Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मार्च 5, 2024 in जीवन प्रकाश

मरणाच्या भीतीवर वधस्तंभ विजय देतो

मरणाच्या भीतीवर वधस्तंभ विजय देतो

टोनी रिंक

मार्टिन लूथर यांनी म्हटले;  “पापी जण उघड्या गर्तेकडे उलटे मागे पळत आहेत. मरणाला तोंड द्यायला त्यांची तयारी नाही पण थेट तिथेच ते पुढे जात आहेत. मरण  प्रयत्नपूर्वक आपल्या दृष्टिच्या आणि मनाच्या आड करायला ते पाहतात आणि तरीही मागच्या दिशेला जात राहतात आणि जे अटळ ते घडतेच. एकाएकी ते खाली कोसळतात.”

आणि तरीही उत्तम शुक्रवारी ख्रिस्ती म्हणून आपण  एकत्र जमतो आणि आपल्या ख्रिस्ती संस्कृतीनुसार मरणाला तोंडोतोंड पाहतो आणि तो छळवादाने झालेला रक्तपात साजरा करतो.

इथे या मरणात आपण केवळ येशूचा आत्मत्याग पाहत नाही तर सैतानाचा जगावर असलेला सत्तेच्या खेळाचा  मास्क ओढून काढतो.

“ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे” (इब्री २:१४-१५).

सैतान आपल्या इच्छेनुसार त्याची तलवार चालवू शकत नाही. त्याच्या हातून घडणारा नाश हा देवाकडून मर्यादित केलेला आहे (इयोब १:१२). तरीही  सैतानाचे सामर्थ्य मरणाच्या भीतीमध्ये अधिक सहजपणे चालवले जाते. सैतान हा क्रूर धनी आहे तो मरणाचे शब्द, लबाड्या, दहशती घालून त्याच्या प्रजेवर  जुलूम करतो व हाताळतो. त्याचे सामर्थ्य तलवारीने सहज चालवले जात नाही तर आपल्या कानात ज्या गोष्टी तो कुजबुजतो त्यामुळे.

सैतान आपल्या कानात स्तोत्र २३च्या विरुद्ध असलेल्या लबाड्या बोलतो. तो म्हणतो, जेव्हा तुम्ही मृत्युदरीच्या काळ्याभिन्न अंधारातून जाल तेव्हा तुम्ही मरणाच्या भयात राहाल. कारण तेथे तुम्ही एकटे असाल आणि तुमचे मार्गदर्शन करायला किंवा सांत्वन करायला कोणीही नसणार.

पण हे खरे आहे का?

हा शुक्रवार खरंच चांगला आहे का?

आपल्यापैकी किती जण दररोज मरणाचा विचार करतात?

सत्य हे आहे की आपण मरणाचा विचार क्वचितच करतो. हा विषय टाळायला आपण काहीही करू.

तरीही मरणाच्या भीतीचे आपण गुलाम आहोत- आयुष्यभराचे गुलाम. ही गुलामी आपल्या जीवनातील सर्वकाही चालवत असते.

मरणाची भीती दाबून टाकण्याकरता आपण किती गोष्टीचा पाठपुरावा करत राहतो? मुद्दा हा आहे की मरणाच्या भीतीने लोक कायमचे गुलाम झाले आहेत असे नाही तर तर ते हजारो प्रकारे ही भीती टाळण्याचा प्रयत्न करतात. ते मरणाचा नकार करण्यासाठी गुलाम आहेत. ते म्हणतात ,  “ चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या मरायचे आहे.” (१ करिंथ १५:३२)

“हा खऱ्या स्वातंत्र्याचा आनंद नाही तर बोथट करणारा नकार आहे. मरण हे महान शत्रू म्हणून आपल्यावर टांगले आहे. आणि आपण त्याच्या नकाराच्या काल्पनिक उड्डाणात त्याचे गुलाम बनतो.” – जॉन पायपर

मरणाच्या आपल्या नकारामध्ये सैतान आपले जीवन व्यर्थ मनोरंजन आणि विचलित करणाऱ्या बाबींकडे वळवून गुंतवतो आणि त्यामध्ये आपली नैतिकता गप्प केली जाते. त्यामुळे कोणताही मुद्दा सुटत नाही. भविष्याविषयीची आपली चिंता आणि काळज्या आणखीच अस्थिर होत जातात आणि आपली खोल असुरक्षितता त्यामुळे आहे तशीच राहते.

“त्यामुळे आपली प्रीतीही गुदमरून जाते. मरणाची भीती आपले जीवन गुलामीत टाकते आणि आपल्याला भित्रे आणि मंद करते – कंटाळवाणे  आणि स्वार्थी बनवते. आपण फक्त आपल्याच भविष्याचा विचार करत राहतो. मरणाची भीती आपल्या कानात कुजबुज करत असताना आपण जे वळण घेतले आहे त्याचा आवाज आपण अधिकच मोठा करतो. आणि तसे करताना आपल्या जीवनाचा त्याग करणे आपल्याला शक्य होत नाही” – जॉन पायपर

अशा दोन प्रकारे मरणाची भीती आपल्या निवडींवर ताबा मिळवण्यासाठी सैतानाचे मोठे शस्त्र,  त्याचे मोठे सामर्थ्य, त्याची मोठी युक्ती बनते. आपल्या जीवनाचा कोणताच भाग मरणाच्या भीतीपासून बचाव करू शकत नाही.

अगदी स्पष्टच मांडायचे म्हटले तर “(देवाशिवाय) मरण हे ह्या जगाचे मोठे नैतिक सामर्थ्य आहे. ते इतर सर्व सामर्थ्यापेक्षा टिकणारे, नमवणारे आहे मग ते सध्या ती सामर्थ्ये कितीही अद्भुत वाटोत.” असे एक नास्तिक म्हणतो. याचा  ईश्वरज्ञानानुसार अर्थ असा निघतो की, खरी मूर्तिपूजा ही सर्व सेवेचा आणि भक्तीचा विषय आहे, सर्व मूर्तिपूजेमागची खरी मूर्ती, सर्व सत्ता व अधिकारावरचे खरे सामर्थ्य – मरण आहे.

हेच आपल्याला इब्री २:१४-१८ मध्ये सांगितले आहे. सैतान, पाप आणि मरण यांची आपली गुलामी एकत्रितपणे तिपदरी सेवा करते. पण मरण हे या सर्वांमागचे नष्ट करणारे सामर्थ्य आहे. सैतानाने चालवलेली भीती ही आपल्याला पापी उपभोग करण्यास प्रवृत्त करते. आपण आपल्या हरवता न येणाऱ्या शत्रूशी, मृत्यूशी त्याद्वारे सामना करत आपण  धडपडत मागे मागे जात कबरीमध्ये कोसळतो.

एक चांगला मनुष्य

आज आपण थांबतो आणि ज्या एका चांगल्या मनुष्याने आपल्यासारखे शरीर घेतले, पण त्याने मृत्युच्या साम्राजाखालची आपली भीती घेतली नाही. आणि त्याला मरणाची भीती नसल्यामुळे व्यर्थ मनोरंजनाच्या गोष्टींनी तो विचलित झाला नाही. आणि स्वत:ला राखण्यासाठी त्याने धडपड केली नाही. मृत्यू हा त्याचा गहरा शत्रू होता पण तो त्याचा शेवट नव्हता.

त्याच्यावर खूप तणाव होता- त्याच्या भाराने त्याच्या शरीरातून रक्ताचा घाम वाहिला- पण मरण त्याला अटकाव करू शकले नाही. मरण त्याला हाताळू शकले नाही. तो काही माघारे उलटा पळत गेला नाही. आपल्यासाठी तो मरणाला सामोरा गेला.

उत्तम शुक्रवार हा एक अद्भुत आणि विचित्र  दिवस आहे कारण त्या दिवशी आपली संस्कृती जे दाबून ठेवायला पाहते त्याचाच आपण उत्सव करतो. आणि तरीही आपलयाला  प्रथम  संधी दिली  आहे की त्याने दाखवलेली प्रीती आपण वधस्तंभाच्या वेदनांमध्ये पहावी आणि त्याद्वारे सैतानाचे मानवजातीवर असलेले सामर्थ्य कसे मोडले गेले हे पहावे.

आज आपण मरण साजरे करतो. जुनी प्रथा म्हणून नाही तर आपण मरणापासून मुक्त झालो आहोत याचा पुरावा म्हणून. जगाच्या जीवनभरच्या गुलामीतून आपण मुक्त झालो आहोत.