Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जून 26, 2018 in जीवन प्रकाश

देवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी – भाग २                           लेखक: जेरी ब्रिजेस

देवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी – भाग २ लेखक: जेरी ब्रिजेस

जेरी ब्रिजेस  ( १९२९ -२०१६) हे गेल्या काही दशकातील नामवंत ख्रिस्ती लेखकांपैकी एक आहेत. त्यांची अनेक पुस्तके जगप्रसिद्ध झाली असून अनेकांना त्यांच्या ख्रिस्ती वाटचालीत खोल मार्गदर्शन करणारी ठरलेली आहेत. त्यांच्याशी जवळून परिचय असणाऱ्यांची साक्ष आहे की, ते अत्यंत दयाळू व नम्र असे होते व देवाबरोबर नम्रतेने चालणे हे एकच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. पुढील काही लेखांतून देवावर विश्वास ह्या त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद वाचकांना सादर केला जात आहे.

 

प्रार्थना व सुज्ञता

“पण आम्ही देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली (नहेम्या ४:९).
देवाचे सार्वभौमत्व असले तरी आपण आपली जबाबदारी पार पाडणे अगत्याचे आहे हे आपण पाहत आहोत. नहेम्याने प्रार्थना केली आणि सुज्ञतेची कृती केली. प्रार्थनेने आपण सार्वभौम देवावर अवलंबून राहतो. सुज्ञता म्हणजे सर्व नियम व उपलब्ध साधने जबाबदारीने वापरणे. “रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक त्यांच्यातले बलवान पुरुष ढालाईत, धारकरी, धनुर्धारी व युद्धकलानिपुण असे चव्वेचाळीस हजार सातशे साठ लढाईस जाण्याजोगे लोक होते. त्यांनी हगरी यतूर, नाफीश व नोदाब ह्यांच्याशी युद्ध केले. त्यांच्याशी लढण्यास त्यांना कुमक मिळून त्यांनी हगरी व त्यांच्याबरोबरचे इतर लोक ह्यांना पादाक्रांत केले, कारण युद्धसमयी त्यांनी देवाचा धावा केला; त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांची प्रार्थना ऐकली” (१ इतिहास ५: १८-२०). त्यांनी आरोळी केली, देवाने त्यांची प्रार्थना ऐकली कारण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
हे कसलेले योद्धे होते पण सुज्ञ होते. त्यांनी सर्व प्रकारची काळजी घेतली होती तरीही ते आपल्याच कुवतीवर व प्रशिक्षणावर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी देवाकडे आरोळी केली. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली कारण त्यांनी देवावर भरवसा ठेवला होता. देवाने सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले कारण त्यांनी प्रार्थना केली. देवाची मान्यता नसेल तर आपली सर्व साधनसामग्री कुचकामी ठरते. “परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर नगर  रक्षत नाही तर पहारेकऱ्याचे जगणे व्यर्थ आहे” (स्तोत्र १२७:१). बांधणे, रक्षण करणे हे प्रगतीचे प्रयत्न आहेत. नासधुशीपासून रक्षण करण्याचे प्रयत्न आहेत. जीवनातील सर्व जबाबदाऱ्या या वचनात एकवटलेल्या दिसतात. शारीरिक, बौद्धिक अगर आध्यात्मिक बाबी असोत आपले सतत बांधणी करणे, राखण करणे पहारा देणे ही कामे चालूच हवीत. ते काम देवाने सफल केले नाही तर आपले सर्व श्रम व्यर्थ आहेत. देव पहारेकरी आणि बांधणारे बदलतो असे कुठेही म्हटले नाही. म्हणजे प्रत्येक बाबीसाठी आपण त्याच्यावर अवलंबून राहिल्यास देव आपली भरभराट करतो. जे आपण करू शकत नाही त्यासाठी आपण देवावर अवलंबून राहायचे पण जे आपण करू शकतो त्यासाठीही आपण देवावर अवलंबून राहायचे. शेतकऱ्याला हंगामासाठी आपली सर्व कौशल्ये, साधने पणाला लावावी लागतात. तरीही त्याला बाह्यशक्तीवर अवलंबून राहावे लागतेच. कारण निसर्ग, सूर्य, कीटक, किडे, रोग ही सर्व प्रत्यक्षात सार्वभौम देवाच्या हाती असतात. त्यामुळे शेतकरी देवावर हवाला टाकतो. तसेच त्याने स्वत: करायची नांगरणी, पेरणी, लागवड, मशागत, ही योग्य प्रकारे करण्यासाठीही त्याला देवावरच अवलंबून राहावे लागते. हे सर्व तो कोठून शिकतो? त्याला बल कुठून प्राप्त होते? “जो देव सर्वांना श्वास देतो त्याच्याकडूनच ना? (प्रेषित १७:२५). सर्व बाबतीत आपल्याला देवावरच अवलंबून असावे लागते. असा काळ असतो जेव्हा आपण काहीच करू शकत नाही. असाही काळ असतो जेव्हा आपल्याला कामे करावीच लागतील. अरण्यातून जाताना इस्राएल लोक खाणे, पिणे, कपडेलत्ता या सर्वांसाठी देवावर अवलंबून होते. नित्याच्या गरजांसाठी पूर्णपणे देवावर अवलंबून राहायला देव त्यांना शिकवत होता (अनुवाद ८: ३,४). सर्व व्यवस्थित चाललेले असते तेव्हा आपण देवावर अवलंबून राहायचे. तसेच जेव्हा पैसे नसतात, आजाराचे निदान होत नसते, औषधे लागू पडत नसतात तेव्हाही देवावर अवलंबून राहायचे. आपलीही जबाबदारी पार पाडायची असते. “आळसाने घराचे छप्पर खाली येते. हाताच्या सुस्तीने घर गळते” (उपदेशक १०:१८). “हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरत नाही म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही” (नीती २०:४). आपण पूर्णपणे देवावर अवलंबून राहायचे असते. तरी प्रसंगरूप योग्य ती साधने सुज्ञपणे वापरण्याची जबाबदारी आपली असते. आपण काळजीपूर्वक चाललो तर पडणार नाही. हाड मोडणार नाही. ही काळजी घेतली नाही आणि पडझड झाली तर मग देवाच्या सार्वभौमत्वाला दोष द्यायचा नाही. खाण्यापिण्याची नीट काळजी घेतली नाही त्यामुळे आजार आला; आस्थेने काम केले नाही म्हणून काम सुटले; व्यवस्थित वक्तशीरपणे अभ्यास केला नाही म्हणून नापास झालो तर देवाला दोष द्यायचा नाही. देवाच्या सार्वभौम इच्छेवर आपला भरवसा हवा. पण देवावरील विश्वास आणि आपले जबाबदार वर्तन यात संघर्ष नको.

आपले अपयश आणि देवाचे सार्वभौमत्व
आपण सुज्ञतेने वागण्यात अपयशी ठरलो तर सार्वभौम देव निराश होतो का? मुळीच नाही. त्याच्या सार्वभौम योजनेत आपली पापे, अपयश यांचाही समावेश असतो. एस्तेर ४:१०, ११ व १४ वाचा. एस्तेरने अडचण सांगितली. राजाने तीस दिवस बोलावणे पाठवले नाही. विना परवानगी गेल्यास प्राणदंड होऊ शकतो. राजाची मर्जी झाली तर तो जीवदान देऊ शकतो. तेव्हा मर्दखय स्पष्ट करतो: जर एस्तेरकडून प्रयत्न झाला नाही तर देव यहूद्यांचा उद्धार कोठूनही करील. मर्दखयाचा हा पक्का विश्वास होता. एस्तेरच्या प्रतिसादावर देवाची अमर्याद सुज्ञता विसंबून नव्हती. एस्तेरच्या सहकार्याची त्याला गरज नव्हती. तिला साधन म्हणून वापरण्याची देवाची योजना होती म्हणूनच मर्दखय तिला म्हणतो, “याच कामासाठी तू कशावरून राजपदावर चढली नसली नसशील?” आपला उद्देश पूर्ण करण्यास देवाने एस्तेरला उंचावले तोच देव दुसऱ्या कोणालाही उंचावू शकत होता. लोकांच्या स्वतंत्र इच्छेतून व साध्यासुध्या प्रसंगातून देव कार्य करतो. तो आपल्या अदृश्य हाताने मार्गदर्शन करतो. तो सार्वभौम आहे म्हणून तो योग्य ती साधने पुरवतो. तो हताश, हतबल कधीच होत नाही. त्याचा हेतू पूर्ण करताना आपण केलेल्या पापदोषांबद्दल तो आपला न्याय देखील करतो व दोषी ठरवतो. त्याचे सार्वभौमत्व व आपली जबाबदारी यात संघर्ष होत नाही. दोन्हींवर समान भर दिला आहे. देवाचा उद्देश पूर्ण होण्यासाठी त्याला आपल्या जीवनात काम करू देणे हे महत्त्वाचे आहे.

 

 

हे लेख तुम्ही इतरांना पाठवू शकता . पाठवताना lovemaharashtra.org द्वारे प्रसारित असा उल्लेख करावा.