Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 12, 2019 in जीवन प्रकाश

मौल्यवान क्षण तुम्हाला ओलांडून जाऊ देत                                           लेखक : जॉर्ज मोर्स

मौल्यवान क्षण तुम्हाला ओलांडून जाऊ देत लेखक : जॉर्ज मोर्स

आम्ही एकटेच बसलो होतो, कित्येक मैल दूरवर कोणीच  दिसत नव्हते. शिखराच्या टोकावरून पलीकडे ‘लेक सुपीरियर’ हे तळे दिसत होते व त्याच्या लाटा खडकांवर आदळत होत्या. एकटेपणाच्या ताज्या हवेचा श्वास आम्ही घेतला. मित्रांबरोबर इथून तिथे फिरल्याचे मला आठवते. हे रेकोर्ड करू का? तिला नंतर हे पहायचे असेल तर? तिला दुसऱ्यांना दाखवायचे असेल तर? त्या दिवशी जे बोलले गेले ते फक्त मला, माझ्या पत्नीला आणि देवाला ठाऊक आहे. ते स्मित, ते हास्य – त्या भल्यामोठ्या खारी – ते रडणे. तिने मला अखेर होकार दिला. देवाचे आणि माझे स्मित तिच्या हास्याला मिळाले. आमच्या जीवनातले हे सर्वांत मौल्यवान क्षण रेकोर्ड केले गेले नाहीत. ज्यांचा आम्ही मनमुराद आनंद घेतला ते सुंदर क्षण आमच्या बोटांतून निसटून गेले.

जेव्हा सुंदर क्षण निसटून जातात

बटन दाबताच आपण आपल्या मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी पाहू शकतो. जायंट व्हीलवरचे तुमच्या मुलांचे हसणे तुम्ही रेकॉर्ड करू शकता. वडिलांचा अखेरचा  सुरकुतलेला चेहरा पाहताना त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेला तो जोक आठवतो. जीवन हे वाफ आहे आणि देवाने कधी नव्हे ती या पिढीला आपले थोडेसे धुके पकडून ठेवायची क्षमता दिली आहे.

पण पतित मानवाला दिलेल्या सर्व देणग्या हाताळताना त्यांचा गैरवापर होऊ शकतो. त्या मूल्यवान क्षणांपेक्षा तो फोटो अधिक मोलाचा होऊ शकतो. काही खास क्षण येताच ते पकडावे म्हणून हाताशी  मोबाईल ठेवण्याचा ताण कोणाला जाणवत नाही? मानवजातीने देवाची अदलाबदल प्रतिमांच्या रूपाशी केली (रोम १:२३). त्याने आपल्याला दिलेले हे मौल्यवान क्षण  त्यांच्या प्रतिमेत करून आपण अशीच अदलाबदल करत आहोत का? पूर्वी कोणाला झाला नाही तो मोह आपल्यापैकी प्रत्येकाला होतो, तो असा की जीवन जगण्याचे विसरून त्याचे चित्रण करत राहायचे.

आठवणी साठवणारे

भूतकाळातल्या आठवणी पकडण्याचा आनंद जरूर घ्या. पण फोटो घेत राहणे व साठा करणे अत्यावश्यक होऊन बसते – जेव्हा पुढचा फोटो अपलोड करण्यासाठी आपण जगू लागतो, जेव्हा आपल्यापुढच्या शुध्द सौंदर्याचा आपण आनंद घेऊ शकत नाही, जेव्हा आपण सुट्टी नसतानासुद्धा  एक हौशी फोटोग्राफर बनतो, जेव्हा ड्रायव्हिंग लायसनसारखे आपण सेल्फीची स्टिक घेऊन मिरवत असतो तेव्हा आपण आठवणी साठवणारे बनतो. आपल्याकडे फोन नव्हता म्हणून आपण मौल्यवान क्षण गमावले नाहीत तर आपण ते गमावले. किशोरवयीन जसे जेवायला बसले असताना मेसेज पाठवत असतात तसे आपण विशेष क्षण आपल्या डोळ्यांनी पहायला विसरलो आहोत. आपण जीवन जगण्याचा पहिला क्षण नंतर पाहण्यासाठी पुढे ढकलतो, अस्सल आहे त्याची आपण प्रतिमेशी देवाणघेवाण करतो आणि तसे करताना नकली आनंद मिळवतो.

आपला कॅमेऱ्याचा वापर खूप सांगून जातो. मला वाटते तो आपल्याविषयीची तीन महत्त्वाची सत्ये दाखवतो.

१. आपण मरणाला घाबरतो

आठवणी पकडणारे -जे आपल्या सर्वांना माहीत आहे पण क्वचितच विचारात घेतो- ते दाखवतात की, जीवन नश्वर आहे. “आज आहे उद्या होते” हे आपल्याला हादरवून सोडते. अगदी कालच आपण गोट्यांचा डाव मांडत होतो  व सुट्टीत लपाछपी खेळत होतो.
आपल्याला मरणाची भीती वाटते व ही भीती आपल्याला “आयुष्यभर दास्यात” बांधून ठेवते (इब्री २:१५). कबर खुणावत असते, भिंती जवळ येत राहतात, भीती आपल्याला घेरून टाकते आणि त्या गंभीर कापणाऱ्याची आपण वाट पाहत राहतो. अंधारात सावल्या भटकत असताना आपण त्या सालपटातून जितके आणि जेव्हा जेव्हा जीवनात मिळवता येईल तेवढे पिळून काढतो.

एका दृष्टीने आठवणी पकडणे हे स्मरण करण्यास योग्य असा प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न असतो. आपण भूतकाळाचा दरवाजा उघडा ठेवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्याला पुढे मागे जात राहत दोन्ही मोसमांतील उत्तम गोष्टी चाखता येतात. अशा गोष्टींचा एकदाच आनंद घेण्याचे समय जीवनाच्या अल्पतेमुळे फार थोडे होतात.
पण आपली धास्ती बहुधा आपल्यावरच उलटते. हे क्षण आपण पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अडथळा येतो. मुलांच्या खेळांचे चित्रण करताकरता आपण मुलांशी खेळण्याचे थांबवतो. थांबा, फोन काढा, पुढे जा. हे जीवनाच्या वाक्याच्या मध्येच पूर्णविराम दिल्यासारखे होते.

२. आपण अमरत्वाचा शोध करतो

नुकताच मी एका मृत माणसाशी बोललो. त्याने त्याचे प्रोफाईल काही दिवस अपडेट केले नव्हते. मग मला समजले की तो एक आठवड्यापूर्वीच मरण पावला. हा प्रसंग मला जरा विचित्र वाटला. व्हॉट्स अपच्या त्याच्या पोस्टवर विनोदी टोमणे होते, त्याच्या प्रोफाईलच्या चित्रात तो हसत होता. त्यावरचे त्याचे व्यक्तिमत्व व चित्र पूर्वीसारखेच होते. त्याचे  जीवनकार्य एक बटन दाबल्यास उपलब्ध होते. आपल्यातले अनेक जण आशा करतो तसे तो इंटरनेटमध्ये टिकवला गेला होता. तो जरी मेलेला होता तरी जगत आहे.
उत्तम आठवणी गोळा करणे हे जीवन देऊ करत असलेल्या पेयाची लज्जत घेण्यासारखे आहे. अमरत्वाचा एक क्लिक दाबण्यासारखे. सायन्सचा जरी मरणावर इलाज झालेला नाही तरी तंत्रज्ञान आपली प्रतिमा, आपले विचार, वर्ल्डवाईड वेबवरची आपली नावे, लांबणीवर टाकू शकते. आपल्यातले काही जण आपले फोन भूतकाळातले दरवाजे खुले व्हावे म्हणून नव्हे तर असंख्य प्रेक्षक मिळावे म्हणून वापरतो. आणि एखाद्या फुटकळ नटासारखे आपण जितके इतरांचे लक्ष वेधून घेता येईल तितके सोशल मिडीयावर आपला जीवनभरचा वेळ दवडतो, अखेरीस रंगमंचावरून आपण बाहेर जाऊपर्यंत.

आपली आठवण खूप काळ राहावी असे आपल्याला वाटते. आपण काही त्या जनावरांसारखे नाहीत जे नावारहित राहण्यात व मरण्यात तृप्त असतात. आपल्याला अनंतकाल जगण्यासाठी निर्माण केलेले आहे.  “देवाने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे” (उपदेशक ३:११). असामान्य क्षण गमावले जाऊ नयेत म्हणून आपण झुरतो. पण ज्याने मरणाचे साम्राज्य नष्ट केले (इब्री २:१५)  त्याच्यावर भरवसा ठेऊन भीतीवर विजय मिळवत नाही.  आपण देवाने देणगी म्हणून दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर ते कधीही देऊ करणार नाही त्यासाठी वापरतो : अनंतकालिक जीवन. आपण भीतभीत आपली नावे टायटॅनिकच्या भिंतीवर लिहितो.

३. आपण आपली आशा विसरलो आहोत

आपल्या फोटोंचा ढीग सुचवती की आपण ख्रिस्ती लोक सुद्धा या जीवनाला हातांनी ओढून धरतो. जे सुंदर ते आपण इतके कवटाळून ठेवतो की जसे ते आपल्याला परत कधीच दिसणार नाही.  हे जग आपले घर नाही अशी आठवण करून दिल्यास आपल्याला धास्ती वाटते पण आपण तसे बोलून दाखवत नाही. “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत” (१ योहान २:१७). हे सत्य आपण वाचतो पण ते आपल्याला दु:खी करते. हे समजण्यासारखे आहे. केवळ हे जगच आपल्याला माहीत आहे. आपल्याला सर्व आनंद इथेच मिळाला आहे. आपले प्रेमस्थान इथेच आहे. पण आपला विश्वास आपले प्राधान्य बदलतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत” (२ करिंथ ४:१८). जगाचे अखेरचे पान उलटत असताना “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो” (१ योहान २:१७). आपल्यासाठी जे उत्तम ते अजून येणार आहे. आपण आपल्या अमरत्वाबद्दल शंका घेऊ नये किंवा त्याबद्दल भीती बाळगू नये. इथले भव्य क्षण- जे आपल्याला फोन ओढून ते टिपायला भाग पाडतात- ते कितीही मौल्यवान असले तरी जे येणार त्याच्या त्या फक्त अफवा आहेत.

अनंतकालचे महाकाव्य

अशा मौल्यवान क्षणांची पूर्ण चव घेऊन, त्यांचा आनंद घेऊन, वाईट न वाटता ते सोडून देणे ह्यामध्ये ख्रिस्ती व्यक्तीसाठी एक गौरव आहे. एक ध्यास म्हणून आठवणी गोळा करीत राहून त्यांचे प्रदर्शन करीत राहण्याचे काम करीत राहू नये. हा स्वर्गाकडे जाण्याचा जवळचा मार्ग नाही.
देवाच्या मुलांसाठी साठवण्याचे सर्व मौल्यवान क्षण आपल्याला पुढच्या जीवनात दिले जातील. जगाचा इतिहास हे स्वर्गाचे महाकाव्य असेल. या युगातील उत्तम हे नव्या जगात आणखी चांगले वाटतील. मेरीलीन रॉबिन्सन लिहितात, “आता इथे जे घडले आहे ते अनंत कालामध्ये रस्त्यावर गायचे काव्य बनेल.” आतासुद्धा अगणिक स्वर्गीय  प्राणीमात्र मोठ्या विस्मयाने ते ऐकत असतात (१ पेत्र १:१२).

अनंतकालामध्ये खुद्द देव ते सांगेल. देवाने त्याच्या लोकांसाठी त्याच्या दयेची अमर्याद संपत्ती दाखवली आहे. त्याचे पृथ्वीवरील अध्याय सांगण्यास अनेक युगे लागतील. आणि आपण प्रत्येक जण आपापला भाग सांगू. आपल्या सर्व भूतकाळातून त्याच्या स्थिर प्रीतीचा सोनेरी धागा गोवलेला दिसून येईल.
काल्वरी आपले धृपद असेल. त्याच्या दयेने आपण हसू, त्याच्या कनवाळूपणाने रडू, त्याच्या विजयाने जयघोष करू, सुंदर क्षणांमुळे स्मित करू आणि जी पूर्णता ते सूचित करते त्यामध्ये गौरव करू. आपल्याला इथे आणि आता ज्याने आनंदित केले ते आपण त्याला जेव्हा प्रत्यक्ष पाहू तेव्हा आपल्याकडे पूर्णतेने परत येईल.