Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 20, 2024 in जीवन प्रकाश

कठीण काळामध्ये वधस्तंभाचा दिलासा

कठीण काळामध्ये वधस्तंभाचा दिलासा

स्टीफन विल्यम्स

“ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. कारण, खरे पाहता तो देवदूतांच्या साहाय्यास नव्हे, तर ‘अब्राहामाच्या’ संतानाच्या साहाय्यास येतो. म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे” (इब्री २: १४-१८).

आज आपण येशूवर भरवसा ठवू शकतो. तो वाईटाचा वापर करून तुमच्यासाठी त्याचा चांगला हेतू सिद्धीस नेण्यास समर्थ आहे.  या परिच्छेदामध्ये साहाय्य हा  शब्द दोनदा आला आहे त्याकडे आपण लक्ष देऊ या.

व. १६- देवदूतांच्या साहाय्यास नव्हे;

व. १८- ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.

या परिच्छेदाचे दोन भाग आहेत  पहिल्या भागात १४-१५ वचनामध्ये येशूने त्याच्या वधस्तंभावरील मरणाने काय साध्य केले ते सांगितले आहे. दुसऱ्या भागात १५-१८ वचनात त्यामुळे तो का समर्थ का आहे हे सांगितले आहे.

सहाय्य हा शब्द सुटका करणारा आहे. याचा अर्थ : एखाद्याला धरून त्याची सुटका करणे. त्याची नाशापासून सुटका करणे. सुरक्षित ठिकाणी ओढून आणणे.

म्हणजे ह्या परिच्छेदाचा मुद्दा फक्त बौद्धिक सिद्धांत नाही तर एक प्रत्यक्ष पुरावा आहे की येशू तुमच्या अत्यंत बिकट परिस्थितीत, तुमच्या विश्वासासाठी निश्चितच योग्य आहे.

हे लक्षात घेऊन येशू कोणत्याही गरजेत मदत करू शकतो याची तीन कारणे पाहू या.

पहिले: त्याने मरणाचा शस्त्र म्हणून वापर केला (१४ अ).

मरणे हा मर्त्य मानवाचा भाग आहे. मरणाची आपल्याला भीती वाटते. मरण हे आपण मानव नियंत्रणात आणू शकत नाही. मरण हे आपल्या हातात नाही.
तर १४ वे वचन येशूचे गौरव कसे दाखवते? कारण जी गोष्ट कोणीही नियंत्रणात आणू शकत नाही तीच त्याचे अस्त्र होते. इतर काही ठिकाणी बायबल मरणावरचा  विजय यासंबंधी बोलते (१ करिंथ १५:५७). पण या वचनात काही मौल्यवान सांगितले आहे.

१) येथे मरणाद्वारे विजय असे म्हटले आहे. मरण हे विजय मिळण्याकरता येशूने साधन म्हणून वापरले.

२) आपण मरणाला भितो. त्याने मरणाचा वापर केला. ते  हेच सिद्ध करते की तो जीवनाचा व मरणाचा प्रभू आहे. आपण ज्या गोष्टीला सर्वात भितो ती त्याने स्वत:च्या मृत्यूच्या वेळीही नियंत्रणात ठेवली.

३) आणि लक्षात घ्या की यावेळी त्याने आपले स्वर्गीय गौरव प्रकट केले नाही – यावेळी तो मांस व रक्त असलेल्या मानवी कमकुवतपणाच्या मर्यादेत होता. इथे तर तो रिक्त असा दासाच्या स्वरूपात होता तरी श्रेष्ठ मानवापेक्षा समर्थ होता.

येशूने मरणाबद्दल बोलताना योहान १०:१७,१८ मध्ये म्हटले, “ मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे.”

येशू (आपल्यासारखा) मरणाच्या अधीन होता म्हणून मेला नाही. जर त्याने मरणे निवडले नसते तर मरणाचा त्याच्यावर काहीही अधिकार नव्हता. त्याने मरणाचा स्वत:चे एक साधन म्हणून ताबा घेतला. तो जीवन व मरणाचा प्रभू आहे. त्यामुळे तो जे बोलला ते कोणीही बोलू शकत नाही. आणि हे सिद्ध करण्यासाठी तो वधस्तंभावर बोलला, “हे बापा, मी माझा  आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो”  स्वत: निवडून मरण पावणारा तो एकटाच आहे.  आणि पुन्हा स्वत: निवड करून तो आता जिवंत आहे.
आणि म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे हे पहिले कारण आहे. जर तो मरणाचा प्रभू आहे तर मरणापेक्षा कोणत्या कमी प्रकारच्या गोष्टींना तुम्ही भिता? आज तुम्ही त्याच्यावर भरवसा टाकाल ना? शांत व्हा आणि लक्षात ठेवा की तोच देव आहे. त्याचेच नियंत्रण आहे. मरणाचाही तोच प्रभू आहे.

जर तो मरणावर नियंत्रण ठेवू शकतो आणि ते आपल्या विजयासाठी ते वापरतो तर तुमच्या सध्याच्या बिकट स्थितीमध्ये तो किती अधिक प्रभू आहे बरे?  ही परिस्थिती तो कल्याणासाठी वापरणार नाही का?

दुसरे: त्याने मरण हे अनंतकालिक कल्याणासाठी वापरले (१४, १५).

“हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे.”

पास्टर आर सी स्प्रौल एकदा म्हणाले, “समजा येशू आता तुमच्याकडे आला आणि तुम्हाला वचन दिले, या जगातील तुझ्या उरलेल्या दिवसात मी तुझ्याकडे एकही वाईट गोष्ट येऊ देणार नाही. जे काही घडेल ते चांगलेच असेल; तर तुमचा काय प्रतिसाद असेल?”
आता हे धक्कादायक सत्य ऐका. ही कल्पना नाही तर हे वास्तव आहे. त्याने आपल्याला हे वचन दिलेले आहेच. हे आपण थोडा व दीर्घ काळ यातील फरक समजू शकलो तरच समजेल.

थोड्या काळासाठी विश्वासीयांसाठी सुद्धा दु:ख, संकटे, वेदना  आहेत. पण रोम ८:२८ सांगते “परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.”

सध्याच्या काळात अनेक वाईट गोष्टी घडत आहेत. पण आम्हा विश्वासीयांसाठी देव त्या गोष्टी घेतो आणि दीर्घ काळासाठी उत्तम अशा बनवतो आणि चांगले घडवतो. तर आपले सध्याचे संकट अखेरीस चांगले आहे हे तुम्ही पाहता का? हे फक्त त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीच आहे. पण जे येशूवर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी याउलट घडते. तारण झाल्याशिवाय हे घडू शकत नाही.

प्रियांनो, देव या कठीण काळात आपल्यामध्ये  आहे. सध्याचा हा त्रास तो आपल्या हातात घेऊन तो तुमचे अंतिम कल्याण होण्यासाठी घडवत आहे. तो हताश नाही, अशक्त नाही, तो समर्थ आणि हेतूपूर्ण आहे.

याचा एकच पुरावा म्हणजे येशूचे वधस्तंभावरील कार्य. त्याच्या दु:खसहनाने त्याने सर्व जगाचे तारण केले.

अ) थोड्या काळासाठी  सर्वात वाईट गोष्ट झाली असती ती म्हणजे मानवाच्या पुत्राचा वधस्तंभावर वध.

ब) प्रत्येक प्रकारे सर्वात चांगले कल्याण म्हणजे पापी जगाचा उद्धार.

१४वे वचन म्हणते, “मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे.”

जुलम करणारा आहे  सैतान. मानवांना तो फुसलावणी करत आहे आणि ती देवाविरुद्ध आहे.  मरण हे आपल्याला काबूत आणण्यासाठी सैतान चाबूक, वेत  म्हणून तो वापरत आहे. पापी लोक मरणाच्या भीतीमुळे दुर्बल होतात.

लोकांना मरणाची दहशत का  आहे? सर्व विश्वाला मरणाच्या भीतीने ग्रासून टाकले नाही का? का बरे? कारण पापी लोकांसाठी मरण हे भीतीदायक आहे. आपल्या पापांसाठी आपण जबाबदार आहोत. याचे कायमचे परिणाम भोगावे लागतील. (जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे” व. १५.)

पण हे वचन सांगते की येशूने सैतानाला त्याच्या स्वत:च्या मरणाने पराभूत केले. अचूक भाषांतर आहे त्याला बलहीन केले. सैतानाचा पूर्ण नाश झालेला नाही. तो आजही कार्य करीत आहे. पण तो शक्तिहीन आहे कारण तो आजही कार्य करत आहे. पण तो शक्तिहीन आहे कारण येशूने पापासाठी आपला प्राण देऊन त्याला शक्तिहीन केले आहे.

पापाचे वेतन मरण आहे हे येशूला लागू  नाही. त्याच्यामध्ये पापाचा किंचितही लवलेश नव्हता. त्याचे मरण आपल्यासाठी होते, आपल्या बदली होते. आपल्याऐवजी पापासाठी यज्ञ. आणि तो आपल्या ऐवजी मरण पावला म्हणून आता “जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही.”

म्हणून मला सांगा जर तुम्ही ख्रिस्तामध्ये देवासमोर निर्दोष आहात तर मग मरणात कोणती भीती आहे? तुम्ही मुक्त आहात!

होय अजूनही आपण मरणाच्या अधीन आहोत पण येशूने त्याच्यातील भीती दूर केली आहे.

१) त्याने मरण नाहीसे केले (२ तीम. १:१०).

२) मरण आपल्याला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही (रोम ८:३८-३९).

सैतानाला आपल्याला दहशत घालण्याचे कारण नाही कारण आपली क्षमा झाली आहे.

तुमची क्षमा झाली आहे का? तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे का? त्याचे सार्वभौम सामर्थ्य आणि त्याचे चांगले हेतू पहा. जर चांगल्या तारणासाठी त्याचे शस्त्र मरण हे होते तर सध्याचा अंधार तो अनंतकालिक कल्याणासाठी वापरू शकणार नाही का?

तिसरे: तो आतासाठी तुमची मदत आहे (१६-१८).

“खरे पाहता तो देवदूतांच्या साहाय्यास नव्हे, तर ‘अब्राहामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो.”

तो त्याच्या लोकांना मदत करतो. दुतांना नाही. आपण पाहिले की तो आपल्या भीतीमध्ये मदत करतो. पण त्याने मदत केली आहे (भूतकाळ) आणि करत राहतो. (चालू वर्तमान)

त्याची मदत ही दयाळू व विश्वासू आहे. (व.१७)

“म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे.”

पहिले म्हणजे त्याची सहानुभूती ही दयेची आहे. त्याने सर्व मानवी अशक्तता स्वत:वर घेतली. तो थेट अनुभवाने शिकला. मानवी वेदना त्याला माहीत आहेत. शारीरिक निराशा, भूक, तहान  त्याला माहीत आहे. जिवलग व्यक्तीचा मृत्यू, आजार, गरिबी, दगा, अन्यायाचे दु:ख त्याला माहीत आहे. “सर्व प्रकारे” त्याला माहीत आहे.

तो सध्या आपल्याला देत असलेली मदत ही प्रेमळ ,योग्य, दयाळू आणि विश्वासू आहे.

त्याची मदत ही सुरक्षित आहे, विश्वास ठेवण्यास योग्य आहे. आणि आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकतो . त्याने पापासाठी प्रायश्चित्त दिल्यामुळे तो देवाचा क्रोध आपल्यावरून दूर करतो कारण त्याने तो स्वत:वर घेतला. आता तो आपल्यासाठी विनंती करतो.

याचा अर्थ आता देवाला तुमच्यापासून तोंड फिरवण्याचे कारण नाही तो आपल्याकडे प्रीतीने पाहतो. आपले त्याच्यासमोर  उभे राहणे हे सुरक्षित आहे कारण येशू त्याचे पूर्ण झालेले काम आपल्यासाठी देवाला सादर करतो.

यामुळे तुमचा येशुवरील विश्वास हा योग्य ठिकाणी आहे. त्याची मदत कोणीही थोपवू शकत नाही कारण ख्रिस्तामुळे देवाची नेहमीच तुमच्यावर मर्जी असणार.

 त्याची मदत सतत असते (१८).
“कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.”
त्याची मदत सदैव सिद्ध आहे. आपली परीक्षा होताना आपण निरनिराळ्या प्रकारच्या प्रार्थना करतो. देवा मला परीक्षेपासून राख अशीही प्रार्थना आपण करू शकतो.
पण हे अभिवचन निराळे आहे – जे सध्या परीक्षेत आहेत. आता ज्यांची परीक्षा होत आहे त्यांच्यासाठी तो मदत करायला समर्थ आहे. तो  कशी मदत करतो? आपल्या गरजा तर प्रचंड आहेत. तो समर्थ आहे कारण मरण पराजित करून त्याने विजय मिळवला. आज तो तुम्हाला मदत करायला समर्थ आहे. तो तुम्हाला परीक्षेत राखील.

म्हणून भिऊ नका. त्याच्यावर  टेका, भरवसा ठेवा.