Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अक्टूबर 22, 2019 in जीवन प्रकाश

स्वत:वर भरवसा ठेवण्याचा मूर्खपणा                                                        जॉन ब्लूम

स्वत:वर भरवसा ठेवण्याचा मूर्खपणा जॉन ब्लूम

देव मानवी ज्ञानाच्या एवढा विरोधात का आहे? हे ऐका:

“मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” (१ करिंथ १:१९)

हे लढणारे शब्द आहेत. आणि प्रेषित पौलाद्वारे आणखी पुढे जाऊन तो म्हणतो: “कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही; तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणार्‍या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले” (१ करिंथ १:२१).

केवळ मानवी ज्ञानाने देवाशी आपली ओळख होणे तर शक्य नाहीच पण त्याच्याशी ओळख होताना मानवी ज्ञान हे मूर्खपणाचे आहे असा विश्वास आपण धरायला हवा. देव मानवी ज्ञानाशी असे युद्ध का करत आहे? पौल उत्तर देतो: “म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये” (१ करिंथ १:२९). ठीक आहे. मानवी फुशारकी ही देवाला दु:ख देणारी  आहे आणि तो ती नमवायला पाहतो हे समजण्यासारखे आहे. पण मानवी फुशारकी (गर्व) आणि मानवी ज्ञान / तर्क याचा काय संबंध आहे? देव त्यांना एकाच वर्गात का घालतो?

हे समजण्यासाठी आपण मागे -एकदम मागे- गेले पाहिजे आणि सुवार्ता एवढी महत्त्वाची का आहे हे प्रथम समजून घ्यायला हवे. तेथे देवाने आपली मुक्ती व आपले पवित्रीकरण का सिध्द केले हे आपण समजायला सुरवात करतो. आपण प्रत्येकाने त्याचे फळ त्याला सुपूर्त करावे अशी त्याची अपेक्षा आहे.

देवाचे ‘न’ लपणे म्हणजे काय?

आपल्यातील  बहुतेकांना ‘मूळ पाप’ माहीत आहे. पहिल्या स्त्री व पुरुषाने बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाल्ले- ह्या एकाच झाडाचे फळ खाण्याची देवाने मनाई केली होती. एवढी एकच मनाई. प्रथम देव असा बाप आहे की तो आनंदाने परवानगी देतो अशी त्यांना त्याची ओळख होती. मग त्यांनी हे मना केलेलं फळ का खाल्ले? कारण सापाने त्यांना असे सांगितले की, इतके ‘होय’ म्हणणारा देव त्यांना एकाच ‘नको’ या बाबतीत भुलवत होता. ते राहत असलेले इतके वैभवी जग देवाने त्याच्या समर्थ शब्दाने निर्माण केले होते, सापाने नाही. देवाने त्यांना वैयक्तिक जीवन, श्वास आणि सर्व पुरवले होते, सापाने नाही. आतापर्यंत देव हा त्यांचा अद्भुत मार्गदर्शक झाला होता, साप नाही. आणि त्याच्यावर भरवसा टाकल्याने त्यांना अमाप आनंद मिळत होता. मनाई केलेल्या झाडाचे फळ त्यांना घेता येईल असे ठेवण्याने  त्याच्यावर भरवसा ठेवण्याची अथवा न ठेवण्याची निवड , त्याच्यावर अगाध प्रेम करण्याची अथवा न  करण्याची निवड देण्याने देवाने त्यांना नैतिकतेची गाढ प्रतिष्ठा बहाल केली होती, सैतानाने नाही.

आता सैतान तेथे त्यांना अशी निवड करण्यात मदत करण्यासाठी आला होता. त्यांना दैवी पातळी मिळण्यास सक्षम करण्यापासून देव काहीतरी लपवत होता असे त्याने म्हटले. देवावर बौद्धिक रीतीने सर्वस्वी अवलंबून राहण्यापासून, स्वत: विचार करू देण्यासाठी, स्वातंत्र्य देण्यासाठी काहीतरी त्यांच्यापुढे सिद्ध होते. अशी गोष्ट की जी त्यांना मारणार नव्हती तर खऱ्या रीतीने जगू देणार होती. आणि हे काही तरी देवाने त्या झाडाच्या फळात लपवून ठेवले होते. “कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल” (उत्पत्ती ३:५).

काळेकुट्ट आत्मज्ञान

म्हणून त्यांनी सार्वभौम देवावर भरवसा न ठेवण्याचे, त्याची आज्ञा न पाळण्याचे व त्यावर अगाध प्रेम न करण्याचे  निवडले. त्यांनी आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहून ते फळ खाऊन मना असलेल्या ज्ञानाच्या गुप्त खजिन्याच्या मागे जाण्याचे ठरवले. “कारण त्या झाडाचे फळ शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले” (३:६).

देव आपल्या शब्दाला जागला. त्या फळाने खरंच त्यांना ज्ञान दिले “त्या उभयतांचे डोळे उघडले” (उत्पत्ती ३:७). पण साप आपल्या शब्दाला जागला नाही. त्या ज्ञानाने त्यांना देवासमान केले नाही. त्याने त्यांची अवस्था दयनीय केली. त्यांनी एक काळेकुट्ट आत्मज्ञान अनुभवले आणि लगेचच त्यांच्यामध्ये लज्जा निर्माण झाली. स्वत:च्या बुद्धीवर अवलंबून राहण्याचे दु:खद सत्य त्यांना लगेचच समजले. “मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात” (नीती १४:१२). जे ज्ञान त्यांना हवे होते ते त्यांना निर्माण करताना दिलेल्या क्षमतेला पेलवण्यापलीकडचे होते. आणि तेव्हापासून आपण सर्वजण त्या बोजड ज्ञानाच्या दडपणाऱ्या ओझ्याखाली कष्ट करत आहोत.

अत्यंत बोजड असे ज्ञान

असे ज्ञान पेलणारी व्यक्ती सर्वज्ञ असायला हवी – तिला सर्व शक्य पर्याय व आकस्मिक घटना आकलन करण्याची क्षमता हवी. आणि अशी व्यक्ती सर्वन्यायी असायला हवी. आपल्या सर्वज्ञतेसोबत पूर्ण नीतिमत्ता व सुज्ञतेने योग्य मार्ग निवडण्याचे आकलन करणारी पात्रता तिला हवी. आणि अशी व्यक्ती सर्वसमर्थ हवी. ह्या योग्य निवडलेल्या मार्गाला वास्तवात आणण्यासाठी तिला तसे व्यापक सामर्थ्य हवे.

पण मानवप्राण्याला तशी सर्व-क्षमता नाही याची सर्व मानवी इतिहास साक्ष देतो. आपल्या वैयक्तिक क्षमता ह्या इवल्याशा आहेत. आपल्या सर्वांच्या क्षमता एकत्र केल्या तरी आपल्याला समजेल की वास्तवाचा आपण फक्त पृष्ठभागच खरवडत आहोत. यामुळेच जेव्हा मानसिक, सामाजिक आणि राजकीय स्वास्थ्याचा विचार केला तर  केवळ मानवी ज्ञान हे आपल्याला एका अंताकडून दुसऱ्या अंताकडे, एका क्रांतीकडून दुसऱ्या क्रांतीकडे, एका सामाजिक प्रयोगाच्या शिखराकडून दुसऱ्या शिखराकडे नेते.

आदर्श समाज स्थापण्याचा प्रत्येक मानवी प्रयत्न भयाण ठरतो. प्रत्येक मानवी तत्त्वज्ञान व्यर्थता आणि निराशेत लोटते. नीती आणि नैतिकतेची व्याख्या करण्याचा प्रत्येक मानवी प्रयत्न अखेरीस एका क्रूर मानवी जुलुमाकडे नेतो.

ह्याचे कारण आपल्याला आपण  “देवासमान असण्यासाठी” निर्माण केले नव्हते. “जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाइटाविषयी साधेभोळे असावे” (रोम १६:१९) यासाठी निर्माण केले होते. आणि “देवाशिवाय दुसरा कोणी देव नाही” (स्तोत्र १६:२) यामुळे चांगल्यासबंधी शहाणे आणि वाईटासंबंधी साधे भोळे असणे म्हणजे “त्याच्यावर भरवसा ठेवणे व त्याच्या आज्ञा पाळणे” (स्तोत्र १११: १०).

आपण स्वत:साठी विचार करावा असे देवाने आपल्याला नक्कीच निर्माण केले होते. ह्याच कारणाने बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड बागेमध्ये होते. आपण केवळ स्वत:च  विचार करावा अशी देवाने आपली रचना केली नाही. प्रत्येक मर्यादित, परावलंबी अशा प्राण्याने कसे जीवन जगावे याच्या मार्गदर्शनासाठी सर्वज्ञ, स्वयंभू, निर्मात्यावर अवलंबून राहावे हे तर्काला धरून आहे. आपण आपल्या सर्व अंत:करणाने त्याच्यावर भरवसा ठेवावा हे अगदी रास्त आहे. ते शहाणपण आहे, ते सुज्ञतेचे आहे. आपल्यासाठी असंमजसपणाचे काय आहे तर आपल्या स्वत:च्या बुद्धीवर अवलंबून राहणे. ती मूर्खता आहे, वेडेपणा आहे.
आणि म्हणूनच एदेन बागेत तो सत्यानाश घडला. “आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून देण्याच्या”(१ पेत्र ४:१९) सुरक्षित संदर्भात न राहता मानवाने स्वत:साठी विचार करण्याच्या विवेकाशी अदलाबदल केली. त्यांनी स्वत:साठी विचार करण्याच्या मूर्ख वेडेपणाने आपल्या विश्वासू निर्मात्याशी असलेला विवेक तोडला आणि स्वत:ला विनाशामध्ये  लोटून दिले. याचा परिणाम त्यांनी मोठे दुष्कृत्य केले. “देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले” (रोम १:२१-२२).

ते फळ परत द्या

यामुळेच देव निव्वळ मानवी ज्ञानाच्या विरोधात आहे- आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहण्याची आपली बंडखोर वृत्ती. यामुळेच देव त्याच्या सुज्ञतेनुसार आपल्याला मानवाच्या बंडखोर ज्ञानाद्वारे त्याला ओळखून घेण्यास परवानगी देत नाही. आपण आपल्या नाही तर त्याच्या शर्तीवर त्याच्याकडे यावे अशी त्याची अपेक्षा आहे. बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ त्याला परत करावे अशी त्याची इच्छा आहे. मग पुन्हा एकदा आपल्याला जीवनाच्या झाडाकडे जाण्यास मुभा मिळेल.

“आणि म्हणूनच ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे” (१ करिंथ १:१८). देव मानवी ज्ञानाची इच्छा समजतो की त्याला स्वतंत्रपणे बरे आणि वाईट याची व्याख्या करायला हवी, आणि देवानुसार हा मूर्ख अहंभाव आहे व त्याने नम्र होण्याची गरज आहे. या ग्रहावर जो अधर्म माजला आहे – जो आपल्या कल्पनेपलीकडे गेला आहे – त्याला उत्तर देण्याचे देव नाकारतो ह्यामुळे मानवी ज्ञानाला अपमान वाटतो. आणि ते येशूचे वधस्तंभावरचा देखावा, रिकामी कबर, सार्वकालिक जीवनाचे अभिवचन, मूर्खता असे पाहते आणि काही लोक अशा विचित्र गोष्टीवर कसा विश्वास ठेवतात ह्या ‘मूर्खतेचे” नवल करते. ह्या गोष्टी मानवजातीला कसा उपाय आहेत हे ते समजू शकत नाही. पण ज्यांचे तारण झाले आहे, ज्यांनी वधस्तंभाकडे, रिकाम्या कबरीकडे, पाहिले आहे, ज्यांना अनंतकलिक जीवनाचे अभिवचन मिळाले आहे, ज्यांनी मार्ग, सत्य व जीवन पाहिले आहे त्यांना सुवार्ता ही ‘देवाचे सामर्थ्य व ज्ञान आहे’ (१ करिंथ १:१८, २४). आपल्याला यातना देणाऱ्या व गोंधळात टाकणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत असे नाही. पण आपण पाहत आहोत की, “त्याच्या ठायी ज्ञान व बल आहेत; युक्ती व समज ही त्याचीच आहेत” (ईयोब १२:१३). आणि “परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात” (नीती १:७). “जो आपल्या मनावर भरवसा ठेवतो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो” (नीती २८:२६). “देवाच्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो” (स्तोत्र ३६:९).

आणि जो प्रकाश आपण पाहिला आहे  “तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे” (२ करिंथ ४:६). यामुळे येशू आपल्याला “देवापासून ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे” (१ करिंथ १:३०).

या व्यर्थतेच्या युगात सृष्टीबरोबर आपण दहा हजार प्रकारांनी कण्हतो (रोम ८:२०). पण आपल्याला समजण्यापलीकडे असलेली शांती मिळाली आहे (फिली. ४:७). अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेवून आपल्याच बुद्धीवर अवलंबून न राहिल्याने (नीती ३:५)  जे फळ परत करतात त्यांना देव आनंदयुक्त असे स्वातंत्र्य बहाल करतो असे आपण अनुभवले आहे.