Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 29, 2018 in जीवन प्रकाश

देवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी 

देवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी 

                                                                                                                                                        लेखक: जेरी ब्रिजेस

जेरी ब्रिजेस  ( १९२९ -२०१६) हे गेल्या काही दशकातील नामवंत ख्रिस्ती लेखकांपैकी एक आहेत. त्यांची अनेक पुस्तके जगप्रसिद्ध झाली असून अनेकांना त्यांच्या ख्रिस्ती वाटचालीत खोल मार्गदर्शन करणारी ठरलेली आहेत. त्यांच्याशी जवळून परिचय असणाऱ्यांची साक्ष आहे की, ते अत्यंत दयाळू व नम्र असे होते व देवाबरोबर नम्रतेने चालणे हे एकच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. पुढील काही लेखांतून देवावर विश्वास ह्या त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद वाचकांना सादर केला जात आहे.

 

“पण आम्ही देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली” (नहेम्या ४:९).

आपण चुका करू, पुरेसा अभ्यास करणार नाही तर आपण नापास होऊ. आपण आपल्या चुकीमुळे अपघातात सापडू आणि हे सारे देवाच्या सार्वभौमत्वाखाली घडते असे म्हणू तर ही कृती वचनाला धरून नसून मूर्खपणाची आहे.

 

सार्वभौमत्व आणि प्रार्थना

वादळामुळे गाड्या बंद आहेत. त्यामुळे मी परिषदेला वेळेवर पोचू शकणार नसेन. अशा वेळी “ तू या वादळाचा स्वामी आहेस तुझी इच्छा असल्यास तू मला वेळेवर नेशील, मी चिंता करीत नाही” एवढेच म्हणून मी गप्प बसायचे नाही तर तेथे पोचण्यासाठी प्रयत्न करीत राहायला हवेत. देवाचे वचन म्हणते “कशाचीही काळजी करू नका तर सर्व प्रसंगी आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा” (फिलीपै ४:६). म्हणजे आपण प्रार्थनेत राहायचे. देवाचे सार्वभौमत्व मान्य केल्यावर प्रार्थनेला उत्तेजन मिळते. नशिबावर हवाला टाकायचा नाही. सबब म्हणून देवाचे सार्वभौमत्व पुढे करायचे नाही. प्रेषित ४:१८-३१ मध्ये आपण पाहतो, पेत्र व योहानाला सन्हेद्रीनने ताकीद दिली होती की, येशूविषयी शिकवण द्यायची नाही. विश्वासीयांना त्यांनी ही गोष्ट सांगितली. त्यांनी एकत्रित होऊन देवाकडे प्रार्थना केली, “हे प्रभो, आकाश, पृथ्वी, समुद्र…. यांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. येशूविरुध्द विदेशी लोक, इस्राएल लोक, पिलात, हेरोद एकत्र आले. यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे. तर आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा. आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर (प्रे. कृ. ४:२४, २८-३०). देवाच्या सार्वभौमत्वावर शिष्यांचा विश्वास होता. पण त्या सार्वभौमत्वामुळे एकत्र येऊन प्रार्थना करण्यास त्यांना उत्तेजन मिळाले.  देव प्रार्थनेचे उत्तर देणार असा त्यांनी विश्वास ठेवला. त्या घटनेत देवाचे सार्वभौमत्व त्यांनी ओळखले पण भविष्यात दैवी घटना घडतील असे त्यांनी गृहीत धरले नाही. आपल्याला यरूशलेमात, यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी केले आहे एवढेच त्यांना माहीत होते. म्हणून ज्या सार्वभौम देवाने साक्ष देण्याची आज्ञा दिली आहे तोच अडथळे दूर करील असा त्यांनी विश्वास ठेवला.  आणि फक्त आज्ञापालन करणे एवढेच त्यांनी केले.

प्रार्थना करताना देव सार्वभौम आहे हे गृहीत धरले तरच देव प्रार्थनेचे उत्तर देईल. देवाचे सार्वभौमत्व, त्याची सुज्ञता व त्याची प्रीती ही आपल्या विश्वासाचा व प्रार्थनेचा पाया होत. त्यातून आपण देवावर भरवसा टाकल्याचे सिध्द होते. विश्वासाशिवाय प्रार्थना करणे हवेत किल्ले बांधल्यासारखे आहे. प्रार्थनेशिवाय विश्वास ठेवणे हेही व्यर्थ. जो देव देण्याचे वचन देतो तोच त्याच्या वचनावर विश्वास ठेवण्याचे आव्हान करतो. प्रार्थना करण्याची आज्ञा देतो, त्याच्या आज्ञांचे पालन करायला सांगतो. तो देईल, पण मागितल्याशिवाय देणार नाही. पौल तुरुंगातून आपला मित्र फिलेमोन याला लिहितो, “माझ्यासाठी बिऱ्हाड, (खोली) तयार कर. कारण तुमच्या प्रार्थनांनी मी तुम्हांस देणगी असा दिला जाईन अशी मला आशा आहे” (फिलेमोन २२).  त्याने देवाची आशा गृहीत धरली नाही तर ती घडून येईल अशी आशा धरली. मी तुम्हांस देणगी असा दिला जाईन. देव त्याच्या सार्वभौमत्वाने आपली तुरुंगातून सुटका करायला देव समर्थ आहे हे तो जाणत होता, म्हणून तो फिलेमोनाला प्रार्थना करायला सांगतो. प्रार्थना हे त्याच्यामध्ये असलेल्या विश्वासाचे प्रकटीकरण होते. स्तोत्र ५७:२ म्हणते; “माझे सर्व सिद्धीस नेणाऱ्या परात्पर देवाचा मी धावा करीन.”  देवाचे सार्वभौमत्व आपली प्रार्थनेची जबाबदारी नाकारत नाही तर उलट विश्वासाने प्रार्थना करायला प्रेरणा देते.

 

सार्वभौमत्व व सुज्ञता

आपण सुज्ञतेने वर्तन करण्याची जबाबदारी देव नाकारत नाही. नियम, कायदे व देवाचे वचन या साधनांद्वारे आपण स्वत:ला व इतरांनाही इजा पोचू द्यायची नाही. शौल दाविदाला ठार करू पाहत होता. दावीद त्याला टाळत राहिला. शौल त्याला मारण्यासाठीच प्रयत्नशील राहिला. शौलानंतरचा राजा म्हणून दाविदाला केव्हाच अभिषेक झाला होता. स्तोत्र ५७:२ प्रमाणे दाविदाचा विश्वास दृढ होता की देव त्याचा उद्देश पूर्ण करील. तरी शौलाने ठार करू नये म्हणून दाविदाने खूप काळजी घेतली. देवाच्या सार्वभौमत्वावर हवाला टाकून तो गाफील राहिला नाही. तर देवावर अवलंबून शहाणपणाने वागला. पौलाचे उदाहरण पहा. रोमच्या प्रवासात तो चक्रीवादळात सापडला. ही घटना प्रेषित २७ मध्ये आहे. वाचण्याची सर्वांनी आशा सोडली होती तेव्हा पौल म्हणतो, “धैर्य धरा. तुम्हातील कोणाचाही नाश व्हावयाचा नाही. तारवाचा मात्र होईल. ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला भिऊ नको. तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. तुझ्याबरोबर तारवात जे आहेत ते अवघे देवाने तुला दिले आहेत. धीर धरा माझा देवावर भरवसा आहे की, जसे मला त्याने कळवले तसेच घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर जाऊन पडावे लागेल” (प्रे. कृ. २७:२२-२६). स्वर्गातून पौलाला प्रकटीकरण झाले. काही खलाशी पळून जाऊ पाहत होते (२७:३०). हे राहिले नाहीत तर तुमचे रक्षण व्हायचे नाही असे पौलाने सांगितले (२७:३१). कुशल खलाशांचे अस्तित्व संरक्षणासाठी महत्त्वाचे होते हे पौलाने ताडले होते. त्यानुसार कृती घडवायचा त्याने प्रयत्न केला. देवाचे सार्वभौमत्व आणि आपली सुज्ञता यात त्याने गल्लत केली नाही. आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले नाही. त्या परिस्थितीत पौलाला देवाचा हेतू समजला तसा आज आपल्याला समजणार नाही. पण वचनातील कर्तव्ये पार पाडताना आपण सबबी सांगायच्या नाहीत ही काळजी घ्यायची. देव काही साधनांद्वारे काम करतो. ती साधने त्याने आपल्यासाठी सिद्ध केलेली असतात.

नहेम्या ४:७-८ मध्ये बुरूज बांधताना शत्रूंनी यरूशलेमावर हल्ला केला. तेव्हा वचन ९ नुसार नहेम्याने प्रार्थना केली. पहारेकरी नेमला. प्रार्थनेला सुज्ञतेची जोड दिली. १६ ते १८ वचनात आणखी सावधानता राखली. अर्धे लोक काम करीत होते, अर्धे लोक सशस्त्र पहारा देत होते. एका हाताने काम करत एका हाताने शस्त्र बाळगत. वचन २० नुसार  “आमचा देव आमच्यासाठी लढेल” असे म्हणून देवाच्या सार्वभौमत्वावर त्याने विश्वास ठेवला पण उपलब्ध सर्व साधनांचा त्याने वापर केला. त्या साधनांवर देव आशीर्वाद पाठवील असा विश्वास ठेवला. प्रार्थना हे आपले मूलभूत शहाणपण. आपली परिस्थिती पाहून योग्य सुज्ञतेसाठी प्रार्थना करायची. यहोशवा ९:१४ मध्ये गिबोनी लोक फाटके कपडे घालून वाळक्या भाकरी घेऊन आले. इस्राएलांनी देवाला न विचारता त्यांच्यासोबत अन्नग्रहण केले. गिबोन्यांनी फसवून तह केला. वास्तविक त्यांचा नाश करायचा होता पण त्यांना वाचवण्यात आले. इथे इस्राएल लोक प्रार्थना करून सुज्ञपणे वागले नाहीत. प्रार्थनेतून दूरदृष्टी, सुज्ञता व परिस्थिती जाणून घेण्याची शक्ती मिळते. ती त्यांना मिळाली नाही. “मसलत मिळाली नाही तर बेत निष्फळ होतात” (नीती १५: २२). मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात. “मनुष्याचे मन मार्ग योजते पण परमेश्वर त्याच्या पावलांस मार्ग दाखवतो” (नीती १६:९). देवाच्या सार्वभौम इच्छेशिवाय कोणत्याही योजना यशस्वी होत नाहीत. लोकांचे कितीही सुज्ञतेचे सल्ले असले तरी आपल्या सार्वभौम देवाच्या इच्छेशिवाय ते सिद्धीस जात नाहीत .

हे लेख तुम्ही इतरांना पाठवू शकता . पाठवताना lovemaharashtra.org द्वारे प्रसारित असा उल्लेख करावा.