Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 2, 2019 in जीवन प्रकाश

अपयशाला तोंड देताना                                                               लेखिका : वनिथा रेंडल

अपयशाला तोंड देताना लेखिका : वनिथा रेंडल

अपयशावर मी खूप विचार केला, विशेषकरून ईस्टरनंतरच्या काही आठवड्यात. येशू जेव्हा वधस्तंभाकडे धैर्याने व सामर्थ्याने सामोरा गेला तेव्हा त्याच्या भोवतालची माणसे लज्जा आणि खेदाने व्यापून विरघळल्यासारखी झाली होती.

जेव्हा मी माझ्या जीवनाकडे पाहते तेव्हा मला समजते की मी काही त्या लोकांपेक्षा निराळी नाही. मीही अशा गोष्टी करते की त्याबद्दल मला खेद वाटतो. चुकीचे निर्णय घेते, लोकांना दुखावते. आणि जेव्हा मी हे करते तेव्हा शुभवर्तमानातील लोकांना ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागले त्यांनाच मीही तोंड देत असते. मला पंतय पिलात, यहूदा इस्कार्योत, शिमोन पेत्र  यांच्यामध्ये माझ्यातला काही भाग दिसू लागतो. या प्रत्येकाने एक निराळा प्रतिसाद दिला होता आणि त्यांचे नैतिक पतन झाले.

पिलाताला येशू निर्दोष आहे हे ठाऊक होते. म्हणून जेव्हा जमावाला त्याला वधस्तंभी द्यायचे होते तेव्हा पिलाताने दंगा होऊ नये म्हणून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्याच्या प्रयत्नांना अपयश आले तेव्हा त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्यास सोडून दिले. त्याने त्याच्या कृतीचे समर्थन केले आणि जाहीरपणे म्हटले “मी ह्या [नीतिमान] मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा” (मत्तय २७:२४). पण ते निरर्थक होते. त्याने कितीही समर्थन करण्याच प्रयत्न केला तरी येशूच्या मृत्यूसाठी पिलातच जबाबदार होता.

मग प्रभूला दगा देणारा बारा शिष्यांपैकी एक यहूदा हा होता. त्याने येशूचा विश्वासघात का केला हे आपल्याला ठाऊक नाही. पण आपल्याला हे ठाऊक आहे की त्याने येशूला मशीहा म्हणून कधीच मानले नाही. तो त्याला नेहमी ‘रब्बी’ म्हणत असे. ‘प्रभू’ नाही. त्याला पस्तावा झाल्यानंतर तो मुख्य याजक व वडील यांच्याकडे गेला पण त्याच्या मित्रांकडे किंवा समाजाकडे गेला नाही. त्याने शेवटले भोजन सोडून दिल्यावर शास्त्रलेख त्याचा इतर शिष्यांसमवेत उल्लेख करत नाही. एकाकीपणात दोष आणि लाजेने व्यापून यहूदाने अत्यंत निराशेत स्वत:च गळफास घेतला.

पेत्र हा येशूच्या जवळच्या मित्रांपैकी एक होता. पेत्र आपल्याला नाकारील असा धोक्याचा इशारा येशूने दिला होता. पण पेत्राने ठामपणे सांगितले की, मला मरावे लागले तरी मी तुझ्याशी विश्वासू राहीन. पण त्याला किती लाजिरवाणे वाटले असेल की काही तासानंतरच एका दासीच्या साध्या प्रश्नानंतर पेत्राने तिसऱ्या वेळी शपथ घेऊन सांगितले की त्याची आणि येशूची कधीच ओळख नव्हती. त्याने पश्चात्ताप करून क्षमा मागितल्यामुळे पुढे पेत्र न लाजता क्षमेचे व कृपेचे शुभवर्तमान गाजवू शकला.

ह्या लोकांनी त्यांच्या अपयशाला इतका वेगवेगळा प्रतिसाद का दिला? २ करिंथ ७:१० म्हणते, “कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्‍चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते.”

पिलाताला काहीच दु:ख झाले नाही. यहूदाने जगिक दु:ख प्रदर्शित केले. पेत्राला दैवी दु:ख झाले होते. जेव्हा तुम्हाला अपयश येते तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारचे दु:ख होते? या तिघांपैकी कोणासारखे तुम्ही आहात?
पिलाताने त्याचे नैतिक अपयश मान्य केले. मी सुद्धा हे केले आहे. मी दुसऱ्यांवर दोष ढकलते. समर्थन करते. मला वाचवायला मी खोटेही बोलते. ती माझी चूक नव्हती आणि मला दुसरा पर्याय नव्हता असे मी भांडून सांगते. मी माझ्या कृतींचे समर्थन करते आणि माझा निर्दोषपणा जाहीर करते. पण अखेरीस मला दोषी भावना व्यापून टाकते की, किती प्रकर्षाने मी माझी चूक नाकारण्याचा प्रयत्न करत आहे.

यहूदाची व्याख्याच त्याच्या अपयशाने केली जाते. तो येशूकडे गेला नाही. त्याचे मित्र त्याच्या जीवनात त्याला मदत करू शकले नाहीत कारण त्याने सर्वांपासूनच माघार घेतली होती. मी सुद्धा असे करते. मला लाज वाटल्याने मी दुसऱ्यांपासून स्वत:ला बाजूला करते. माझ्याभोवती भिंती उभारते कारण माझा कमकुवतपणा मला व्यक्त करायला नको असतो. काही वेळा मी निराशेने देवापासून माघारी जाते; त्याने मला मदत केली नाही म्हणून त्याला दोष देत. कमकुवतपणा व भीती यांच्या आहारी जाऊन मला सर्व सोडून द्यावेसे वाटते.

पेत्र त्याच्या अपयशानंतर प्रभूकडे परत फिरला. त्याने पश्चात्ताप केला आणि प्रभूसमवेत पुन्हा सबंध जोडले. तो त्याच्या मित्रांसमवेत राहिला. कदाचित त्याला हे प्रथम लाजिरवाणे वाटले असेल. काही वेळा माझ्या मित्रांना माझ्या अपयशाबद्दल सांगायला मी कचरते. पण मला समजून आले आहे की मला वाटणारा असुरक्षितपणा हा माझी नाती दृढ करण्यास मदत करतो.  आणि विरोधाभास असा की माझे दिसणारे अपयश हे आता कमकुवतपणा भासत नाही तर ते धैर्य आणि सामर्थ्य दाखवू लागते.

पेत्राप्रमाणेच मी प्रत्येक वेळी प्रतिसाद दिला असता तर किती बरे झाले असते! उघडपणे पश्चात्ताप करून आणि माझ्या चुका मान्य करून. अपयशाला माझा प्रतिसाद प्रथम पिलाताच्या वागण्यासारखा दिसतो. मी माझ्या कृतींचे समर्थन करते कारण मी वाईट दिसावे असे मला नको असते. मग मी सबबी सांगते व माझ्या निवडींचे समर्थन करते. माझ्या ९५ % चुका मान्य करण्यापूर्वी माझ्या मुलांनी त्यांचा ५% अपराध कबूल  करावा म्हणून मी आकाश पाताळ एक केले आहे.

माझ्या इतर अपयशाला मी यहूदासारखाही प्रतिसाद दिला आहे. माझ्या मित्रांना तोडून, स्वत:ची कींव करीत रडत बसत, लज्जेने व्यापून गेले असता कोणाकडेही मदत मागितली नाही – अगदी प्रभूकडेही. त्यावेळी माझे अपयश एका पोलादी ओझ्याप्रमाणे वाटत होते जे मी फेकून देऊ शकत नव्हते.

पण देवाला धन्यवाद असो की यहूदासारखी नाही तर मला प्रभूची खरीखुरी ओळख आहे आणि मी पेत्रासारखा पश्चात्ताप करेपर्यंत त्याने माझा पाठपुरावा केला आहे. मी साक्ष देऊ शकते की पश्चात्तापामुळे येणारी सुटका व स्वातंत्र्य आश्चर्यकारक आहे. आपल्या सर्व पापांचे प्रायश्चित्त येशूने घेतले आणि त्याऐवजी त्याची धार्मिकता तो आपल्याला देतो. पेत्रानेच म्हटले आहे की “तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावेत” (प्रेषित३:१९).

पश्चात्तापामुळे प्रभूकडून विश्रांतीचे समय येतात. आणि देव आपले नाश करणारे अपयश यांचे वैभवी यशामध्ये रूपांतर करतो. हे आपण पेत्राच्या जीवनातून पाहतो. संबंध शुभवर्तमानात तो एक अधीर, भित्रा असा मनुष्य दिसतो. पण प्रभूकडून क्षमा मिळाल्यावर तो धीट आणि सुद्न्य बनला. त्याचे रूपांतर नव्या करारात अगदी स्पष्ट दिसून येते. देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे पेत्र व इतर शिष्यांनी जगाची उलथापालथ केली.

तर आपल्या अपयशाचे आपण काय करायचे? अगदी या क्षणी सुद्धा आपल्यातील सर्व जण कुठे न कुठे चुकत आहोत, अपयशी आहोत.  अपयश कसे टाळायचे हा प्रश्न नाही तर अपयशाचे काय करायचे हा आहे.

मला निवडी आहेत आणि तुम्हालाही. आपण आपल्या कृतीसंबंधी सबबी सांगून आपल्या चुका नाकारू शकतो. आपण देवापासून व मित्रांपासून लपण्याचा प्रयत्न करू, कारण कोणाला आत घेण्याची आपल्याला लाज वाटत असेल. किंवा आपण प्रभूकडे परत वळू व पश्चात्ताप करून त्याला क्षमा मागू. आपण प्रभूला आपली लज्जा व दोष दूर करण्यास मागू म्हणजे आपण मुक्त होऊन इतरांशी सच्चेपणाने वागू शकू.

येशूला माहीत होते की पेत्र हा मोहाला बळी पडणार होता. पण त्याने आपला विश्वास गमवावा अशी प्रभूची इच्छा नव्हती. कारण ते कोणत्याही अपयशापेक्षा अनंतकालासाठी हानीकारक ठरले असते. पेत्राप्रमाणेच जेव्हा आपण जे केले त्याची आपल्याला अत्यंत लाज वाटते तेव्हा प्रभू आपले अपयश हे आपला विश्वास खोल करण्यासाठी, आपले नाते दृढ करण्यासाठी आणि आपली सेवा बदलून टाकण्यासाठी वापरतो. जसे येशूने पेत्राला म्हटले, “परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर” (लूक २२:३२).

पेत्राने त्याच्या अपयशाचा परिणाम स्वत:च्या नाशासाठी होऊ दिला नाही. तो माघारी फिरल्यावर प्रभूने त्याचा स्वभाव बदलला व त्याच्याद्वारे पहिली मंडळी बळकट केली. आपल्यामध्येही तो हेच करू शकतो. आपले अपयश झाले म्हणून आपण भविष्याची भीती बाळगण्याचे कारण नाही.

वधस्तंभामुळे आपले भविष्य आपल्या अपयशावरून ठरले जात नाही तर ख्रिस्ताच्या निश्चित विजयावरून ठरले जाते.

हीच सुवार्ता आहे. देवाची स्तुती असो.