Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 2, 2024 in जीवन प्रकाश

पुनरुत्थानदिन अजून येत आहे

पुनरुत्थानदिन अजून येत आहे

मार्शल सीगल


“जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू” ( १ करिंथ १५:४९)

इतके पुनरुत्थानदिन साजरे केल्यानंतर – ज्यांनी येशूला खरेखुरे मरताना पाहिले ते काय सहन करत होते हे  समजून घेणे आपल्याला कठीण आहे. हे खरं आहे की जे घडणार त्यात आडपडदा न ठेवता त्याने सर्व काही स्पष्ट केले होते. (मार्क ८ ३१-३२) पण तरीही हे सर्व विचार करण्यापलीकडचे होते. हा ख्रिस्त होता आणि ख्रिस्त हा अगदी काहीही करू शकत होता – मरण्याशिवाय. तरीही तो टांगला गेला आणि नंतर त्याला कबरीत  ठेवले गेले –  श्वास नाहीसा झाला होता, डोळे निस्तेज झाले, त्याचे ह्रदय थंड झाले – दगडासारखे.  आपल्याजवळ जे काही होते, आपल्याला जे माहीत होते  ते सर्व सोडून देण्यात आणि त्याच्यामागे जाण्यात आपण मूर्ख होतो का?

आता जे तो पाहत होते तो फिका,  निचेष्ट देह  कमकुवतपणा सांगत होता, सामर्थ्य नाही. विजय नव्हे तर हार,  गौरव नव्हे तर अप्रतिष्ठा, आशा नव्हे तर निराशा दाखवत होता. तो वेगळा असणार असा विचार तरी आपण का केला?

इतकी वर्षे आपल्याला रविवारची इतकी सवय झाली आहे की त्यांच्या सर्व आशा,  तीन दिवस त्या कबरीमध्ये मेल्या होत्या याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पण ते मूर्ख नव्हते. जे शरीर त्यांनी पुरले होते ते बीज होते व  लगेचच त्याला अंकुर फुटून ते फोफावणार होते.

नेहमीचाच एक रविवार?

त्या पहाटे जे घडले असा तुमचा विश्वास आहे त्यावरून तुमचा  इतर जो काही विश्वास आहे तो  ठरविला जाणार आहे.

पुनरुत्थानाचा रविवार हा सर्व इतिहासाची बिजागरी आहे… एका संपूर्ण नव्या विश्वाला उघडून देणाऱ्या उत्तराची ती किल्ली आहे,  त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.  तसे नसेल तर तो फक्त एक कोणताही रविवार असू शकतो. एकतर एकदा मेलेला पुत्र त्याच्या कबरीतून उठला असेल नाहीतर चोरांनी कट रचून त्याचे शरीर चोरून नेले असेल. ख्रिस्तीत्व हे एकतर मानवी ह्रदयाच्या प्रत्येक इच्छेला आणि प्रश्नाला उत्तर देत असेल नाहीतर  आपण अगदी दयनीय असे लोक आहोत  (१ करिंथ  १५:१९). एकतर त्या दिवशी येशू मेलेलाच राहिला असेल नाहीतर तो आताही जिवंत आहे.

जर पुनरुत्थानदिन ही फक्त एक सुंदर स्फूर्तीदायक परिकथा असेल आणि ह्रदयस्पर्शी आशा असेल तर तो इतर कोणत्याही दिवसासारखा एक चांगला दिवस असेल. प्रेषित पौल लिहितो, “ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्ही अजून आपल्या पापांतच आहात” ( १ करिंथ १५:१७). आणि दोन वचनानंतर तो म्हणतो, “यामुळे जर येशूसंबंधी तुम्ही चुकला तर तुमचे जीवन किती दयनीय असेल!”

पुनरुत्थानदिनाशिवाय तुमचे जीवन

जर ख्रिस्त उठला नाही तर तुम्ही अजून तुमच्या पापात आहात. तुम्हाला वाटले की क्षमा मिळाली पण ही फक्त कल्पना असणार. वधस्तंभापाशी सोडून दिलेली लज्जा आणि दोष खरंतर अजून तुमचा पाठलाग करत असणार आणि लवकरच तुम्हाला शोधून काढणार. तुमची पापे रद्द झालेली आहेत असे तुम्हाला वाटले होते पण तुम्हाला ते कर्ज भरावे लागणार आहे. जी काही दुष्टता तुम्ही केली, विचार केला किंवा बोलला- ती तुमच्या खांद्यावर पुन्हा टाकली गेली असणार. जो तुमचे शरीर आणि जीव नरकात टाकण्यास समर्थ आहे त्याचे तुम्ही अपराधी आहात आणि तुमच्यासाठी  कोणी कैवारी नाही, महायाजक नाही, कोकरा नाही. वेदीची सुरक्षा आता फाशीची भयानकता बनली असणार.

आणि जर ख्रिस्त उठला नाही तर तुमचा विश्वास व्यर्थ. येशूमागे जाण्यासाठी जे काही प्रयत्न, त्याग तुम्ही केला तो सर्व विनाशकारी आणि वाया ठरला आहे. जर तो उठला नाही तर तो तुमच्या पापासाठी काहीही करू शकत नाही. तुमच्या ह्रदयाच्या वेदनांसाठी तो काहीही करू नाही, तुमच्या कमकुवतपणासाठी, गोंधळासाठी, आजार आणि दु:ख यासाठी तो काहीही  करू शकत नाही. तुमचा नांगर कापून टाकला आहे, तुमचे शीड फाटले आहे, तुमची जीवन नौका बुडाली आहे. जर वधस्तंभ हाच शेवट असता तर ख्रिस्तीत्व क्षणभरच्या विचारासाठीही लायक नसणार मग विश्वास तर बाजूलाच.

जर पुनरुत्थानदिन फक्त इस्टर एगचे रंगवलेले  रंग असते तर तुमचे जीवन भीषण झाले असते याची कल्पना तरी तुम्ही करू शकता का?

तुझा विजय कोठे?

जर येशू अजूनही मेलेलाच असता तर तुमची जीवने एक शोकांतिका झाली असती. पण तो तर कधी नाही इतका जिवंत आहे. तुम्ही पृथ्वीवरील प्रत्येक  खंड उकरून काढला तरी त्याच्या अस्थी तुम्हाला कोठही मिळणार नाहीत. कारण तो  आता स्वर्गाच्या सिंहासनावर बसला आहे. तो रक्तमांसासह आणि गौरवी जखमांसह  लोकांना प्रगट झाला आणि  त्याच्या शिष्यांदेखता स्वर्गात वर गेला. आणि त्यामुळे आता आपली भविष्ये अत्यंत प्रकाशमान झाली आहेत.

ख्रिस्त तर उठला आहेच आणि जर तुम्ही त्याच्यावर आशा ठेवली आहे तर आता तुम्ही तुमच्या पापात नाही.
तुम्ही तुमच्या पापात आणि देवाच्या क्रोधाखाली जन्माला आला होता. ज्या देवाने तुम्हाला निर्माण केले त्याच्या विरुद्ध प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. मरणापेक्षाही भयंकर असे तुमचे भवितव्य ठरले होते – अनंतकालिक जाणीवमय यातना. आणि हा तुमचा शेवट असणार होता. परंतु देव स्वत: तुम्ही आणि त्याचा क्रोध यामध्ये उतरला. आता ख्रिस्तामध्ये तुमचे भवितव्य आहे. जाणीवेचा अंनतकालिक अमर्याद आनंद.

आणि जर ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे तर तुमचा विश्वास व्यर्थ नाही. नाही, तुमच्या विश्वासाने जगावर विजय मिळवला आहे ( १ योहान ५:४). विश्वासाद्वारे “पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे” (१ करिंथ ३:२२-२३). जर येशू उठला आहे तर मरण हे तुमच्या कह्यात आहे आणि एक दिवस ते तुमच्यापुढे गुडघे टेकून तुमचा दास होईल. रिकाम्या कबरीने आपले वतन खुले केले आहे आणि आपल्यासाठी त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. आणि एक दिवस आपण  पुढील गीत येशू सोबत गाऊ:

“मरण विजयात गिळले गेले आहे”
“अरे मरणा, तुझा विजय कोठे?
अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” ( १ करिंथ १५: ५४-५५).

आपला येणारा पुनरुत्थान दिन  

यरुशलेमेच्या बाहेर असणाऱ्या त्या एका सामान्य गुहेवर किती अवलंबून होते याची कल्पना प्रेषित पौलाला  होती. आणि तिथे जे घडले त्यावर विश्वास ठेवणे किती कठीण आहे हेही त्याला माहीत होते. आणि हीच गोष्ट आपल्यालाही घडणार आहे यावर विश्वास ठेवणे तर अजून कठीण असणार याचीही कल्पना त्याला होती.  यामुळेच १ करिंथ १५ हा अध्याय बायबलमध्ये आहे. संपूर्ण विश्वाला हादरून टाकणारे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे कथन पुन्हा करत – आणि आपल्या पुनरुत्थानासाठी आपली तयारी करण्यासाठी.

जगातले बहुतेक लोक, कोट्यवधी लोक विश्वास ठेवतात की तो इतर कोणत्याही माणसासारखा मरण पावला. तो मेला असा विश्वास आपणही धरतो पण त्या कोट्यवधींसारखा नाही – आपण विश्वास ठेवतो की नंतर तो जगला – हे आपल्याला सांगण्यासाठी. छळ, मानहानी, रक्त, कबर या सर्वांतून तो गेला आणि या सर्वांतून त्याने तो जिवंत आहे असा जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी एक प्रकाशित मार्ग तयार केला. अशा प्रकारे एका पुनरुत्थान दिनाने दुसऱ्या पुनरुत्थान दिनाची वाट  तयार केली. यावेळी त्याच्या इच्छेला ज्यांनी आपले जीवन समर्पण केले ते सर्व उठले जातील – तो जेथे राहतो तेथे राहण्यासाठी.

“जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते; जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते…जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू” (१ करिंथ १५: ४२-४९).

त्या येणाऱ्या पुनरुत्थानदिनी जेव्हा सर्व जगभरची थडगी उघडतील आणि रिकामी होतील तेव्हा आपण ज्याने मरणावर विजय मिळवला त्याला फक्त पाहणारच नाही तर आपण मरणावर विजय मिळवणारे होऊ. आपल्या कबरीमध्ये जे देह ठेवले होते ते श्वास घेऊन चालू लागतील. आपण केवळ त्या स्वर्गातील मानवाबरोबर असणार एवढेच नाही तर आपण त्याच्यासारखे होऊ – शुद्ध , समर्थ , अविनाशी, गौरवी.