Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जून 8, 2021 in जीवन प्रकाश

आत्म्याचे फळ – सौम्यता

आत्म्याचे फळ – सौम्यता

पुरुषांनो सौम्य असा

 डेविड मॅथीस

 विविध प्रकारचे सामर्थ्य हे देवापासून मिळालेली दान आहे व ते त्याच्या राज्याच्या वाढीसाठी लोकांनी वापरायचे आहे. इतर चांगल्या देणग्यांप्रमाणेच ते सामर्थ्य  योग्य प्रकारे वापरले नाही तर ते नाशकारक असते. सामर्थ्याच्या धोक्याचा उपाय हा सामर्थ्य  कमी करणे हा नाही तर सौम्यता हा ख्रिस्ती गुण मिळवणे हा आहे.

सौम्यता पुन्हा पुढे आणू या

गलती ५: २२ ते २३ मधील प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन या आत्म्याद्वारे होणार्‍या नऊ गुणांमध्ये आज सौम्यता ह्या गुणाबद्दल बराच गैरसमज आढळून येतो. दोन हजार वर्षांनंतरही तो कमकुवतपणा म्हणूनच वापरला जातो. पण बायबलनुसार तो सामर्थ्याचा अभाव नसून सामर्थ्याचा देवभीरूपणाने वापर असा आहे. सौम्यता पात्रतेची कमतरता सूचित करत नाही तर एखाद्याच्या सेवेच्या सामर्थ्यामध्ये पात्रतेची  भर घालते. यामुळे तो चांगल्या रीतीने जीवनदायी सेवा करू शकतो. सौम्यता ही वाईट, जीवन घेणारी नाही.

पावसाचे उदाहरण घ्या. पावसाची झोड जीवन उध्वस्त करते. हलक्या सरी जीवन देतात (अनुवाद ३२:२). मुसळधार पाऊस हानी करतो लाभ देत नाही. देण्याची पद्धत ही महत्त्वाची आहे. आपली पाण्याची गरज (जीवनाचे सामर्थ्य) सौम्यपणे पुरवली गेली पाहिजे, विध्वंसक रीतीने नव्हे. सौम्य म्हणजे कमकुवतपणा नव्हे तर योग्य प्रकारे- जीवन देणे, जीवन घेणे नाही.

तसेच “जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे” (नीति.१५:४). सौम्य म्हणजे दुर्बल नाही तर संयमाने जीवन देण्यामध्ये समर्थ असणे. एखादी चांगली गोष्ट योग्य प्रमाणात देणे.

सौम्यता हा गुण हा खुद्द देवामध्येच आपण उत्तम रीतीने पाहू शकतो, जो पराक्रम्यासारखा येतो  (यशया ४०:१०). त्याच्या लोकांबरोबर आपले सामर्थ्य तो कसे वापरतो? “मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्‍यांना सांभाळून नेईल” (यशया ४०:११). हिंसाचार हा सामर्थ्याचा नाशकारी उपयोग आहे. (यशया २२:१७). सौम्यता ही जीवदायी कृती आहे.

पित्यांनो आपल्या मुलींना कशाची गरज आहे

जेव्हा प्रेषित पेत्र चांगले सामर्थ्य वाईट सामर्थ्याच्या विरोधात, न्यायी विरुद्ध अन्यायी अधिकारी दाखवतो, तेव्हा तो चांगल्या नेत्यांना ‘सौम्य व चांगले’ असे म्हणतो (१ पेत्र २:१८).  कठोर च्या विरुद्ध कमकुवत नव्हे – दुर्बल धन्याकडून  संरक्षणाची कोण अपेक्षा करील? – तर चांगले व सौम्य” यांच्यापासूनच करील. आपल्याला सौम्य पुढार्यांची गरज आहे दुर्बलांची नव्हे. आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य असलेले नेते हवे आहेत पण त्यांनी ते आपल्याविरुद्ध आपल्याला हानी पोचवण्यासाठी न वापरता पण आपल्या हितासाठी वापरायला हवे. यामुळेच जुन्या व नव्या करारात मेंढपाळाची प्रतिमा अगदी समर्पकपणे वापरली आहे. मेंढरे ही दुर्बल आणि सहज हल्ला करण्याजोगी असतात. त्यांना कमकुवत नव्हे तर समर्थ मेंढपाळाची गरज आहे. त्यांचा फायदा घेऊन त्यांना कठोरतेने वागवणारे नव्हे तर चांगले व मदत करण्यासाठी आपले सामर्थ्य वापरणारे मेंढपाळ हवे असतात.

माझ्या ४ वर्षाच्या मुलीला कमकुवत बाबा नको आहेत. तिला मी समर्थ हवा आहे – माझे सामर्थ्य तिला मदत करण्यासाठी वापरून – तिला इजा करून नव्हे. आणि माझे स्नायू मी तिच्यावर वापरू नये ह्याची तिला अधिक गरज आहे. बाबा मोठे आहेत आणि शक्तिमान आहेत हे तिला दिसतंय. मी सौम्य आहे हे तिने पाहण्याची गरज आहे. माझे सामर्थ्य मी तिची सेवा करण्यासाठी, तिला आशीर्वाद देण्यासाठी आहे असा तिला विश्वास ठेवता यायला हवा.

दुर्बल पुरुष त्यांच्या सामर्थ्याबद्दल बोलण्यात आणि दाखवण्यात अधिक गुंतलेले असतात. खरे समर्थ पुरुष आपल्या शक्तीचा देखावा करण्याकडे लक्ष देत नाहीत तर त्यांची सौम्यता दाखवतात. इतरांचे भले करण्यासाठी आपले सामर्थ्य योग्य रीतीने ते वापरू शकतात. जे पुरुष आपल्या सामर्थ्यामध्ये व प्रभूच्या सामर्थ्यामध्ये सुरक्षित असतात ते आपली सौम्यता सर्वांना  कळवण्यास उत्सुक व अधीर असतात. “तुमची सोम्यता सर्वांना कळून येवो” (फिली. ४:५).

मंडळीसाठी सौम्य पुरुष

यामुळे खिस्ताला मंडळीमध्ये असे नेते असण्याची अपेक्षा आहे यात नवल नाही. “सौम्य, भांडण न करणारा असावा”     ( १ तीम. ३:३). वडिलांच्या १५ गुणवैशिष्ट्यांमध्ये (१ तीम. ३:२-७) चार नकारात्मक आहेत. “ तो मद्यपी व मारका नसावा, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न धरणारा.   “ यापैकी फक्त एकाच नकारार्थी गुणाला होकारार्थी जोड दिली आहे. “सौम्य, भांडण न करणारा असावा.” यामध्ये असे अपेक्षित आहे की वडील हे समर्थ असले पाहिजेत. त्यांना सामर्थ्य असणार. ते वडिलांच्या संघामध्ये कार्य करीत असल्याने त्यांना सामर्थ्य आहे का नाही हा प्रश्न नाही तर ते दुसऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना इजा न करता आपले सामर्थ्य कसे वापरतात हा आहे. देवाची सामर्थ्याची देणगी योग्य संयम आणि आत्मनियंत्रण करून कशी वापरावी हे त्यांना माहीत असायलाच हवे व ते त्यांनी दाखवून द्यायला हवे. व्यक्ती या नात्याने तसेच संघाचा सभासद या नात्याने त्यांनी सौम्य असायलाच हवे.

इतर पाळकीय पत्रांतून सुद्धा सौम्यतेबद्दल पौल काय म्हणतो हे स्पष्ट आहे. “हे देवभक्ता … सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग” ( १ तीम. ६:११). पाळकामध्ये असलेली खरी सौम्यता कळपाला केवळ जीवनच देत नाही तर जगाला जीवन देते. “त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे; कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे” (तीत ३:१-२). आणि सर्व नेत्यांसाठी महत्त्वाचे म्हणजे “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील, विरोध करणार्‍यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे; कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्‍चात्तापबुद्धी देईल” (२ तीम. २:२४-२५). आपल्या विरोधकांची केलेली कानउघाडणी आक्रमक होऊ शकते पण ती सौम्यतेने केली जावी.

तोच सौम्यता

अखेरीस पाळक असोत वा सभासद, स्त्री अथवा पुरुष, पती वा पत्नी, आई किंवा वडील, अधिकारी वा कर्मचारी आपल्यामध्ये सौम्यता ही खुद्द देवच तयार करतो व तिने आपल्याला भरतो.  जेव्हा देवाची सौम्यता आपण वाखाणतो- आणि तोच तिचा उत्कृष्ट नमुना आहे- तेव्हा आपण तो कमकुवत आहे असे म्हणत नाही. तर त्याची दुर्बल मेंढरे असताना आपल्याला आवडते की हा आपला मेंढपाळ अपार समर्थ आहे इतकेच नाही तर त्याच्या सामर्थ्याने आपल्या प्रियजनांवर दडपण न आणता त्यांना जीवन कसे द्यावे हे त्याला समजते.

आपला देव हा अधिकार गाजवणाऱ्या जुलमी राजाप्रमाणे आला नाही तर एक चांगला व सौम्य प्रभू असा आला. त्याने म्हटले,  “मी मनाचा सौम्य व लीन आहे” (मत्तय ११:२९). आपल्या जगात, बेथलेहेमात तो सौम्यतेने खाली उतरला, नाझरेथमध्ये  तो वाढला. गालीलात त्याने अधिकाराने आणि सौम्यतेने शिक्षण दिले आणि तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर बसून यरूशलेमेत गेला (मत्तय २१:५), त्याचे जीवन आपल्याकरिता देण्यासाठी. “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणार्‍याकडे स्वतःला सोपवून दिले” (१ पेत्र २:२३).  तो अशक्त किंवा असमर्थ होता म्हणून नव्हे तर तो स्वत: सौम्यता असल्याने अधिक शक्तिशाली होता. म्हणून प्रेषित पौलाप्रमाणे आपणही “ख्रिस्ताची सौम्यता व नम्रता”  (२ करिंथ १०:१) पाहून तिचे अनुकरण करू या. त्याच्या सामर्थ्याने आपण आपली रग दाखवण्याची गरज सोडून द्यावी. तो आपल्याला आज्ञा करतो की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो  (फिली ४:५). तो त्याच्या हाताखालच्या मेंढपाळांना कळपाची सेवा करण्यास शक्ती व सामर्थ देतो. तो आपल्या लोकांना अधिकार व प्रभाव देतो यासाठी की त्यांनी तो जतन न करता सेवा करावी, इतरांना त्याने तो अधिक दिला तर हेवा करू नये.

जो काही अधिकार, प्रभाव आपल्याला मिळाला आहे तो आपला हक्क नाही ते देवाकडचे  कर्ज आहे. ते आपण या जगात त्याच्या महान हेतूसाठी – सौम्यतेने वापरायचे आहे.