Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अक्टूबर 25, 2022 in जीवन प्रकाश

माझ्यातला पशू जागा होतो

माझ्यातला पशू जागा होतो

स्कॉट हबर्ड


कधीकधी देवाचा हात त्याच्या इच्छेने तुमच्या जीवनात काही चित्र काढत आहे असे तुम्ही पाहत असतानाच ती पेन्सिल अचानक  वळण घेते आणि जे फूल होणार असे तुम्हाला वाटले होते त्याचे काट्यात रूपांतर होते. न मिळालेली प्रार्थना अखेर ऐकली जाणार, आशा अखेरीस फळ धरणार असे वाटत होते – पण नाही. तुम्ही गुलाब घेण्यास हात पुढे करता पण तुम्हाला त्याऐवजी काटे टोचतात.

या संबंधात मला सी. एस लुईस यांचा जॉय डेव्हिडसन हिच्याशी झालेल्या विवाह आठवतो. या दांपत्याचा जीवनात खूप उशीरा विवाह झाला आणि जॉयला कॅन्सर झाला. खूप प्रार्थना व उपचार होत असताना जॉय च्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असे दिसू लागले. त्यांची प्रीती संपुष्टात येणार असे दिसत असताना देवाचा हात तिला बरे करत होता असे वाटू लागले.

पण लवकरच कॅन्सर आणखी वेगाने परतला आणि त्यांचा विवाह त्याने नष्ट केला. दु:खाने पोळले असताना लुईस यांनी लिहिले, “पूर्ण न झालेल्या सन्मान्य  भूकेला  अखेरीस योग्य अन्न मिळाले आणि अचानक तो घास हातातून ओढून घेतला गेला”

असे अनुभव आपला जीव हादरून टाकतात. कितीतरी लोकांनी यामुळे आपला विश्वास गमावला आहे. इतर काही जण एका अंधाऱ्या जगाचे दार स्वत:साठी उघडून देतात जेथे त्यांना देव वाईट आहे असे वाटू लागते. कदाचित आपल्या असहाय्य क्षणांमध्ये तो क्रूर आहे असाही विचार आपण करतो.

जगात प्रवेश घेतलेल्या अनेक जनांना त्यांचा परतीचा मार्ग सापडत नाही. आपल्या पूर्वीच्या लहान मुलांसारख्या असलेल्या सूर्यप्रकाशासारख्या लख्ख विश्वासापासून दूर जाऊन ते भ्रमाच्या गर्द सावल्यांमध्ये ते फिरू लागतात. तरीही काहींना परतण्याचा  मार्ग सापडतो. असाच एक जीव आपल्याला स्तोत्र ७३ मध्ये सापडतो.

काळे दिवस

७३ वे स्तोत्र हे अंधाऱ्या जगात घडलेले आहे. स्तोत्रकर्ता आसाफ याला आपल्या आध्यात्मिक जीवनाबद्दल भ्रम झाला आहे. देवाचे द्वेष्टे पृथ्वीवर दिमाखाने मिरवत आहेत असे तो पाहतो. ते श्रीमंत, आरामशीर आणि मस्त आहेत. ते यरुशलेमेतील देव असल्यासारखे तोर्यात चालतात आणि स्वर्गाचा अवमान करतात (स्तोत्र ७३:३-११). “ हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करत असतात” (स्तोत्र ७३:१३).

दरम्यान देवभीरू आसाफाची कोणी दखल घेत नाही आणि त्याला काही लाभ नाही. त्याच्या आज्ञापालनामुळे त्याच्यावर संकटे येतात. त्याच्या भक्तीमुळे त्याचा निषेध केला जातो (७३:१४). अखेरीस तो आपली प्रार्थना, गीते, आणि इतक्या वर्षांचा विश्वासूपणा पाहतो आणि म्हणतो, “खचित हे सर्व व्यर्थ आहे” (स्तोत्र ७३:१३). त्याची आशा मरून गेली आहे. तो सावल्यांच्या जगात प्रवेश करतो.

जेव्हा आपल्या आशा पुन्हा पुन्हा पुढे ढकलल्या जातात तेव्हा आपल्या कटूपणाचे  आणि आध्यात्मिक उदासीनतेचे आपण समर्थन करतो. आपण निर्दोष असतानाही देवाच्या हाताखाली भरडले जात आहोत असे समर्थन करतो व स्वर्गाविषयीची आपली निराशा प्रकट करू लागतो. तथापि आसाफ दरवाजाच्या बाहेर आल्यावर मागे वळून पाहतो, तेव्हा काहीतरी वेगळे दिसते. “ तुझ्यापुढे मी पशुवत होतो” (स्तोत्र ७३:२२).

जे अशा अंधाऱ्या जगातून मागे फिरले आहेत त्यांना आसाफाचे शब्द बोथट वाटणार नाहीत. मला आठवते माझा जीव कसा कुरतडत होता आणि हृदय कसे गुरगुरत होते. वेदनामय  स्थितीत आपले दु:ख सहज दात ओठ खाऊ लागते आणि आपला शोक गुरगुरू लागतो – कधी उघड तर कधी शांतपणे. कटूपणामुळे आपला जीव पशूसमान होऊ शकतो. आणि जोपर्यंत देव त्याला सोडवत नाही तोपर्यंत तो तसाच जनावरासारखा राहतो.

सुटका

स्तोत्राचा शेवट होईपर्यंत आसाफ प्रकाशित जगामध्ये चालत गेला आहे आणि पुन्हा एकदा लहान मुलाप्रमाणे गात आहे.

“स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे” (स्तोत्र ७३:२५-२६).


जेथे देव पुन्हा एकदा चांगला आहे, जिथे स्वर्ग आणि पृथ्वी देवाशिवाय आणखी दुसरी कोणतीच मोठी गोष्ट देऊ शकत नाही अशा जगात आसाफ प्रवेश करतो. संकटे त्याच्यावर हल्ला करू देत, निषेध त्याला हाणू देत, प्रत्येक आशा पुढे ढकलली जाऊ देत – देव त्याच्या ह्रदयाचे सामर्थ्य आणि विपुल भाग असणार आहे. पशू आता माणूस बनला आहे.

जसा असाफ “देवाच्या पवित्रस्थानात” गेला आणि  देवापासून दूर असलेल्या लोकांचा शेवट त्याला समजला (स्तोत्र ७३:१७, २७), तशी त्याची पशुता संपली. पण याहून अधिक चांगली गोष्ट त्याला समजली.
 “तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे” (स्तोत्र ७३:२३).
त्याच्या पशुतुल्य चीडीसाठी उत्तर आहे, इतके सोपे की त्याचे सामर्थ्य आपल्याला समजणार नाही. असाफ तीन प्रतिमांमध्ये हे उत्तर कसे उलगडतो आणि आपल्या पशुतुल्य वृत्तीमध्ये आपल्याला त्या कशा भेटतील हे आपण पाहू या.

तू माझा उजवा हात धरतोस  

अंधाऱ्या झालेल्या जगताचा खरा धोका त्यातील आपल्याला वाटणाऱ्या वेदना किंवा त्यातून दिसणारी विसंगती यामध्ये नाही तर देवाच्या अस्तित्वाचा अभाव यामध्ये आहे. ७३ व्या स्तोत्राचा पहिला अर्धा भाग देवाशिवाय असलेले जग हा आहे. पण १५व्या वचनानंतर आसाफ या देवरहीत कागाळ्यांपासून वळतो आणि देवाकडे फिरतो “तू माझा उजवा हात धरला आहेस” (७३:२३). भ्रमाच्या दरवाजातून मागे फिरून त्याने पित्याच्या घरात प्रवेश केला आहे.

लहान असताना लोकांच्या जमावामध्ये जेव्हा तुम्ही बाबांना पाहू न शकल्याने आलेली उद्ध्वस्ततेची जाणीव तुम्हाला आठवतेय? आणि त्यांच्या ओळखीच्या हाताने जेव्हा तुम्हाला धरले तेव्हा अगदी रडू आणणारी भावना? असेच काहीतरी घडते. जेव्हा तुमच्या खोलीच्या शांततेत, गॅलरीत, कारमध्ये तुमचे चक्रावणारे  विचार, तुमच्या जिवाचे कडवे/दु:खद श्वास शांत होतात आणि तुम्हाला कृपा लाभते तेव्हा तुम्ही हळूहळू देवाशी बोलू लागता; “तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस.”

तुमच्या परिस्थितीत काहीच बदल झालेला नाहीये. तुमची संकटे आणि वेदना अजूनही तुम्हाला बावरून टाकत आहेत. पण तुमच्या डगमगणाऱ्या पायांना कसेतरी स्थैर्य मिळाले आहे. तुमची संकटे तुम्ही एका विस्तृत दृष्टिकोनातून पाहू शकता. तुमचा  कटूपणा हलवून टाकला गेला आहे. आणि देवाच्या हाताखाली तुमचे पशुपण निघून गेले आहे.

तू बोध करून मला मार्ग दाखवशील

तुम्हाला कितीही बावरलेले वाटत असले तरी या जगात आपल्याला एकटेच सोडून दिलेले नाही. आपल्याला दिशाहीन सुद्धा सोडून दिलेले नाही. आपल्याला केवळ एक देवच नाही तर एक मार्गदर्शक आहे; केवळ त्याचे सान्निध्य नाही तर एक रस्ता आहे. आपला हात धरून आपल्याला तो जवळ असल्याची खात्री देतो आणि गोंधळात टाकणाऱ्या रानातून आपल्याला घरी आणतो. “तू बोध करून मला मार्ग दाखवशील” (७३:२४).

देवाची सल्लामसलत, शास्त्रलेख आपल्याला जे माहीत व्हायला हवे ते सर्व सांगत नाहीत. बरा होत आलेला आजार अचानक मृत्यूमध्ये कसा जातो हे आपल्याला कळत नाही. सुधारत असलेले नाते कोलमडून कसे पडते हे आपल्याला कळत नाही. आपल्या जवळच्या व्यक्तीचे ह्रदय जे सुधारणेच्या मार्गावर होते ते अचानक कठीण का झाले हे आपण समजू शकत नाही. पण घरी परतणे हे देवाच्या दडलेल्या रहस्यामध्ये नाही तर त्याने दिलेला सल्ला स्वीकारण्यात असते.

आणि तो त्या मार्गाने कधी न गेल्यासारखा आपल्याला मार्गदर्शन करत नाही. गेथशेमानेने आपल्या प्रभूवर इतका तणाव आणला व पेचात टाकले की त्याला रक्ताचा घाम आला आणि तेथून निघून जाण्याची प्रार्थना तो करू लागला. इतका कटू प्रसंग कोणावरही आलेला नाही. कटू होऊन देवाची मसलत सोडावी असा कठीण प्रसंग अजून कोणावरही आलेला नाही. तरीही आपल्यापुढे देवाची मसलत स्वीकारणारे दुसरे उत्तम उदाहरण येशूशिवाय कोणतेही नाही. तो आपल्याला कधीही लज्जित करणार नाही, कारण ती अंधारी कबर आता रिकामी आहे.

येथे आपण देवाची मुले आहोत. त्याच्या इच्छेमागचे ‘कारण’ आपल्याला सोडून जा असे सांगते, पण त्याची मसलत नाही. यामुळेच पशुवत लोक त्यांच्या स्वत:च्या प्रेरणेनुसार वागतात. पण देवाची मुले म्हणतात, “रात्र संपेपर्यत मी तुझी मसलत ऐकेन – जरी या जीवनात पुन्हा प्रभात उगवली नाही तरी.”

‘त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील’

असा दिवस येत आहे की तो धरणारा हात हा पाहण्याचा चेहरा बनेल. आणि वळणाची वाट एक स्थिर घर बनेल. या जीवनातील अनुत्तरीत प्रश्नासाठी एक ‘नंतर’ आहे. आणि “त्यानंतर तू गौरवाने माझा स्वीकार करशील  (७३:२४).

हे ‘नंतर’ कळल्याने आसाफाचे सर्व काही बदलले गेले. जेव्हा त्याने दुष्टांचा “शेवट मनात आणला”  (७३:१७) तेव्हा त्याने त्यांच्या भरभराटीचा द्वेष करणे सोडून दिले – आणि जेव्हा त्याने स्वत:चा शेवट पाहिला तेव्हा त्याने स्वत:ची कीव करणे सोडून दिले. संकट रात्रीपर्यंत थांबू शकते पण सकाळी वैभव येते.

आपल्यासाठीही हे खरे आहे. जर आपल्याला ठाऊक आहे की आपण एका प्रकाशित जगाकडे चाललो आहोत – जेथे आपल्याला कोणतेही प्रश्न भेडसावणार नाहीत आणि अश्रू गालावरून ओघळणार नाहीत (प्रकटी २१:४). तेव्हा आपल्या दु:खसहनाचे धारदार पातेही बोथट असेल. सध्या पौलासोबत आपल्यालाही म्हणण्याची गरज आहे की, “आम्ही घोटाळ्यात पडलो”  (२ करिंथ ४:८). पण येणाऱ्या ‘नंतर’ मध्ये या काळाचे बेसूर कल्पनेपेक्षाही सुंदर सुरेल सूर बनतील. कारण ज्या हाताने आपला हात धरला आणि जीवनभर चालवले तो आपल्याला सर्व शंका आणि धोके यांमधून त्याच्या घराच्या दरवाजातून आपल्याला स्वीकारील.

अंधाऱ्या रस्त्याचा शेवट

जेव्हा आपण असाफाप्रमाणे देवालाच आपले ध्येय म्हणून स्वीकारतो – किंवा त्याहून चांगले म्हणजे रस्ता आणि ध्येय म्हणून स्वीकारतो तेव्हा आपली पशुता निघून जाते. देवाच्या मदतीने आपला गुंता सोडवणे ही आपली मोठी गरज नाही. फक्त उत्तरांनी आपल्यातील पशुता कमी होणार नाही. आपल्याला आता आणि नंतरही एक  गरज आहे ती म्हणजे एक हात आपल्या आयाळीवरून फिरायला हवा व आपल्याला त्याच्या सान्निध्याने शांत करायला हवे. कारण देव हाच मार्ग आणि शेवट, रस्ता आणि घर, आहे. इथे सानिध्य आणि नंतर आपला वाटा आहे.