Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मार्च 26, 2019 in जीवन प्रकाश

देवावर भरवसा (तुम्ही जसे आहात त्याबद्दल)                             लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

देवावर भरवसा (तुम्ही जसे आहात त्याबद्दल) लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

आपण जे आहोत ते देवानेच आपल्याला घडवले आहे. केवळ आईवडिलांच्या शरीर संबंधातून आपली निर्मिती झाली एवढी ती बाब क्षुल्लक नाही. “तू माझ्या आईच्या उदरी माझी घटना केलीस” (स्तोत्र १३९:१३). आईच्या उदरात बालकाला गुंफण्याचे काम करणारा कुशल कारागीर असे दावीद देवाला लेखतो. आदामाला जसे देवाने मातीपासून घडवले तसे आपल्याला प्रत्यक्ष देवाने घडवले असे तो समजतो. या जगात येण्यास देवाने जी जैविक प्रक्रिया वापरली ती दावीद जाणतो. ती नाकारत नाही. उलट देव या कामी प्रत्यक्षात गुंतला आहे, तो भिन्न भिन्न व्यक्ती घडवतो असे तो मान्य करतो. आणि म्हणतो, “तू माझे अंतर्याम निर्माण केले.” म्हणजे तू माझा पिंड घडवला. इब्री भाषेत अंतर्याम म्हणजे भावनांचे केंद्र, नैतिक संवेदनशीलता. म्हणजेच तो म्हणतो, तू माझे व्यक्तिमत्व निर्माण केलेस. त्याने दाविदाचे फक्त शरीर घडवले नाही तर त्याचे व्यक्तिमत्व घडवले. दावीद त्याला देवाने जसे घडवले तशीच व्यक्ती होता. शरीराने, बुद्धीने व भावनेने जसा दाविदाला व्यक्तिगत घडवण्यात देव गुंतला होता, तसाच तुम्हालाही घडण्यात तो गुंतला होता. तुम्ही देवाच्या लक्षपूर्वक, काळजीपूर्वक, सृजनशील कामाचा परिणाम आहात. तुमचे व्यक्तिमत्व, तुमची लैंगिकता, उंची, चेहेरपट्टी आता आहेत ती देवाने घडवले तशीच आहेत. त्याने तुम्हाला अचूकपणे घडवले. कारण त्याला तुम्ही तसेच हवे आहात. यापेक्षा तुम्ही वेगळे असावे असे त्याला वाटले असते तर त्याने तुम्हाला तसे घडवले असते. तुमची नाकीडोळी, चेहरपट्टी देवाच्या नमुन्यानुसार त्याच्या हातांनी घडलेली आहेत. केवळ स्तोत्र १३९ च हे लिहिते असे नाही तर ईयोब १०:८-१२, स्तोत्र ११९: ७३, यिर्मया १:५ मध्येही आपण हा विचार वाचतो. हे सत्य आपण आपलेसे करू या. देवाने मला जसे घडवले ते मी स्वत:ला स्वीकारत नाही तर मी देवाचा विरोधक आहे. देवाने मला घडवल्याबाबत तक्रार करण्याचा माझा पापी स्वभाव बदलायला हवा. देवाने आपल्याला जे शरीर दिले, बुद्धी व भावना दिल्या त्या आहेत तशा आपण स्वीकारायला हव्यात. स्तोत्र १३९:१४ म्हणते, “भयजनक व आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झाली आहे म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.” दाविदाचे स्वरूप मनोहर होते (१ शमुवेल १६:१२). आपण म्हणू, दावीद देखणा, चपळ, बुद्धिमान, योद्धा, संगीतकार होता म्हणून तो देवाची स्तुती करू शकत होता. अनेक लोकांना वाटते आपल्याला काही करता येत नाही. आपण फार सामान्य आहोत. मला ह्या भावना समजू शकतात. मलाही माझे स्वरूप आवडत नसे. येशूचे वर्णन यशया ५३:२ मध्ये काय आहे? “तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत.” आपल्या देखणेपणाबद्दल दावीद देवाचे स्तवन करत नाही तर त्याला देवाने घडवल्याबद्दल देवाचे स्तवन करतो. हाच विचार आपण आपलासा करावा. अगाध ज्ञान असलेल्या व प्रीतीत परिपूर्ण असलेल्या देवाने मला स्वत: घडवले. त्याला हवी तशी बौद्धिक क्षमता, शरीर व व्यक्तिमत्व मला दिले. तो तुमच्यावर नितांत प्रीती करतो. तुमच्या द्वारे त्याचे गौरव व्हावे अशी त्याची इच्छा आहे. म्हणून त्याला हवे तसे व्यक्तिमत्व देऊन त्याने तुम्हाला घडवले.

स्वत:ला हवे तसे स्वीकारणे हा विश्वासाचा पाया आहे. मी जो आहे, तुम्ही जे आहात ते आहात. सर्व सार्वभौम देवाने तुम्ही जे आहात तसे तुम्हाला घडवले. स्वत:ला स्वीकारणे म्हणजे आपण जे आहोत त्याबद्दल देवावर विश्वास टाकणे. शारीरिक त्रुटीसह! देवाच्या निवडीनुसार त्याने मला गौरवी सजीव प्राणी घडवले आहे. देवाच्या विचाराने मी घडलेला आहे, त्याने स्वत: घडवले. ही उत्कृष्ट, प्रिय व अत्यंत मोलाची गोष्ट झाली. जर शारीरिक, बौद्धिक कमतरता आपल्या ठायी ठेवली असेल तर देवाच्या प्रीतीने व सुज्ञतेनेच ते घडले आहे. देवाने तसे का केले हे आपल्याला समजणार नाही. पण याच मुद्द्यावर आपण देवावर भरवसा ठेवायला हवा. आमच्या शारीरिक अपंगत्वाची जबाबदारी देव स्वीकारतो. निर्गम ४:११ मध्ये तो मोशेला म्हणतो, “तुला मुख कोणी दिले? मूक, बहिरे, कोण बनवतो? दृष्टी, अंधत्व कोण देतो? मीच परमेश्वर ना?” आपली प्रिय व्यक्ती अपंग असते तेव्हा हे सत्य स्वीकारणे अवघड असते. एका अंधाविषयी शिष्यांनी येशूला प्रश्न केला असता येशूने उत्तर दिले, “याच्या आईवडिलांनी पाप केले म्हणून हा असा जन्मला नाही. तर देवाची महत् कृत्ये प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मला” (योहान ९:३). तो मनुष्य जन्मांध जन्मला, प्रौढ होईपर्यंत अंधावस्थेत जीवन जगला यासाठी की देवाचे गौरव व्हावे. हा घटनाक्रम उत्तम दिसतो का? एके दिवशी देवाचे गौरव व्हावे म्हणून देवाने एवढ्या हयातभर त्याला अंधावस्थेत का जगू द्यावे? माणसानेअंध राहण्याइतपत देवाचे गौरव  मोलवान आहे का? अर्थात होय. आपण आपल्या शारीरिक मर्यादा स्वीकारायला तयार आहोत का? आपण म्हणू शकतो का की “देवा माझ्या जीवनातील त्रुटीपेक्षा तू मोलवान आहेस, तू मला असे निर्मिलेस यासाठी की माझ्याद्वारे तुला गौरवले जायचे आहे. तू माझ्यावर प्रीती करतोस. मी जे काही आहे त्याबद्दल मी तुझ्यावर भरवसा ठेवतो. तू गौरविला जाऊ इच्छितोस म्हणून मी तुझे उपकार मानतो.”

ह्याला म्हणायचे स्वत:ला स्वीकारणे. देवावर भरवसा टाकण्याचा व स्वत:ला स्वीकारण्याचा हाच मार्ग. लक्षात ठेवू या की, ज्या देवाने आपल्याला घडवले तो आमचे उत्तमच योजतो. तो पूर्णत्वालाही नेतो. त्यासाठी तो खूप प्रेमळ आहे. आपल्याला कदाचित फार धडपड करावी लागेल. विपत्तीसोबत आपल्या अक्षमता, अपंगत्व ही देखील आपल्या सोबत असतातच. म्हणून सातत्याने आपण परमेश्वरावर भरवसा टाकायला हवा. म्हणून दाविदाप्रमाणे आपण म्हणावे, “तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस. तूच माझ्या आईच्या उदरी माझी घटना केलीस.” आपण जे आहोत त्याबद्दल त्याचे आभार मानू या. त्याने दिलेल्या शारीरिक व बौद्धिक वरदानाबद्दल व व्यक्तिमत्वाबद्दल त्याला कृतज्ञता व्यक्त करू या. कारण ते सर्व देवाने आपल्याला दिले आहे. तो विचारतो, “तुला निराळेपण कोणी दिले? जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे” (१ करिंथ ४:७)? आपल्याला मिळणारी पात्रता, प्रतिष्ठा, मानमरातब, हुद्दा ही देव त्याच्या गौरवार्थ देतो आणि आपल्याला वापरून घेतो. कुवत असो अगर कमकुवत असो. दोन्हीही देवापासून येतात. त्यासाठी देवाचे आभार मानायचे. त्याचा गौरव व्हावा हीच इच्छा करायची.

उदरात असताना त्याला हवे असे त्याने आपल्याला घडवले. ते त्याच्या लहरीप्रमाणे नव्हे तर सार्वकालिक उद्दिष्टांप्रमाणे. आपण जे आहोत तसे घडवण्यास त्याच्यापाशी कारण होते. स्तोत्र १३९: १३ म्हणते, “माझा एकही दिवस येण्यापूर्वी ते तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते.” याचे दोन अर्थ होतात. (१) दाविदाची जीवनमर्यादा देवाने ठरवली होती. तो किती काळ जगेल हे देवाने ठरवले होते. तो केवळ घडवतो एवढेच नाही तर आपण किती काळ जगावे हे देखील तोच ठरवून देतो. हे एक गौरवी सत्य आहे. दाविदाप्रमाणे आमचाही आयुष्यकाल त्याच्या हाती आहे. तो बोलावेपर्यंत आपण मरू शकत नाही. (२) दुसरी गोष्ट म्हणजे आपले नित्याचे अनुभव त्याने आपल्या वहीत तेव्हाच नोंदले आहेत. यामध्ये देवाचे पूर्वज्ञान लक्षात येते. त्याच्या योजनेसाठी त्याने मला घडवले. तुम्हाला बोलण्यासाठी कौशल्ये दिलीत का? मग ती त्याच्या योजने बरहुकूम आहेत. त्याच्या योजनेसाठी त्याने तुम्हाला सज्ज केले आहे. प्रत्येकासाठी देवाची खास स्वतंत्र योजना आहे. ती आपण ज्या कुटुंबात जन्मतो त्यांच्या संदर्भातही असते. संपूर्ण जीवन त्या योजनेत समाविष्ट असते. सर्व घटना, अचानक घडणाऱ्या अनपेक्षित घटना, बऱ्यावाईट घटना सर्व त्यात समाविष्ट होतात. ही सर्व परिस्थिती आपल्यासाठी नवीन असते. देवाच्या वहीत त्यांची केव्हाच नोंद केलेली असते. आपण काय करावे, कसे असावे हा त्याच्या योजनेचा भाग असतो. त्याला हवे तसे तो आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरात रोपतो व कृपादान देतो (रोम १२: ४-६; १ करिंथ १२:७-११). ती वरदाने आपल्या बौद्धिक व शारीरिक क्षमतांशी सुसंगत असतात. आपले तारण झाल्यावर मग देव योजना आखायला सुरुवात करत नाही. यिर्मया १: ५ म्हणते “ तू जन्मण्यापूर्वी मी तुला वेगळे केले व या राष्ट्राचा संदेष्टा म्हणून नेमले.” पौल गलती १:१५ मध्ये म्हणतो, “देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून मला वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले.” स्तोत्र १३९:१३-१५ हे मूळ तत्त्व म्हणून लक्षात ठेवा. देवाने त्याच्या योजनेसाठी तेव्हाच मक्रूर ठेवले आहे. तुम्ही जे आहात व जसे आहात ती जैविक प्रक्रिया नव्हे तर देवाची परिपूर्ण योजना आहे. म्हणूनच आपण जे आहोत व जसे आहोत त्यासाठी देवावर भरवसा ठेवू या. मिशनरी, नर्स, इंजिनिअरर्स, गृहिणी, इ. काही लोक नाखुशीने सेवेत आलेले असतात. ते देवाच्या योजनेविषयी स्थितप्रज्ञ असतात. एखाद्या सेवेसाठी आपण योग्य नाही असे आपल्याला वाटत असते. पण नंतर कळते की देवाने त्या सेवेची वरदाने आपल्याला दिली आहेत. तसे मला घडले आहे. मी जन्मण्यापूर्वीच त्याने ते ठरवले आहे. देव हा जसा मंडळीचा देव आहे तसा तो समाजाचाही देव आहे. म्हणून सर्व स्वाभाविक व्यवहारही तो आखतो. पाळकांचे, मिशनऱ्याचे, व्यवस्थापकांचे व व्यवसाय करणाऱ्यांचे व व्यवसाय करणाऱ्यांचेही जीवन तो आखतो. तेथे मोठे लहान हा प्रश्नच येत नाही. ते स्थान भरून काढायला देव आपल्याला तेथे ठेवतो. इतर सजीवांप्रमाणे आपण काम करायचे. “निढळाच्या घामाने तू भाकर खाशील” (उत्पत्ती ३:१९) ह्या वचनाप्रमाणे कष्टाने फलोत्पत्ती करायची. त्याप्रमाणे उद्योगाकडे पहायचे पण देवाने तुम्हाला तेथे सेवा करायला नेमले आहे हे ध्यानात ठेवायचे. “ जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी नव्हे तर देवाच्या नावे करा” (कलसै ३:२३). गुलाम जे काही काम करत, जिथे काम करीत ते देवाचे काम समजून करत असत. त्यासाठी देवाने त्यांना जन्मण्यापूर्वीच अभिषेक केला होता.