Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जुलाई 14, 2020 in जीवन प्रकाश

संकटामध्ये आनंदाचे पाच अनुभव  (उत्तरार्ध)                                      क्रिस विल्यम्स

संकटामध्ये आनंदाचे पाच अनुभव  (उत्तरार्ध) क्रिस विल्यम्स

“इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर,

धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे” ( रोम ३:३-५).

 

ब. संकटाद्वारे धीराचा अनुभव घेणे

संकटामुळे धीर निर्माण होतो. धीर याचा अर्थ मानवी टिकाव यापेक्षा खूप अधिक आहे. दुसरा काही पर्याय नाही यामुळे  तुम्ही थंडपणे अधीन होऊन असे म्हणत नाही की; ‘दुसरे काय करायचे? मला ही समस्या आहे. माझी काळजी घेणारे कोणी नाही. आणि जर मी रडलो तरी माझे अश्रू पुसणारे कोणी नाही. मला हे सहन केलेच पाहिजे.’

धीर म्हणजे काय? तुम्ही टिकाव धरून असताना पुढे जात राहण्याचा अनुभव घेणे. तुम्हाला वेदना आणि क्लेश जाणवतात तरी तुम्हाला ठाऊक असते की ही परीक्षा देवाने तुमच्यावर येण्यास परवानगी दिली आहे. धीर म्हणजे सतत टिकाव धरणे. जे आपले मन देवावर आणि त्याच्या चांगुलपणावर सतत केंद्रित करतात त्यांनाच हा अनुभव येतो. यशया २६:३ म्हणते, “ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो.”

तुम्ही परीक्षेत टिकून राहता कारण तुम्हाला ठाऊक असते की तुमची परीक्षा तुम्हाला सामर्थ्य आणि टिकाव धरण्यासाठी देवावर भरवसा टाकण्यास शिकवेल. हळूहळू तुमचा त्याच्यावरील विश्वास बळकट होत जातो. तुम्ही त्याच्यावर थोडा विश्वास ठेवता आणि तो तुम्हाला आणखी अधिक विश्वास ठेवायला मदत करतो. तुम्हाला तुमच्या संघर्षात त्याच्या सान्निध्याचा व सामर्थ्याचा अनुभव येतो आणि तुम्ही त्याच्यावर अधिक भरवसा टाकता. हा वाढता भरवसा आहे  जो हळूहळू उभारला जातो. ‘हे सर्व काही सुरळीत’ असताना घडत नाही. ही परीक्षा तुम्ही येशूसारखे बनावे म्हणून देवाची देणगी बनते. यासोबतच तो जवळ आहे असा अनुभव तुम्ही घेता. स्तोत्र ३४:१८ म्हणते, परमेश्वर “भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.”
यशया ४३:२-३ म्हणते; “तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे.”

कारण मी जो तुमचा प्रभूदेव तो इम्मानुएल आहे. हे भरभराटीमध्ये, श्रीमंतीत, आरोग्यात दु:खात घडत नाही. परीक्षेत आपण आपला देव इम्मानुएल याचा जितका अनुभव घेतो तितका दुसऱ्या वेळी घेऊ शकत नाही. म्हणून परीक्षा व त्रास निघून जावा अशी प्रार्थना करत न बसता आपण त्यांना कवटाळतो. हा इम्मानुएल याच्यावर भरवसा ठेवण्यासाठी समर्थन करणारा पर्याय आहे. जेव्हा सर्व सुरळीत चाललेले असते तेव्हा माझा खरं तर माझ्या कुवतीवर आणि जे मला बढती, पगारवाढ देतात त्यांच्यावर भरवसा असतो. जेव्हा मी स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही आणि या पृथ्वीवर मला मदत करणारे कोणी नसते तेव्हा विश्वास काम करू लागतो.  जेव्हा माझ्या कुबड्या काढून घेतल्या जातात आणि मला एकाकी सोडले जाते तेव्हा खरा विश्वास टाकला जातो. देव एकटाच त्यावेळी उभा राहतो आणि म्हणतो, “खंबीर हो, मी तुझ्यासोबत आहे.”

क. धीराद्वारे शील बनण्याचा अनुभव. (वचन ४)

यामागे अशी कल्पना आहे की सर्व अशुद्धता गाळून टाकण्यासाठीअग्नीतून नेऊन परीक्षा करणे. सोने हे अग्नीतून नेले जाते. ज्वाला ह्या सर्व गाळ आणि अशुद्धता जाळून टाकतात आणि बावनकशी सोने बाहेर पडते. हेच प्रत्येक विश्वासी व्यक्तीसाठी देवाला हवे आहे. हीच तुम्ही स्वत:साठी प्रार्थना केली होती. “हे शुद्ध करणाऱ्या, मला सोन्यासारखे शुध्द कर.” देवाचे शुद्ध करणे दूर जावे अशी प्रार्थना करू नका. आपले विचार व आपल्या प्रार्थना बदलायला हव्यात. देवाची कृपा माझी भरभराट करेल व देवाच्या कृपेने माझे संकट दूर व्हावे असा विचार करणे थांबवा. भरभराट ही तात्पुरती असते आणि ती फक्त या जीवनापर्यंतच असेल. म्हणूनच येशूने आपल्याला स्वर्गात संपत्ती साचवा असे सांगितले. ‘हे सर्व देऊन टाक आणि माझ्यामागे ये,’ या शब्दांमुळे तो श्रीमंत तरुण ख्रिस्ती होऊ शकला नाही. त्याला त्याची संपत्ती येशूहून अधिक प्रिय होती आणि ती तो सोडू शकला नाही. ख्रिस्ती व्यक्ती जगाच्या संपत्तीमधून  जे मिळते ते घेतो आणि ते देवाच्या राज्याच्या बांधणीसाठी व जे गरजू आहेत त्यांना देतो. जेव्हा देव तुम्हाला शुद्ध करण्याकरिता, येशूसारखे होण्यासाठी तुमच्या जीवनात परीक्षा पाठवतो व त्यात टिकून राहण्यासाठी त्याच्यावर भरवसा ठेवण्याची कृपा पुरवतो तेव्हा ही कृपेवर कृपा आहे जी तुम्हाला अनंतकालासाठी तयार करत राहते. जसे तुम्ही परीक्षेला तोंड देता तेव्हा तुम्हाला एक भक्कम कणा मिळतो आणि तुम्ही म्हणू शकता. “मी हे पार करू शकेन कारण देव माझ्याबरोबर आहे.”

धीरामुळे अशी व्यक्ती तयार होते की जिला शीलाची शक्ती  आहे आणि देवाशी जवळीक आहे. हे काम दुसऱ्या कशानेही होऊ शकत नाही. संकटामध्ये आपण मध्येच सोडून देऊ नये म्हणून तुम्हाला देवाच्या सामर्थ्याचा व रक्षणाचा अनुभव येतो. जर तुम्ही धीर धरला नाही तर तुम्हाला काय होते बरे? मग तुम्ही देवविरहित जीवन जगू लागता. किती लोक प्रश्न विचारतात, “कुठे आहे देव?” जेव्हा ते यातना सहन करत असतात तेव्हा ते विचारतात, “देवाला खरच फिकीर आहे का?” याहून वाईट प्रश्न म्हणजे “जर देव प्रेमळ आहे तर तो अशा वेदना कशा येऊ देतो?” लोक परीक्षा व संकटामध्ये देवाचा द्वेष करू लागतात व त्याला सोडून देतात. पण जे देवावर भरवसा ठेवतात ते टिकून राहतात आणि शीलवान स्त्री पुरुष बनतात.

ड. शिलाद्वारे आशेचा अनुभव घेणे. (वचन ४)

पुन्हा आपण रोम ५:४ कडे वळू या. ते म्हणते की “शीलाने आशा निर्माण होते;” हे कसे घडते? यामध्ये काय युक्तिवाद आहे? आता यावर विचार करा. शील कसे घडले गेले? शील घडले गेले कारण तुम्ही परीक्षेत टिकून राहिलात. ही प्रक्रिया कशी घडली? जसजसे तुम्ही सहन करत गेलात, जसे तुम्ही परीक्षा व संकटाला तोंड देत होता तेव्हा तुम्ही मध्येच सोडून दिले नाही. तुम्हाला देवाच्या दयेचा व कृपेचा व विश्वासूपणाचा अनुभव आला. देव कसे काम करतो हे तुम्हाला समजू लागले. तुम्हाला समजले की तुमच्या संकट व परीक्षेमध्ये देव या सर्वांच्या वर आहे आणि या सर्व संकटात देव तुम्हाला जीवन जगायला मदत करत आहे. तुम्हाला देवाच्या महान सामर्थ्याचा अनुभव येतो. तुम्हाला समजते की देव समर्थ आहे आणि तो तुमची काळजी घेऊ शकतो. देव इतकी वर्षे जी काही संकटे समस्या तुमच्यावर आल्या त्यामध्ये विश्वासू होता. आणखी एका समस्येने देव थकणार नाही. मग कशाची उभारणी होते? आशेची. जर ते त्याने काल केले आणि आज केले तर उद्या तो का करू शकणार नाही?

तर शीलामुळे आशा निर्माण होते. जसे एखादा व्यक्ती संकटाचा सरळ मुकाबला करते आणि धीर धरणारा संत बनतो तसे तो अधिक स्पष्टपणे भविष्याकडे पाहू शकतो आणि देव आणि त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेऊ शकतो. कोणीतरी म्हटले आहे, “भविष्य हे देवाच्या अभिवचनाइतके उज्ज्वल आहे.”

ख्रिस्ती लोकांना आशेमध्ये राहण्यासाठी बोलावले आहे. ख्रिस्ती आशा ही ‘खात्रीची आशा’ आहे. पण जोपर्यंत एखादी व्यक्ती सर्वात कठीण प्रसंगी धैर्य धरायला शिकत नाही तोपर्यंत ती खात्री बाळगू शकत नाही. पेत्र त्याला ‘जिवंत आशा’ म्हणतो. जीवनाने भरलेली आशा. तुम्ही आणि मी जेव्हा आशेसबंधी बोलतो तेव्हा आपली धारणा असते ‘कदाचित.’ पण तो म्हणतो: ‘खात्रीची हमी.’ अंतिम आशा अशी आहे की एक दिवस आपण येशूला प्रत्यक्ष भेटू आणि त्याच्यासारखे होऊ. ही खरी आशा आहे. कलसै ३:४ त्याला ‘गौरवी आशा’ म्हणते.

आणि ज्याने देवाबरोबर शांतीचा अनुभव घेतला आहे, आपल्या जीवनाच्या परिस्थितीत ज्याला देवाच्या समर्थ सान्निध्याचा अनुभव आला आहे तोच जीवनात धीराने तोंड देईल. अशी व्यक्ती म्हणू शकते; “कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरवसा आहे” (२ तीमथ्य. १:१२). आशा विश्वासी व्यक्तीला कशी मदत करते?

इ. आशेमध्ये देवाच्या प्रीतीचा अनुभव. (वचन ५)

“आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.”

आशा आपल्याला लाजवत नाही. आपल्याला परीक्षेत देवाच्या प्रीतीचा अनुभव येतो. संकटामध्ये  देवाच्या प्रीतीचा आपल्यामध्ये कसा वर्षाव होतो? देवाच्या कृपेद्वारे जसे तुम्ही परीक्षा कवटाळता तसे देवाच्या सान्निध्याचा अनुभव येऊन टिकाव धरायला मदत होते. जसा तुम्ही धीर धरता तसे संकटाला तोंड देण्यासाठी देवाची मदत  तुम्ही अधिकाधिक अनुभवता. त्यामुळे जसे तुमचे शील घडत जाते तसे देवाला तुम्ही अधिक जवळून व गाढ ओळखता. तो खरा आहे हे तुम्हाला समजते. जेव्हा देव तुमच्या जवळ असतो तेव्हा त्याच्या प्रीतीचा अनुभव तुम्हाला येतो. आणि हा अद्भुत अनुभव असतो.

ही त्याची आपल्यासाठी असलेली प्रीती आहे. आपली त्याच्यासाठी नाही! कारण ती देवाची प्रीती आहे. इफिस ३:१४-१९ मध्ये पौल अशी विनंती करतो की, “त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे; ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी; ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून, तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती, हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे; असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.”

  • देवाची प्रीती हा आपल्या आशेचा पाया आहे. त्याच्या प्रीतीने आपले तारण केले. त्याची प्रीती आपले रक्षण करते. त्याची प्रीती आपल्याला अनंतकाळापर्यंत नेत राहणार.
  • ही प्रीती अमाप आहे. आपल्या अंत:करणात ओतली गेलेली ही प्रीती किती आहे? अमाप. तिचा वर्षाव होतच राहतो.
  • ही त्याची देणगी आहे. (त्याने दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे.) हा पवित्र आत्मा आपल्या अंत:करणात या प्रीतीचा वर्षाव करतो. देवाला ‘आबा’ ‘बापा’ म्हणायला मदत करतो.

वेदनांचा धिक्कार करू नका – तुम्ही देवाचे कवटाळणे गमावून बसाल. संकटांना कवटाळा आणि देव

तुम्हाला कवटाळेल. जेव्हा तुम्ही नितांत गरजेत असता तेव्हा तुमच्याकडे ही प्रीती अधिक प्रखरतेने येईल. पवित्र आत्मा विश्वासी व्यक्तीमध्ये राहतो आणि देवाची प्रीती खरी आणि खरी करतो.