Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 11, 2020 in जीवन प्रकाश

देवाने तुम्हाला आठवणी दिल्या आहेत                                               कॅथरीन बटलर

देवाने तुम्हाला आठवणी दिल्या आहेत कॅथरीन बटलर

जी ठिकाणे आपल्याला विसरून जातात आणि ज्या क्षणांची इतर कोणी फिकीर करत नाही त्यांच्याशी आठवणी आपल्याला बांधून ठेवतात.

नुकतेच मी आमच्या शाळेचे मासिक वाचत असताना असेच विचार मला पछाडू लागले. हडसन नदीच्या किनाऱ्याला असलेले गुलाबाचे ताटवे माझे स्मरण जागे करीत गेले. तिथल्या बागेलगतच्या फुटपाथवर दिवाच्या खांब्यांच्या सावल्या मला दिसू लागल्या. त्यावेळी माझ्यामागून चालत येणाऱ्या शेकडो लोकांप्रमाणेच मलाही जाणवलेली भविष्याची आशा आताही मला जाणवू लागली.

आता माझी कहाणी विस्मरणात जमा झाली आहे. तो बाग आणि झाडे अजूनही फुलत आहेत. ती नदी अजूनही गावाच्या कडेने वाहत आहे. पण माझ्या पावलांचा आवाज आता तेथे नाही. आता मी जर तेथे परतले तर मी एक मुलांना फिरण्यास घेऊन आलेली पर्यटक वाटेन. माझ्या उचंबळून आलेल्या आठवणी जवळून जाणाऱ्यांना दिसणार नाहीत.

ज्या शहराने मला आकार दिला ते पुढे जात आहे माझ्या अस्तित्वाची दखल न घेता.

जेव्हा आठवणी ओसरतात आणि वाहतात

जेव्हा ओळखीसाठी आपण भूतकाळाकडे पाहतो तेव्हा अशा आठवणी आपण बाजूला सारले गेलो आहोत अशी अस्थिरता निर्माण करतात. आठवणी ठळक ठसे उमटवतात. पण त्यांच्या आरंभीचा जो कंप आहे तो आपण टिकवून ठेवू शकत आही. आपल्याला आठवणाऱ्या इमारती कोसळतात. आपले मार्गदर्शक वार्धक्याने वाकून जातात. आयुष्याची ओझी आपल्या सर्वांना  नम्र करतात. आपण जतन केलेल्या क्षणांकडे परत जाऊन आपल्याला आपली स्वप्ने पुन्हा कवटाळाविशी वाटतात पण त्यांनी आपल्याला केव्हाच सोडून दिलेले असते. आपली शरीरे जशी कृश होतात व कोलमडतात तसे ती ठिकाणे, लोक आणि आपण मोल दिलेल्या गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात.

भूतकाळाला धरून राहणे आपल्याला पोकळ वाटते जेव्हा आपल्याला ह्या क्षणांना अर्थ देणारा जो आहे त्याला आपण विसरून जातो. आठवणी ह्या फक्त खाजगी रीतीने त्यात चालण्यासाठी नाहीत तर देव कोण आहे आणि त्याने आपल्यासाठी काय केले याची आठवण देण्यासाठी आहेत. जेव्हा ह्या आठवणींतून आपण प्रवास करतो तेव्हा ह्या भूतकाळाच्या ओढीपेक्षा आपण कोण आहोत हे आपल्याला अधिक चांगले समजू शकते.

हे आपण कधीही विसरू नये

आठवण करण्याचे निर्णायक महत्त्व बायबलमध्ये पुन्हापुन्हा सांगितले आहे. मोशेचा मृत्यूसमय जवळ आलेला असताना ज्या लोकांना त्याने ४० वर्षे चालवले होते त्यांना तो विनवणी करतो,  “मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी” (अनुवाद ४:९).

मोशेची ही विनंती त्याच्या स्वत:च्या आठवणीतून आलेली होती. यावेळी रानामध्ये ते देवाने त्यांची घेतलेली काळजी विसरून गेले होते. देवाने त्यांची दास्यातून सुटका केली होती, त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभागला होता, त्यांना स्वर्गातून अन्न पुरवले, खडकातून पाणी दिले. तरी मानवी मन इतके विचलित होते आणि पापाकडे असलेला आपला कल इतका मुरलेला आहे की ते देवाची अविरत प्रीती लवकरच विसरून गेले आणि स्वत:च्या हातांनी केलेल्या प्रतिमांमध्ये त्यांनी आपली आशा ठेवली (निर्गम ३२:३-४). जेव्हा आपण देवाला विसरतो तेव्हा त्याने दिलेल्या मार्गावरून आपण ठेचाळून बाहेर पडतो. जेव्हा आपण त्याची आठवण करतो तेव्हा आपला नैसर्गिक प्रतिसाद असतो- उपकारस्तुती.

उपकारस्तुती म्हणून केलेली आठवण देवाचा फक्त गौरवच करते असे नाही तर जेव्हा आपण समस्यांमध्ये झगडत असतो तेव्हा त्या आठवणी आपल्याला जीवन देतात. स्तोत्र ७७ मध्ये आसाफ विलाप करतो “प्रभू सर्वकाळ आमचा त्याग करील काय? तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय? त्याची दया कायमची नाहीशी झाली काय? त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय?” ( स्तोत्र ७७:७-८). आसाफाला त्याच्या संकटामध्ये असताना देवाच्या पुरवठ्याची आठवण करून खात्री मिळते. मग तो म्हणतो, “परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे असे वाटून मला दु:ख झाले. मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन  करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन” (७७:१०-११).

जेव्हा त्याला देवाने  दुभंगलेल्या तांबड्या समुद्राची आठवण होते तेव्हा त्याच्या विलापाचे स्तुतीमध्ये रूपांतर होते. “हे देवा, तुझा मार्ग पवित्र आहे; देवासारखा थोर देव कोण आहे? अद्भुत कृत्ये करणारा तूच देव आहेस; तू आपले सामर्थ्य लोकांत प्रकट केले आहेस. याकोब व योसेफ ह्यांची संतती म्हणजे तुझे लोक, ह्यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहेस” (स्तोत्र ७७: १३-१५). तर देवाच्या कृतींच्या आठवणी आपल्याला आशा देतात जणू समुद्रातील तुफानामध्ये आपल्याला एक  जीवननौका आहे.

गुलाबाच्या ताटव्यामधून चालताना

ही आशा जेव्हा आपण वधस्तंभाची आठवण करतो तेव्हा अधिक प्रकर्षाने दिसते. प्रभुभोजन हे आपल्याला देवाची कृपा आणि ख्रिस्ताचे आपल्यासाठी असलेले प्रेम याकडे निर्देश करते आणि खुद्द येशू स्वत: त्याचे शरीर व रक्त  यामध्ये सहभागी होण्याची सूचना देतो: “मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९).

बाप्तिस्मा, प्रभुभोजन, ख्रिस्तजयंती, पुनरुत्थान हे देवाने जे आपल्यासाठी केले आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केले त्याची सामर्थ्याने आठवण करून देतात.

पण आठवण करण्याची जबाबदारी केवळ हे विधी आणि सण पाळण्यावर नाही. मोशेने केलेली विनंती त्याचा आवाज पोचू शकेल त्या सर्वांपर्यंत पोचली. येशूने भोजनाच्या वेळी त्याच्या जे अगदी निकटवर्ती होते त्यांना शिकवले. आपल्यालाही वैयक्तिक रीतीने देवाची आठवण करण्याचे पाचारण दिले आहे. त्याचा स्वभाव, त्याचे गुणविशेष, त्याचा पुरवठा, बायबलमधील त्याची अद्भुत कृत्ये आणि त्यासोबत आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याने केलेली कृत्ये.

ज्यावेळेस त्याच्या वचनाच्या भिंगातून आपण आपल्या आठवणी न्याहाळतो तेव्हा देवाची कृपा कार्यरत झालेली आपल्याला दिसते. अशा क्षणामध्ये दिसलेली ही कृपा अचानक त्यातील तपशिलाने  एक नवी खोली गाठते व आपल्या जाणिवांच्या पलीकडे पोचते.

जेव्हा नदीकाठच्या फूटपाथचा विचार करताना मला आठवते की माझ्या जीवनाच्या त्या वेळेला मी आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होते; त्यामध्ये चालत होते (इफिस २:१,२) पण देव तरी देव दयासंपन्न आहे म्हणून त्याने मला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले (इफिस २:४-५).

या जगाच्या गोष्टींमागे धावत असताना, पापात हरवलेली असताना, देवाने मला पाहिले आणि मला त्याने गळ घातली. माझा पाठलाग केला. जेव्हा माझ्याआधी जे तो रस्ता चालत होते त्यांचा मी विचार करते  तेव्हा मला समजते की तो माझ्यासोबत चालत होता. त्याची गोष्ट युगारंभापूर्वीच प्रीतीने लिहिली गेली होती. आणि जरी मला त्याची ओळख नव्हती व मी त्याचा सन्मान करत नव्हते तरी त्याने मला आशीर्वाद दिला आणि त्याच्यासमवेत मला भविष्य दिले.