Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अक्टूबर 11, 2022 in जीवन प्रकाश

हे जग सोडण्यास भिऊ नका

हे जग सोडण्यास भिऊ नका

ग्रेग मोर्स

जुने संत मरणासंबंधी बोलताना जे मी ऐकतो त्यामुळे कदाचित तुम्हालाही माझ्याप्रमाणे अस्वस्थ वाटेल.
“ जो मरणासाठी तयारी करत नाही तो मुर्खाहून मूर्ख आहे. तो वेडा आहे.” चार्ल्स स्पर्जन यांनी सुरुवात केली.

 “मान्य आहे” डॉ. मार्टिन लोईड जोन्स म्हणाले. “ज्या क्षणी आपण जगात प्रवेश करतो त्याच क्षणी आपण त्याच्यातून बाहेर जाऊ लागतो, ह्या शुद्ध सत्याकडे लोक दुर्लक्ष करत आहेत.”

“पण ही सत्ये ख्रिस्ती लोकांना नाशकारक  आणि दु:खकारक वाटायला नकोत.” स्पर्जन उत्तरले. “ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील अखेरचे क्षण हे सर्वात चांगले क्षण असतात, कारण ते स्वर्गाच्या अगदी जवळ असतात.”

“मी याच्याशी अगदी सहमत आहे” रिचर्ड सिब्स म्हणाले. “आता मरण हे माझ्यासाठी मरण नाही, तर मरण हे माझ्या दु:खाचे मरण असेल, माझ्या पापाचे मरण असेल, माझ्या भ्रष्ट वृत्तीचे मरण असेल. पण मरण हे आनंदाच्या बाबतीत माझा जन्मदिन असेल.”

“जेव्हा ख्रिस्त मला बोलावेल, तेव्हा मी शाळेतून परतणाऱ्या मुलाप्रमाणे आनंदाने जाईन.” जडसन यांनी भर घातली.

“मी काही बोलू का?” केल्विन यांनी विचारले. “ जो कोणी आपल्या मरणाच्या दिवसाकडे आणि अंतिम पुनरुत्थानाच्या दिवसाकडे आनंदाने पाहत नाही त्याने ख्रिस्ताच्या शाळेत काहीच प्रगती केली नाही असे आपण म्हणू शकतो.”

“अगदी बरोबर.” थॉमस ब्रूक म्हणाले. “तुम्ही घरी जायला का कू करताय यामुळे तुमच्या स्वर्गीय पित्याला काहीच किंमत दिली जात नाही.”

“आणि आपण का का कू करावी?” सॅमुएल बोल्टन विचारते झाले. “विश्वासी व्यक्तीची उत्तम वेळ आल्यावरच ती मरणार ही सुसंधी नाही का? जोपर्यंत त्यांची मरणाची तयारी होत नाही तोपर्यंत ते जाणार नाहीत.”

“अगदी ठीक बोललात. देवाच्या मुलासाठी मरण हे सर्व दु:खाची प्रेतक्रिया आहे.” थॉमस वॉटसनने आपले मत मांडले. “मरण हे खऱ्या संताला बंदुकीच्या निशाण्यापासून दूर करील आणि पाप व संकटापासून त्याला मुक्त करील.”

“अगदी नक्की.” जॉन बन्यन म्हणाले. “मरण हा केवळ एक रस्ता आहे – तुरुंगातून राजवाड्याकडे जाण्याचा.”

मी ऐकत असताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न माझ्या कानावर पडला. “हे जग तुमच्याशी इतके दयाळूपणे वागले आहे का की ते सोडताना तुम्हाला इतके दु:ख होतेय?” सी. एस लुईस आता बोलू लागले. “आपले घर हे दुसरीकडे आहे असा जर आपला खरा विश्वास असेल आणि या जीवनात आपण प्रवासी असू, तर त्या घरी जाण्याकडे आपण अपेक्षेने का पाहू नये?”

“ऐका, ऐका” विल्यम गर्नल उद्गारले, “ तुमची स्वर्गाची आशा तुमच्या मरणाच्या भीतीवर मात करू दे. जर तुम्ही मरण्याद्वारे जीवनाची अपेक्षा धरत असाल तर मरणाची भीती तुम्हाला का वाटावी?”

“मी तर बांधाबांध करून माझ्या प्रयाणाची वाट पाहत आहे.” जॉन न्यूटन यांनी घोषणा केली. “या असल्या जगात कायम कोण राहील?”

या संतांच्या प्रार्थना सुद्धा आपल्याला दोष देतात. मी जॉर्ज व्हीटफिल्ड यांची प्रार्थना ऐकू लागलो. “प्रभू मला मरणासाठी उतावीळ  करणाऱ्या पापी इच्छेपासून सावर. मला अधीर होऊ देऊ नको. हा आशीर्वादित बदल माझ्यामध्ये येण्यासाठी मी शांतपणे वाट पाहण्याची इच्छा करतो.”

हा माझ्यावर शेवटचा आघात होता. हे लोक मरणाची वाट पाहत होते. लवकर जाणे ही त्यांच्यासाठी “बढती” होती.  मी मान खाली घातली. मला कधी असे वाटत नाही, की कधी मी असा विचारही करत नाही. खरंच माझा स्वर्गावर विश्वास आहे का? माझ्या प्रभूवर माझे खरंच का प्रेम आहे?

या जीवनाला बिलगून

तर साहित्य संग्रहाच्या ख्रिस्ती व्यक्तींच्या उद्गारातून जात असताना मला हे समजण्यास मदत झाली की माझे शिष्यत्व हे जगिक संस्कृतीकडे झुकत आहे, ते फक्त आपल्याच पावलापुरते पाहते आणि जगिक आहे.

मी तर बांधाबांध करून माझ्या प्रयाणाची वाट पाहत आहे का? मी तर अजून काही दशकांनी तयारी करण्याची आस बाळगतोय.

“ हे जग तुमच्याशी इतके दयाळूपणे वागले आहे का की ते सोडताना तुम्हाला इतके दु:ख होतेय?”
जर मी माझ्या जीवनाला दर्जा देऊ शकलो तर दहा पैकी पाच गुण देईन. म्हणजे कदाचित…

“जो कोणी आपल्या मरणाच्या दिवसाकडे आणि अंतिम पुनरुत्थानाच्या दिवसाकडे आनंदाने पाहत नाही त्याने ख्रिस्ताच्या शाळेत काहीच प्रगती केली नाही असे आपण म्हणू शकतो.” हे तर खूपच प्रखर आहे.

“तुम्ही घरी जायला का कू करताय यामुळे तुमच्या स्वर्गीय पित्याला काहीच किंमत दिली जात नाही.” हा विचार सन्मान्य आहे. ख्रिस्तालाही या विचारामुळे किंमत दिली जात नाही.

ही माणसे ज्या सत्यावर मी विश्वास ठेवतो ते सत्य दररोज जगत होती. ते त्यामध्ये राहत होते, ख्रिस्ताकडे जाण्याची उत्कट अपेक्षा करत. जरी त्यांचे आपल्या कुटुंबावर प्रेम होते, पृथ्वीवरील गोष्टींचा आनंद त्यांनी घेतला आणि या जगात चांगले काम केले तरीही जेव्हा त्यांचा धनी परवानगी देईल  त्या क्षणीच त्या मृत्युच्या थंडगार पाण्यात थेट उडी घ्यायला त्यांना भीती वाटत नव्हती. पौलाप्रमाणेच त्यांचाही विश्वास होता की, “येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असणे… देहात राहण्यापेक्षा फारच चांगले आहे” (फिली. १:२३).

मला समजले की मी तर ह्या जगात शेकोटीजवळ बसून पांघरुणात लपेटून घेतलेला आहे. मला इथे खूप सुरक्षित वाटत होते.

हद्दपारीमध्ये कोरलेले थडग्यावरचे शब्द

माझे ह्रदय इथे जास्त राहते, तिथे खूपच कमी. मला आठवण करून द्यायला हवी की, “तुमचे जीवन देवाबरोबर ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेले आहे” (कलसै. ३:३). हे जग माझ्या भावनांना मॉलमध्ये  घुटमळतत राहण्याची भुरळ घालत असताना मी स्वर्गाचा शिष्य असण्याची अधिक इच्छा करायला हवी. आणि जर तुम्ही येशूवर प्रेम करता पण येणाऱ्या जीवनाचा खूपच थोडा विचार करता तर तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल. अरेरे! ख्रिस्ताने आपल्यासाठी खंडणी भरली आहे. आपण जर तो आल्यानंतर आपण जीवन जगत राहणार आहोत तर आपल्या थडग्यावरचे शिलालेख पुढीलप्रमाणे असायला हवेत:

“हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करत असल्याचे दाखवतात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्यांची लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे” (इब्री ११:१३-१६).


अब्राहामाने विश्वासाने मेसोपोटेमिया येथील घर सोडले त्यावेळी देव त्याला कुठे नेत होता त्याची त्याला कल्पनाही नव्हती (इब्री ११:८). परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्‍यात त्याची वस्ती होती’ (इब्री ११:९). अब्राहामाचे डोळे  दुसरीकडे लागले होते. “कारण पाये असलेल्या आणि देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता” (११:१०). तो आणि त्याच्या पुत्रांच्या बोलण्यामध्ये स्वर्गाचे चिन्ह होते. ते या जगात निर्वासित व प्रवासी असे राहणार होते (उत्पत्ति २३:४; ४७:९). एकदा देवाने त्यांना वाचवल्यानंतर आपल्या आशा या जगासाठी पुन्हा  खुल्या करण्यास त्यांनी नकार दिला.  देवाच्या वचनाइतकाच विस्तीर्ण, आणि त्याच्या वचनाइतकाच निश्चित असा तो दूरचा देश त्यावरच त्यांची निष्ठा होती. त्यांनी स्पष्ट केले की हातांनी न बांधलेल्या अशा  मायभूमीकडे ते जात होते.

जग त्यांनी परतावे म्हणून मोह घालत असताना त्याचा गळ आकडीवरच मागे राहिला. मनुष्याच्या डळमळीत राज्यात राहण्यापेक्षा ते स्वर्गीय शहर पुढे ठेवून, या जगात तंबूमध्ये राहणे त्यांनी पसंत केले. त्यांनी एका चांगल्या देशाची -स्वर्गीय देशाची इच्छा धरली. आणि देवाला “ अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव” असे म्हणवून घेण्यास लाज वाटली नाही (निर्गम ३:६). ज्या देवामध्ये त्यांनी एवढी आशा धरली त्या देवाला या लोकांची यत्किंचितही लाज वाटली नाही. कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.

अजूनही सागरामध्येच

तर तुमचे मन विशेषकरून या जगात स्थिर आहे की पुढच्या?

हे जग आपले घर नाही. आपण अजून खऱ्या रीतीने जे होणार ते झालो नाही. आपण खिडकी उघडून ते कबुतर या जगात सोडले आहे – ते या जलमय कबरेमध्ये  जागा न मिळाल्याने आपल्याकडे परतते की नाही हे पाहत. पण लवकरच या जगाचे पाणी आटणार आहे. न्यायाच्या लाटा वाढत जात राहतील आणि ओसरतील. नवे आकाश आणि नवी पृथ्वी येईल. आणि आपले सामर्थ्यशाली कबुतर त्याच्या तोंडात शत्रूंसाठी तलवार घेऊन खाली उतरेल आणि आपल्यासाठी एक जैतुनाची डहाळी घेऊन.
तोपर्यंत वाट पाहत राहा, आशा धरत राहा, समजून घेत राहा, तंबूत राहा.  आपला पिता आपल्याला बोलावील, या जगापासून आपण सुटले जाऊ त्या क्षणासाठी वाट पाहत.