Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जनवरी 1, 2019 in जीवन प्रकाश

काबीज केलेले, समर्पित, संसर्गजन्य                                                     लेखक : मार्शल सीगल

काबीज केलेले, समर्पित, संसर्गजन्य लेखक : मार्शल सीगल

नवीन वर्ष हा एकमेव समय असतो जेव्हा आपण थांबून आपला समाज – चर्च, आपले अभ्यासगट, आपले मित्रमंडळ यांचा आढावा घेतो. मला असे विश्वासी जन भेटले आहेत का ज्यांनी मला माझ्या विश्वासात चालण्यात मदत केली? (इब्री. ३:१२-१३).  ह्या नातेसंबंधांचा मी अधिकाधिक फायदा घेतो का (इब्री १०:२४)? अविश्वासी लोकांना असे दिसते का की आपण या जगापलीकडे असलेले काही आहे त्यासाठी जगतो? (योहान १३:१५). स्थानिक मंडळीतील माझ्या दृष्टांताला आकार देण्यासाठी या वचनांची मला खूप मदत झाली. ही वचने पहिल्या मंडळीचे स्पष्ट चित्र दाखवतात – येशूने पृथ्वी सोडल्यावर ते विश्वासी कशामुळे राखले गेले? सर्व सोडून देण्यास त्यांना कशाने प्रवृत्त केले? आणि इतक्या भयंकर छळ व विरोधात ते कशामुळे टिकून राहिले?
प्रेषित २:४२-४७ वचने आपल्या आजच्या ख्रिस्ती समाजासाठी विश्वास ठेवणारा समाज कसा असतो याचे वर्णन करतात. हा परिच्छेद पाठ करण्यास छोटासा आहे तरीही आपल्या स्थानिक मंडळीच्या जीवनास आकार देण्यास काही वर्षेच नव्हे तर दशकांसाठी पुरेसा आहे. येथे ख्रिस्ती समाजासाठी तो किमान चार खरी चिन्हे दाखवतो.

१. तत्परतेने भक्ती, अधून मधून औदासिन्य नव्हे

“ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत” (प्रेषित: २:४२-४६).

समर्पित – कदाचित तुमच्या घराच्या जवळपास तुमच्या मंडळीचा आठवड्याचा अभ्यासगट जमत असेल. पण त्यामध्ये या प्रकारचे देवाच्या वचनाला आणि एकमेकांना समर्पण किती मंडळ्यांत दिसून येते? ही फक्त विश्वासूपणे दिलेली वक्तशीर हजेरी नाही किंवा विश्वसनीय आध्यात्मिक परिपाठ नाही. ती एकमेकांवर निष्ठेने केलेली प्रीती व आनंद आहे. ते कशाला समर्पित होते? शास्त्रलेखाला आणि त्यांच्या सहभागितेला (२:४२). आपण ज्या प्रकारे नव्या वर्षाच्या निश्चयांना समर्पण करतो तसले हे समर्पण नव्हते. पण आपण रोज जेवण खाणे व पाणी पिण्याला जसे समर्पित असतो त्या प्रकारचे हे समर्पण होते. ते देवाच्या वचनाला व एकमेकांना दररोज इतके समर्पित होते की जसे त्यांचे संपूर्ण जीवनच त्याच्यावर अवलंबून होते. कारण ते होतेच. तुमचा समाज असा समर्पित आहे का?

२. मनापासून प्रेम, कंटाळवाणा शिष्ठाचार नव्हे

जेव्हा ते बायबल व एकमेकांना समर्पित असत तेव्हा काय घडले? “तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले” (व. ४३). सुवर्ताप्रसाराबद्दल तुमची अशी कल्पना आहे का की ते एक शैक्षणिक भाषण आहे किंवा व्यापाराची पेठ आहे आणि अविश्वासी व्यक्तीने आपल्याशी मान्य होऊन  समर्पण करावे म्हणून तिला गळ घालणे आहे? ह्या छोट्या कमकुवत मंडळीमध्ये दुसरेच काही घडत होते. भययुक्त आदर. ही भावना मनाला व्यापून टाकते व ह्रदयापर्यंत पोचते. प्रथम ती मन काबीज करते. जर सत्य हे देव व तुम्ही याच्याशी सबंधित नसेल तर कोणतीच भावना खऱ्या जीवनाकडे अथवा आनंदाकडे आपल्याला नेऊ शकत नाही (रोम १० :२). जर ह्या ख्रिस्ताकडे आपण आकर्षित झालेले नसू तर आपल्याला तो माहीत आहे असा दावा आपण करू शकत नाही.

आपल्या अनेक मंडळ्या व त्यातील अनेक जण तीच तीच सत्ये वारंवार सांगत असतो – त्याबद्दल गाणी गातो, चर्चा करतो – पण देवाने आपल्याला त्याद्वारे पुन्हा हेलावून सोडावे अशी अपेक्षा आपण करत नाही. पण आदरयुक्त भय हा फक्त परिवर्तनाचाच अनुभव नाही तर रोज आणि रोज मंडळीमध्ये दिसणाऱ्या विश्वासाचा अनुभव आहे. जेव्हा देव पुन्हा पुन्हा आपली ह्रदये संजीवित करताना आपण पाहतो तेव्हा हे घडते. तुमची मंडळी अजूनही देवाद्वारे संजीवित होते का?

३. त्यागपूर्वक औदार्य, स्वार्थी महत्वाकांक्षा नव्हे

पहिल्या मंडळीचे ख्रिस्ती लोक जिवंत, चैतन्यपूर्ण आणि वैयक्तिक अशा दृष्टांताने धरले गेले होते. पण त्यामुळे त्यांनी एकमेकांकडे लक्ष देणे सोडले नाही. राजासनावर असलेला देव आणि पृथ्वीवरच्या गरजांना समर्पित असलेली मंडळी या दोन्ही कारणांना ते समर्पित होते. “तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत” (२:४४,४५). ख्रिस्ती असल्याने विश्वासीयांना येशूशी असलेल्या त्यांच्या नात्यामुळे इतरांपासून अलग केले गेले नाही. पण प्रत्येक विश्वासी येशूच्या शरीराचे आवश्यक अंग बनले. देवापासून त्यांना जे मिळाले ते त्यांनी जे गरजू होते त्यांच्यापर्यंत नेले.

देव आपल्याला हमी देतो की तो आपली प्रत्येक गरज पुरवील (मत्तय ६:२५-३३). आणि बहुदा (प्रत्येकच वेळी नाही तरी) तो ती इतर विश्वासीयांद्वारे पुरवतो. तो आपल्या प्रत्येकाला कृपादाने देतो ते आपल्याला आत्मपूर्ती मिळावी किंवा आपल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नव्हे, तर खऱ्याखुऱ्या गरजा पुरवून इतरांमध्ये जे कमी आहे ते भरून काढण्यासाठी देतो. आपल्या प्रत्येकाला देवाने कृपा पुरवली आहे ती आपल्यापर्यंतच येऊन संपण्यासाठी नाही तर ती दुसऱ्या कोणाकडे पुढे केली जावी म्हणून (१ पेत्र. ४:१०). परंतु निस्वार्थी दया नसेल तर कृपा ही कृतीमध्ये व्यक्त होत नाही तर तिचा फक्त साठा केला जातो.
पहिल्या ख्रिस्ती जनांना देवाच्या अभिवचनात इतके सुरक्षित वाटत होते की त्यांच्याजवळ जे काही होते ते इतरांना मदत करण्यास त्यांनी देऊन टाकले. हे पाहत असलेल्या जगाला हा निस्वार्थ स्पष्ट करता येईना किंवा त्यांना ते मुर्खपणाचे औदार्य वाटले. पुढे हे मासेदोनियाच्या मंडळीतही घडले. “मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवतो; ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली” (२ करिंथ ८:१,२). गरजेमध्ये पुरवलेला आनंद हा नेहमी दया व त्याग यांच्यासारखा दिसतो. थोडक्यात तो वधस्तंभसारखा दिसतो (इब्री १२:२, १ योहान ४:९-११).
तुमची मंडळी ही अशी पूर्ण निस्वार्थी आणि एकमेकांसाठी उदार  आहे का?

४. फैलावणारा आनंद, खाजगी गट नाहीत

जेव्हा मी माझी मंडळी व माझ्या अभ्यासगटाचा विचार करतो तेव्हा “सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे” (व.४७). हे या परिच्छेदाचे शेवटचे वाक्य मला सोडत नाही आणि उत्तेजनही देते. सर्व भक्ती, प्रेम आणि दया ही विरोध न होता फैलावत जातात.

आपण आपल्या मंडळीची वाढ फक्त आकडेवारीनेच मोजत नसतो कारण फक्त देवच वाढ देतो (१ करिंथ ३:७). पण तरीही तो वाढ देत आहे का नाही हे अधून मधून मोजण्याची गरज आहे. आपली मंडळी समर्पित आहे असे जरी आपल्याला वाटले पण जर ती इतर कोणाला तशी आकर्षक वाटत नसेल तर आपण कशासाठी समर्पित आहोत हा प्रश्न गंभीरतेने विचारण्याची गरज आहे.

जगातील प्रत्येक मंडळीला थेट प्रभूपासून मिशनरी आदेश मिळालेला आहे. “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९,२०). याचा अर्थ असा नाही की काहीजण शिष्य करतील आणि इतर जण दुसऱ्या प्रकारची सेवा करतील. प्रत्येक ख्रिस्ती समाज व प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती यांना हरवलेल्यांना सुवार्ता सांगण्याचे व ख्रिस्ती विश्वासात वाढण्याचे पाचारण आहे. खऱ्या प्रीतीची अभिव्यक्ती, आनंद व भक्ती ही फैलावली गेली पाहिजे अशी देवाची इच्छा आहे.

तुमची मंडळी शिष्य तयार करत आहे का?

नव्या वर्षाला सुरवात करताना तुमच्या मंडळीतील व अभ्यासगटातील कमकुवत गोष्टी किंवा दुर्लक्ष केलेल्या बाबी शोधून काढा. कदाचित एकत्र बसून पुढील वर्षात तुम्ही कसे जगाल व कशी सेवा कराल ह्याचा दृष्टांत तयार करा. शास्त्र उघडून व त्याचा आधार असणारी वचने शोधून पाठ करा. त्याच्या गौरवाच्या मार्गदर्शनाखाली आणि कृपेच्या इंधनाद्वारे तो आपल्यामध्ये अधिक लोकांची भर घालेल.