मदत करायची असते. आणि लढ्यात आपल्या भावाचे संरक्षण करायचे असे. मृताच्या भावाने खोल दु:ख व क्रोध व्यक्त करायचा असे. मरणाचे मूळ कारण समजल्याशिवाय त्याने गप्प राहायचे नसे. कोणी जादूटोणा केला याचा छडा लावायचा असे व बदला घेऊन प्रत्युत्तर द्यायचे असे. एक वर्षभर तरी भावाच्या मृत्युबद्दल शोक करायचा असे. प्रत्येक कौटुंबिक संबंधांमध्ये या अपेक्षा स्पष्ट स्मरणात असत. त्या मोडू नयेत असा अलिखित नियम असे. अशा या पार्श्वभूमीवर मोल भरून देण्यासंबंधीचे येशूचे हे विधान लक्षात घ्यायचे होते.

मी म्हटले, “होय, तुमचे बरोबर आहे की आपण कोणाचा द्वेष करीत असलो तर येशूचा शिष्य होऊ शकत नाही. हे तुम्ही व मीही चांगलेच समजतो. पण या वचनात येशू जे म्हणत आहे त्याचे आपण अचूक भाषांतर केले आहे.” ते माझ्याकडे आश्चर्याने पाहातच राहिले. त्यांच्या मते मी चूक लिहिले होते. आणि मी दुरुस्ती केल्याशिवाय ते मला पुढे जाऊ देणार नव्हते. त्यावरून आमचा जो अध्यात्मिक संवाद सुरू झाला, तो दोन दिवस चालू राहिला. खूप तीव्र उहापोह झाला. मी त्यांना अखेर पटवू शकलो की येथे भाषेची समस्या नसून त्यांचे जे म्हणणे आहे त्या अर्थाने येशू येथे बोलत नाही हे त्यांनी समजून घ्यायला हवे.

“मग येशूला काय म्हणायचे आहे?”

“आपण नक्कीच लोकांचा द्वेष करायचा नाहीये, पण आपण जर योग्यतो द्वेष केला तर आपण त्याचे शिष्य होऊ शकतो.”

“पण तेच तर तो म्हणत आहे ना?” मूळ अर्थानुसार असलेला फरक त्यांच्या लक्षात येत नव्हता. जर मी म्हटले की तुम्ही आपल्या बांधवांवर देवाइतकी नव्हे तर जुजबी प्रीती करा म्हणजे तुम्ही माझे शिष्य व्हाल  किंवा किंचितशी तुम्ही आपल्या लोकांबद्दल नावड ठेवली तर तुम्ही माझे शिष्य व्हाल; तर ते भाषांतर उचित होणार नव्हते.

त्या काळात फुकुटाओच्या लोकांचा वोपोसालेच्या लोकांशी कोर्टात खटला चालू  होता. फुकुटाओच्या एका रुग्णाला आजार वाढल्याने वोपोसालेतील क्लिनिकमध्ये उपचाराचा नेले होते. तेथेही त्याचा आजार वाढल्याने त्याला सरकारी खर्चाने विमानाने शस्त्रक्रियेसाठी मेंडीला पाठवले. त्याच्यावरील उपचारास विलंब झालेला असल्याने शस्त्रक्रिया यशस्वी होऊनही तो रुग्ण अखेर मृत्यू पावला. बऱ्याच खडतर प्रवासाने त्याचे शव विमानाने वोपोसालेत आले. शवासोबत आलेला मनुष्य म्हणाला, “तो फार शांतीने मरण पावला.”

पण त्याच्या मुलांना एवढे पुरेसे नव्हते. त्यांना ह्याचा शोध घ्यायचा होता की त्याला कोणी मारले. चावडीतच जादुटोणा करणारा राहत होता. त्याच्याकडून या मृत्युच्या मूळ कारणाशी त्यांना पोहोचायचे होते. त्याने त्याच्या फायद्याचा विचार करून उत्तर शोधून काढले की वोपोसालेतील व्यक्तीने त्याला विष घालून मारले. विष काय घातले याला महत्त्व नव्हते तर अपराधी व्यक्ती शोधून तिचा बदला घ्यायचा होता.

पापुआ न्युगिनी मध्ये गावातील लोकांनी निवडून दिलेली सरकारमान्य गावपंचायत खटला चालवत असे. अनेक गावांच्या मान्यवर पुढाऱ्यांचे  कोर्ट तयार केलेले असे. नेमलेला न्यायाधीश नि:पक्षपाती असे. त्यांना आपली संस्कृती चांगली माहीत असे. खून, विष घालणे किंवा जादूटोणा याकडे मामुली बाब म्हणून नव्हे तर गांभीऱ्याने पाहिले जात असे. परिस्थितीजन्य पुरावा सादर केला जात असे. या खटल्यासाठी मेंडीच्या डॉक्टरची साक्ष घेतला गेली. त्याने सांगितले की शस्त्रक्रिया उत्तम झाली व त्यानंतरही त्याने चांगली प्रगती दाखवली होती, पण औषधांना त्याचे व्याधिग्रस्त शरीर साथ देईना.  कोर्टाला हे एवढेच पुरेसे नव्हते. त्यांचा आग्रह होता की डॉक्टरांनी लिहून द्यावे की विषबाधेने त्याचा मृत्यू झाला. डॉक्टर या गोष्टीला  तयार नसल्याने वाद चिघळला होता. फुकुटाओत लोक तर भाले वगैरे शस्त्रास्त्रे घेऊन बदला घेण्याच्या तयारीत होते. अशा वेळी या वचनांवर आमचे काम चालू होते. मी सांगत होतो की “आपण कोणावरही प्रीती करू नये असे येशू म्हणत नाही तर सर्वांवर प्रीती करावी असे तो इच्छितो.” या मुद्याशी ते सर्व सहमत होते.

“ मुळात येशू म्हणत आहे की आरोप प्रत्यारोपात देवाचा विजय झाला पाहिजे. माझ्या जीवनात निर्णयाचा शब्द माझ्या निकटच्या  बांधवांचा की देवाचा असावा?” .. “देवाचाच असावा.” सर्वांना होकार दिला.

 “येशू याच प्रकारचे शब्द वापरत आहे याचे कारण काही वेळा असे काही घडेल की तुमची कृती तुमच्या बांधवांच्या नजरेत त्यांचा द्वेष करणारी आहे असे त्यांना वाटेल. यासाठी की तुम्ही त्यांना हवे ते नव्हे तर देवाला हवे ते करत असाल.”

तेव्हा व्हिआरे म्हणाला, “येशू असे म्हणाला असेल कारण अशी कधी कधी वेळ येईल की तुमची कृती तुमच्या कुटुंबियांच्या व बांधवांच्या दृष्टिकोनातून त्यांचा द्वेष करणारी आहे असे त्यांना भासेल . येशूला अनुसरताना आपण कधी कधी असे वागू की आपण त्यांच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे करू, येथे आपण त्यांचा द्वेष करायलाच हवा.” तो सुस्पष्ट फोलोपात हे बोलला. ढग थोडे विरळ होऊ लागले असले तरी ते भरलेलेच होते. समाजाच्या नाळेशी या विषयाचा संबंध होता.

अशा सत्याने त्यांचा समाज तग धरणार होता का ? भावाचे चूक असो की बरोबर असो. भावाला भावाच्या बाजूने उभे राहावेच लागे. हे कायम बरोबरच कसे? ही पद्धत नेहमीच गोंधळ निर्माण करायची. पण त्याविरुद्ध गेले तर आकाश पाताळ एक होणार. शिष्य होण्याचा सोपा मार्ग नसेल का?

आता हा शिष्य होण्याचा मूळारंभ ‘बेटे’ होता. जे आम्ही मूळ मानले आहे त्याच्या ते विरुद्ध असणार होते.

बहुतेक लोक ख्रिस्ती असून गावाच्या कोर्टकेसवर बायबल खोलीबाहेर त्यांची  बाचाबाची चालू होती. बंधू म्हणून सर्वांना त्यात भाग घेणे बंधनकारक होते. भावंडे त्यासाठीच तर असतात. सर्व बाहेर गेले तरी व्हिआरे विचारमग्न अवस्थेत काही वेळ रेंगाळत थांबला. अखेर म्हणाला, “मी जाऊ का?”

“कोठे जायचे आहे?”

“या लोकांबरोबर वोपोसालेला?”

“तुझा त्या जादुटोणा करणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास आहे?”

“नाही.”

“तो माणूस जादुटोण्यामुळे मरण पावला का?”

“नाही. हे भूतविद्याप्रवीण सैतानासाठी काम करतात. मी गेलो तर त्याचे समर्थन केल्यासारखे होईल. पण तो मेलेला भाऊ माझा बंधू होता. मी गेलो नाही तर ते काय म्हणतील ?- मला त्याच्या मरणाबद्दल काहीच वाटत नाही. मी त्यांच्यात सामील झालो नाही तर त्याला मारणाऱ्यांमध्ये माझाही हात आहे असे म्हणतील.” त्याने कागद उचलला, वचन वाचले, त्याचे तोंड लहान व रडवेले झाले.

“मला गेलेच पाहिजे, हवे तर शस्त्रास्त्रे नेणार नाही. पण मग मला ते दुर्बल समजतील. मी काय करू?”

मी त्याच्यावर एक कटाक्ष टाकला. हे युद्ध त्याचे होते. शेवटी तो गेला. माझ्या कानावर आले की तेथे खूप गोंधळ उडाला. त्यांना न्याय हवा होता. तो जोवर मिळणार नाही तोवर ते संतापणार होते. पण काही झाले नाही. दुसऱ्या दिवशी मी विचारले, “काय झाले?”

“कोर्टात वाईट झाले.”

“कसे?”

“काहीच झाले नाही. दुसऱ्या गावातून पंच आले आणि त्यांनी पुरावे सादर न केल्याबद्दल घरी पाठवून दिले.”

“म्हणजे खटला संपला?”

“हो.” तो थबकला. पण खूष दिसला नाही.

“नेमके काय झाले?”

“मुळापासून आमचे सर्व चुकले. आम्ही त्या भूतविद्याप्रवीणाचा सल्लाच घ्यायला नको होता. तो आम्हाला नेहमी गोलगोल धावत फिरवत राहातो, कधी सोक्षमोक्ष लावत नाही. सतत क्रोधविष्ट तापते वातावरण ठेवतो.”

“मी तेथे शांती घडवून आणावी या इच्छेने  शस्त्रे न घेता गेलो. पण मी शांती करणारा होऊ शकलो नाही. कोणीच ते करू शकले नाही. सर्वच मुसळ केरात. परतत असता सारे दु:खी होते. माझ्याविषयी तर सर्वांमध्ये नाराजी होती.”

“का?”

“कारण मी त्यांच्याशी खऱ्या अर्थाने ऐक्यात नव्हतो.”

“मला वाटते या भावनेतून ते लवकरच सावरतील.”

“पण मला वाटते इतक्यावरच हे वाईट थांबणार नाही.”

“आणखी काय वाईट घडणार?”

‘”ते प्रभू म्हणाला ना तसे आहे. तुम्ही दोन्ही करू शकत नाही. तडजोड करू शकत नाही. दोन्होंपैकी एकच करावे लागेल .”