Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 7, 2024 in जीवन प्रकाश

जवळजवळ तारलेला

जवळजवळ तारलेला

ग्रेग मॉर्स



न्यायाच्या दिवशी त्याचा न्याय ही सर्वात दु:खद गोष्ट असेल. नरकामधला हा सर्वात दयनीय प्राणी असेल. जो नेहमीच जवळ येत होता पण कधी पार झालाच नाही. आपल्यातले कोणी या गटातले नसावे अशी माझी इच्छा आ

हा गट म्हणजे जवळजवळ ख्रिस्ती असलेल्यांचे विद्यालय.

बनावटपणा किती जवळ  असतो, आपण आपली घरे वाळूवर बांधण्यापासून सावध कसे असावे, खोट्या आशा कशा खोडून टाकाव्यात हे पाहण्यासाठी जवळ जवळ ख्रिस्ती असलेल्यांची चित्रे आपण काळजीपूर्वक पाहू या.

१. देवाची आज्ञा पाळणे : श्रीमंत तरुण

त्याने त्याला उत्तर दिले “गुरूजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे” (मार्क १०:२०)

अनंतकालिक जीवनाचा शोध करणाऱ्या या श्रीमंत तरुणाकडे पहा   “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे” ( मार्क १०:१७)? त्याला प्रतिसाद देताना प्रथम येशू त्याचा चांगुलपणाचा दृष्टिकोन सुधारतो आणि मग त्याला पाठ असलेली आज्ञाच पुन्हा सांगतो. “तुला आज्ञा ठाऊकच आहेत; ‘खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख”’ (मार्क १०:१९). त्याचे उत्तर पहा: “गुरूजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे.”

जर आपण त्याचा शब्द खरा मानला तर  या मनुष्याने देवाचे आज्ञापालन केलेच पण ते सर्वत्र आणि  सतत  केले.    त्याने हे केले असे समजू या. जर तसे असेल तर ते त्याने  अर्धवट केले नाही, वाटेल तेव्हाच लहरीने केले नाही. त्याने देवाचे वचन स्वीकारले आणि त्याच्या इच्छेने ते पाळले. आता हा चांगला मनुष्य नव्हता का? इतके पुढे तर फारच थोडके जातात. पण तरीही तो पुरेसा पुढे गेला नाही. 

ख्रिस्ताचे आज्ञापालन हा जरी तारणाऱ्या विश्वासाचा आवश्यक भाग आहे (याकोब २:१), तरी केवळ बाहेरील खात्री ही खरे चिन्ह नाही. हा माणूस अनंतकालच्या जीवनासाठी स्वत: आला पण ख्रिस्तापासून आणि स्वर्गीय संपतीपासून मागे वळला कारण त्याला त्याचे जग आणि संपत्ती फार प्रिय होती (मार्क १०:२१-२२).

२. दुसऱ्यांना आशीर्वाद देणे : यहूदा

माझ्यामुळे इतरांच्या जिवाला लाभ मिळाला आहे का? माझ्या पत्नीला, मुलांना, स्वर्गीय बाबींनी मी आशीर्वाद दिला आहे का? माझ्या जीवनाद्वारे व सेवेद्वारे कुणाचा फायदा झाला आहे काय? तरीही जर आपण यावरच जोर देऊ लागलो तर आध्यात्मिक सेवेचा हा  पुल डगमगता आहे. यहुदाचा विचार करा. बारातील एक शिष्य, उपदेशक- आणि तसेच सैतान. जवळजवळ तारलेला.

मनुष्य त्याच्या कृपादानाद्वारे इतरांना सुधारू शकतो पण स्वत: सुधरत नाही. तो दुसऱ्यांसाठी लाभ असा होतो पण स्वत:साठी नाही. कावळा हा अशुद्ध पक्षी होता पण देवाने त्याचा एलियाला अन्न देण्यासाठी उपयोग करून घेतला. त्याचे स्वत:चे मांस चांगले नव्हते तरीही त्याने चांगले मांस आणले. लंगडा मनुष्य आपल्या कुबडीने तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकेल पण स्वत: त्यात चालू शकणार नाही.
असे किती मिशनरी, पाळक, आध्यात्मिक पुढारी लोकांना स्वर्गीय किनाऱ्याला पोचायला मदत करतील पण स्वत: कधीही पोचणार नाहीत अशा विचाराने माझा थरकाप होतो.

३. तारणाची इच्छा: पाच मूर्ख कुमारी

तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, ‘तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत’ (मत्तय २५:८).

यहूदी विवाहसोहळा दिवसभर चालत असे. वधूच्या घरी नाच व मौजेचा कार्यक्रम झाल्यावर वऱ्हाड वराच्या घरी जात असे. तेथे विवाह सोहळा व त्यानंतर मेजवानी होत असे. हा कार्यक्रम बहुधा रात्री होत असे. ह्या दाखल्यातील कुमारी, वर आणि  वऱ्हाडासाठी वरातीमध्ये दिवे घेवून ती  प्रकाशित करणार होत्या. पाच जणी शहाण्या होत्या त्यांनी सोबत पुरेसे तेल आणले होते. इतर पाच जणी मूर्ख होत्या त्यांनी तेल असल्याची खात्री केली नाही. “मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, ‘पाहा, वर आला आहे, त्याला सामोर्‍या चला’”  (मत्तय २५:६). घाबरून मूर्ख शहाण्यांना विनवू लागल्या, ‘तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत’ (२५:८). आता इथे या कुमारींमध्ये कृपेची इच्छा दिसते.  ही कृपेसाठी इच्छा होती पण  कृपेसाठी ती खरी इच्छा नव्हती.

जेव्हा त्यांना नकार मिळाला तेव्हा तेल विकत घेण्यासाठी त्या घाईने गेल्या. पण जेव्हा त्या वराच्या घरी पोचल्या तेव्हा बंद दाराने त्यांचे स्वागत केले.

ह्या कुमारी येशू ख्रिस्ताच्या कबुलीम्ध्ये किती पुढे गेल्या होत्या आणि वर येऊपर्यंत त्या  पुढे जात होत्या. त्या स्वर्गाच्या अगदी दारापर्यंत गेल्या पण गौरवाच्या उंबरठ्यावरच त्यांचा नाश झाला. त्या जवळजवळ तारलेल्या होत्या आणि तरीही त्यांचा नाश झाला.

तारणाची इच्छा करणे हे चांगले चिन्ह आहे पण ती तारण प्राप्त झाल्याची खात्री नव्हे. अनेकांना तारण होण्याची इच्छा असते – आपले तारण झाले आहे असे त्यांना वाटते- ते खऱ्या ख्रिस्ती लोकांबरोबर ख्रिस्ताची वाट पाहतात, दिवे साफ करतात, वरासाठी तयारी करतात आणि तरीही स्वर्गाच्या दाराशी  चुकीच्या बाजूला त्यांचा नाश होतो.

दररोजच्या धर्मपालनात आनंद : इस्राएल

“ते तर रोजरोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात; नीतीचे आचरण करणार्‍या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणार्‍या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात; देवाची समीपता ते इच्छितात” (यशया ५८:२).

आपण जे धार्मिक सराव करतो, त्यांच्या भावनांवर आपल्यातील अनेकांची खात्री आधारित असते. जर मी खरा ख्रिस्ती नसतो तर बायल वाचन, प्रार्थना, चर्चला जाणे ह्या गोष्टी मी केल्याच नसत्या. परंतु हे चिन्ह देव इस्राएल लोकांशी जे बोलला त्यानुसार खोटे ठरते.

जुन्या करारातील लोक दररोज त्याला त्यांच्या विधींद्वारे  शोधत होते आणि त्यांना ते आवडत होते. त्यांच्या मुखात त्याचे गीत होते. त्यांच्या धार्मिक कृत्यांचा जेव्हा वाईट अहवाल आला तेव्हा त्यांनी प्रभूला विचारले, ‘आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जिवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस?’ (यशया ५८:३). अखेरीस त्यांच्या धार्मिक सरावाच्या वासाने  त्यांचा अविश्वास, अन्याय, आणि ढोंगाचा दर्प  झाकला गेला नाही.

आपल्यापैकी कोणीच आपली आशा तपासून घेतल्याशिवाय मरणाकडे जाऊ नये. तसे करणे हे असुक्षित व शास्त्रवचनाशिवाय आहे. पौल करिंथकरांस म्हणतो, “स्वत:ची परीक्षा करा. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही” (२ करिंथ १३:५).

आणि त्या पवित्र पुस्तकातून कितीतरी ख्रिस्ती लोकांचे डोळे आपल्याकडे निरखून पाहताना आपण हे का करायला नको? काईनाचे अर्पण नाकारल्याचे, एसावाचा वारसाहक्क नाकारल्याचे, वल्हांडणानंतर तांबड्या समुद्रातून  पार गेल्यावरसुद्धा अविश्वासामध्ये मरण पावलेल्या इस्राएलांबाबत आपण वाचतो.  येशूने भोजन पुरवल्यानंतर हजारो शिष्य त्याला सोडून गेल्याचे आपण वाचतो. जगाच्या सुखासाठी पौलाला सोडणाऱ्या बंधूसबंधी आपण ऐकतो. “कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणार्‍या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्‍चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात” ( इब्री ६:४-६). आपण मेजवानी बाहेर असणारा वडील भाऊ, लग्नाच्या मेजवानीत घाणेरडी वस्त्रे घातलेली व्यक्ती, वाळूवर बांधलेले घर, देमास व बलाम, राजा अग्रीप्पा व फेस्त यांच्याबद्दल वाचतो. एक मंडळी मृत असताना जिवंत म्हणवत असे पण ती दरिद्री, अंध आणि दयनीय होती. आणि असे ख्रिस्ती म्हणवणारे  असंख्य लोक न्यायाच्या दिवशी “प्रभू प्रभू …” म्हणत येतील हे वाचतो. अनेक जण न्यायाकडे खोट्या आशेवर येतात. अनेक जण तेथवरच पोचतात पुढे नाही.

संपूर्ण ख्रिस्त

आता हे वाचून जे कार्यक्रमात झोकून देतात पण ख्रिस्त हा त्यांचा केंद्र नसतो त्यांच्यासाठी. आपल्याला एका बाजूला आवश्यक तो बोध केलेला आहे: पापाचा भार टाकून द्या, त्याच्या कृपेवर दररोज स्वत:ला निरवा. आपण कसे जगतो, कशावर प्रीती करतो कसे चालतो  याकडे लक्ष द्या. तुम्ही त्याचे आहात का याबद्दल परीक्षण करा. तुमचे पाचारण व निवडीची खात्री करून घ्या. भीत व कापत आपले तारण साधून घ्या. तरीही ख्रिस्ताला विसरून, सुवार्तेमध्ये असलेली  त्याची व देवाची उत्तुंग प्रीती विसरून आपण धावू नये.

ख्रिस्तामध्ये तुम्ही कसे वाढत  जाल? मारीन लूथर उत्तर देतात;

विश्वास हा ख्रिस्ताच्या रक्तातून व जखमांतून निर्माण होऊन वाहता राहायला हवा. जर देवाने त्याचा पुत्र तुमच्यासाठी दिला तर त्यामुळे तुमच्या ह्रदयात त्याच्याबद्दल प्रेम वाढते होऊन त्याच्याकडेच तुमचा कल असला पाहिजे. कुणी चांगली कामे केली म्हणून त्यांना पवित्र आत्मा दिला असे आपण कधी वाचत नाही तर लोकांनी ख्रिस्ताची  सुवार्ता व देवाची दया ऐकली हेच नेहमी ऐकतो.

या जीवनात मला मी जवळजवळ ख्रिस्ती आहे किंवा मी ख्रिस्ती आहे असे मला वाटते या विचारात स्थिर होऊ नका. पण देवाच्या आत्म्याने जन्मलेले खरे ख्रिस्ती व्हा. एक खरा ख्रिस्ती घोषित करतो, “आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले” (गलती २:२०). त्याच्या प्रीतीत न्हाऊन आपण ख्रिस्ती प्रौढता व खात्रीमध्ये वाढत जातो. खऱ्या विश्वासाला खिस्त आपल्या सर्व पापांचे प्रायश्चित्त आहे हे समजते. हा मेंढपाळ आपल्याला घराकडे नेतो. त्याचा आत्मा आपल्याला देऊन त्याने सुरू  केलेले आपल्यामधील काम पूर्ण करतो.  खरे ख्रिस्ती खऱ्या विश्वासाने, खऱ्या देवाच्या, खऱ्या प्रेमात स्वत:ला न्हाऊन घेतात. ही प्रीती त्या गौरवी ख्रिस्ताने त्याच्या क्रूसावर पूर्ण केलेल्या कार्यामध्ये पूर्णपणे दाखवली आहे.