Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on नवम्बर 3, 2020 in जीवन प्रकाश

आत्म्याचे फळ – शांती

सॅमी विल्यम्स

आपल्यामध्ये संघर्ष कोणकोणत्या गोष्टींवरून होतात? नातेसंबंध, जमीन, पैसा, खाणेपिणे, पार्किंग.इ.
देवाला त्याच्या लोकांमध्ये झालेला बेबनाव आवडत नाही. जीवन तर संघर्षानी भरलेले आहे. आणि हे पापाचे लक्षण आहे. या सर्वामध्ये आपल्याला ऐक्य कसे मिळेल?
ऐक्य हे केवळ ख्रिस्तामध्ये त्याच्या आत्म्याद्वारे मिळते (गलती ५:२२).
आपल्याला देवाबरोबर झालेल्या शांतीची खात्री देवाचा आत्मा देतो त्याद्वारे आपल्याला आध्यात्मिक शांती मिळते. त्यामुळे तो आपल्याला इतरांशी सुवार्तेचे ऐक्य निस्वार्थीपणे राखण्यास मदत करतो. अशा शांतीच्या ऐक्याचे स्तोत्र १३३ मध्ये सुंदर रीतीने वर्णन केले आहे. या स्तोत्रातून आपण या शांतीबद्दल शिकू या.
“पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे! ते मस्तकावर ओतलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे; सीयोन डोंगरावर उतरणार्‍या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे.”

दाविदाला त्याच्या आयुष्यभर विशेष शांती किंवा ऐक्य लाभले नाही. राजा होण्यापूर्वी शौलाने त्याचा पाठलाग करून ठार मारण्याचे प्रयत्न केले. राजा झाल्यावर त्याच्या पापाचा परिणाम त्याला भोगावा लागला व तलवार त्याचे घर सोडणार नव्हती.

हे स्तोत्र तो मनामध्ये ही शांती जतन करण्यासाठी लिहितो. हे आरोहणाचे स्तोत्र आहे. जेव्हा इस्राएल यरुशलेमामध्ये उपासना करण्यास जात तेव्हा मंदिराकडे चढत जाताना काही स्तोत्रे म्हणत जात. त्या १२० ते १३४ स्तोत्रांपैकी हे एक स्तोत्र आहे. निर्गम ३४ नुसार जेव्हा ते वर्षातून तीन वेळा भक्तीसाठी जात तेव्हा त्यांचे रक्षण देव करणार होता. ते वसंत ऋतुमध्ये वल्हांडण सणाच्या वेळी, मे महिन्यामध्ये पेंटेकोस्ट च्या वेळी व नंतर योम किपूरमध्ये मंदिराकडे जात असत. ही स्तोत्रेच त्यांचे  गीताचे पुस्तक होते.  यशया २ मध्ये जेव्हा सर्व राष्ट्रे सियोनेकडे जातील त्याचा जणू हा पूर्वानुभव होता.

हे ऐक्याचे गीत त्यांनी सर्वांनी मिळून गायचे होते. देवाच्या लोकांमध्ये असलेली एकता ही देवाकडून अपेक्षित आहे आणि देव तिला आशीर्वाद देतो.

आध्यात्मिक शांतीचे शुध्द करणारे तीन परिणाम

१. शान्तीमुळे सुवार्तेची वृद्धी होते (वचन १).

अ) शांती आपल्याला आकर्षक करते.

पहिल्या दोन वचनात दावीद ऐक्याचे वर्णन करताना कोणते गुणविशेष वापरतो?

“पहा बंधूंनी एकत्र ऐक्याने राहणे हे किती चांगले आहे” – ते आपल्यासाठी हिताचे आहे. मनोरम आहे- उपयोगाचे,  सुगंधी आहे. मधाच्या गोडव्यासारखे आहे.
सुवार्तेमुळे आपण स्वीकारलेली ही शांतीची जीवनशैली इतर लोकांना आपल्याकडे आकर्षून घेते.

ब. शांती प्रीतीला चालना देते
ही एकता कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये आहे?
बंधूंमध्ये.  हे बंधू कोण आहेत हे आपण समजून घेण्याची गरज आहे. हे एका कुळासंबंधी किवा कुटुंबासंबंधी  आहे. दावीद इस्राएलच्या बारा वंशाकडे पाहत आहे. ह्यांना देवाने निवडले आहे. आणि अखेरीस फक्त देवाच्या लोकानांच ही शांती मिळू शकते. आपण इफिस ४:३-६ मध्ये पाहतो की जसजसे पवित्र आत्मा मंडळीमध्ये कार्य करतो तशी ती ऐक्यामध्ये स्थिर होत राहते (व. ३) पुढची ४-६ ही वचने आपल्याला दाखवतात की विश्वासीयांना एकत्र बांधणाऱ्या सात बाबी आहेत.

एक शरीर- मंडळी
एक आत्मा – वस्ती करतो
एक आशा – स्वर्ग
एक प्रभू- येशू
एक विश्वास – सिद्धांत
एक बाप्तिस्मा- तारणाचा आत्मिक बाप्तिस्मा
एक देव आणि पिता- प्रार्थनेद्वारे हाक मारण्यासाठी

बंधूंचे एकत्र राहणे म्हणजे  एकत्र राहणे आणि काम करीत राहणे. ह्यासाठी विश्वासी जनांचा समाज हा आवश्यक आहे.  ह्या समाजाला त्यांच्या एकत्र राहण्याने व काम करताना त्यांच्या प्रीतीला चालना मिळते. आधुनिक समाज याच्या विरुद्ध आहे कारण त्यांची जीवनशैली खाजगी घरे, ऑनलाईन शॉपिंग, सामाजिक मैत्री यांनी बनलेली असते.
पण आपण एकमेकांसमवेत इतका कमी वेळ घालवतो की जेव्हा आपण एकत्र जमतो तेव्हा आपला संवाद मोकळेपणाने होत नाही.
यावर विचार करा- माझ्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीचा, पार्श्वभूमीचा असा माझा जवळचा ख्रिस्ती मित्र कोण आहे?
पण हीच सुवार्ता आहे. हे ख्रिस्तासारखे आहे. येशू हा पापी आणि जकातदार यांचा मित्र होता.

२. शांती आपली सेवा दृढ करते (वचन २).

हे वचन जुन्या करारातील कोणत्या घटनेबाबत बोलत आहे? अहरोनाची याजक म्हणून झालेला दीक्षा. निर्गम ३०:२२-२४). त्याच्या अभिषेकाने अहरोनाची सेवा दृढ झाली. यासाठी वापरलेले पवित्र तेल इतर कोणीही वापरण्यास सक्त मनाई होती. ते कोणीही वापरायचे नव्हते किंवा विकायचे नव्हते. निर्गम ३०: ३१-३३ नुसार त्यामध्ये सहा किलो प्रवाही गंधरस, त्याच्या निम्मे म्हणजे तीन किलो सुगंधी दालचिनी, तीन किलो सुगंधी बच, सहा किलो तज, आणि २५ लिटर जैतुनाचे तेल होते. ते  हेच दाखवते की ऐक्य हे फार मोलवान आहे. चांगले आहे आणि हितकारक आहे.

सुवासिक तेल्याभंग हा एखाद्या व्यक्तीला आकर्षक करतो (व. १).

ते अगदी सढळपणे ओतले आहे. ते खाली ओघळत जाते आणि अहरोनानाचे शरीर चिंब करून टाकते. ते खाली उतरत जाते. उतरत जाते हा शब्द तीन वेळा आला आहे. हे देवाची देत राहणारी सार्वभौमता दाखवते. शांती ही देवाची त्याच्या लोकांना दिलेली देणगी आहे. ती आपल्याला भरून टाकते यासाठी की आपण सेवा करावी. प्रारंभीची मंडळी इतकी प्रभावी व सामर्थ्यशाली होती याचे कारण त्यांच्यामध्ये असणारे ऐक्य (प्रेषित ५:१२).

आपल्या जीवनात फळाचा अभाव असतो कारण आपल्या नातेसंबंधात शांतीचा अभाव असतो. तुमचे नातेसंबंध तपासून पहा. तुम्ही दान देण्यापूर्वी, किंवा भक्ती करण्यापूर्वी  कोणा भावाशी किंवा बहिणीशी समेट करण्याची गरज आहे का ते पहा.

३. शांती आपले आयुष्य वाढवते (वचन ३).

तिसऱ्या वचनात दिलेल्या उदाहरणामध्ये काय फरक आहे? येथे दहिवर – पाणी आहे. म्हणजे जीवन आहे. हर्मोनाचे दहिवर. ह्या पर्वतावर असलेले हिम वितळून सर्व पर्वताला भिजवून टाकते. तजेलदार करून वनस्पतीने भरून टाकते. हे पावसापेक्षा अधिक प्रमाणात भिजवते. येथे उतरून येते हा शब्द पुन्हा वापरला आहे. जेव्हा ऐक्य येते तेव्हा ते देवापासून देणगी म्हणून येते व सर्व मंडळी ताजीतवानी होते.  “कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे.”

देवाचा ठराव आहे की हर्मोनाच्या पर्वताला आशीर्वाद मिळावा तसेच देवाचा ठराव आहे की त्याच्या शांतीने आपले पोषण करावे.  
कोणत्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला ऐक्यासाठी प्रार्थना दिसते? योहान १७ मध्ये येशूने आपल्या ऐक्यासाठी  प्रार्थना केली. तीन वेळा त्याने त्र्येक देवाच्या ऐक्यासारखे हे ऐक्य  दिसले जावे अशी प्रार्थना केली.

तिसऱ्या वचनात जे शांती मिळालेले ख्रिस्ती आहेत त्यांच्यासाठी काय आशीर्वाद आहे? “अनंतकालिक जीवन”. संशोधन दाखवते की संघर्ष, काळजी यामुळे शारीरिकदृष्ट्या आपल्याला  कमकुवत करून आपले आयुष्यमान कमी होऊ शकते. पण त्यापेक्षा अधिक म्हणजे हे देवाने जे अनंतकालचे जीवन आपल्याला दिले आहे त्याचा आनंदाने आपण उपभोग घेऊ शकत नाही.
“कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे” (रोम ८:६).

देवाच्या लोकांमध्ये असलेले हे शांतीचे ऐक्य आपल्या मंडळीमध्ये यावे म्हणून आपण देवाला समर्पण करू या.