Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अगस्त 25, 2020 in जीवन प्रकाश

देव जगात क्लेश , संकटे, आपत्ती का येऊ देतो?                                जॉन मॅकार्थर

देव जगात क्लेश , संकटे, आपत्ती का येऊ देतो? जॉन मॅकार्थर

जॉमॅकार्थर यांच्या संदेशाचा क्रॉसी ऊर्टेकर यांनी केलेला संक्षिप्त अनुवाद.

आपल्या बायबलचा देव पवित्र, चांगला, प्रेमळ, सुज्ञ, सर्वसमर्थ, सर्वज्ञ, कनवाळू, कृपाळू आहे असा आपला विश्वास आहे. यावर  नास्तिक लोक आक्षेप घेऊन म्हणतात, देव जर असा आहे तर मग तो अधर्म, आपत्ती, संकटे, क्लेश ही का चालू देतो? याचाच अर्थ असा देव अस्तित्वात असूच शकत नाही. चांगला देव असे करूच शकत नाही.

उदारमतवादी म्हणतात, आदाम हव्वाच याला जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच हे अधर्म व आपत्ती ही सुरू झाली. ते जर अशी निवड करणार होते तर मग देवाने त्यांना का निर्माण केले? शेवटी देवच या परिस्थितीला जबाबदार आहे. त्याने दूत निर्माण केले. त्यांच्या पतनामुळे सैतान निर्माण झाला. तो या अधर्मांना कारण होणार होता तर मग देवाने दूत तरी का निर्माण केले? देवच या परिस्थितीला कारण आहे. ईश्वरविज्ञानाचे निर्मिती, देवाचा उद्देश, देवाचा

स्वभाव असे अगर अनेक बहुविध प्रश्न अखेर देवाजवळच थांबतात. म्हणून आपण काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ.


१.
अधर्म अस्तित्त्वात आहे

हे तुम्हाला मान्य आहे का? सर्वांनाच मान्य आहे. एवढेच नव्हे तर त्याचे या जगावर वर्चस्व आहे. इतके की हा ग्रह वास्तव्यासाठी धोकादायक झाला आहे. निर्मितीच्या पतनाच्या अवस्थेचे दुष्परिणाम भयानक नैसर्गिक आपत्ती, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, रोगराई, नवनवीन जंतूंच्या प्रादुर्भावामुळे प्राणघातक महामाऱ्या यातून स्पष्ट दिसतात. प्राण्यांमुळे आलेल्या अनेक जंतूंमुळे, बॅक्टेरियांमुळे लक्षावधी मनुष्ये मरण पावली आहेत. या आपत्ती तात्पुरत्या येतात. पण यांच्या परिणामांमुळे सर्व सृष्टी रडत व कण्हत आहे (रोम ८:२२). त्यात ग्लोबल वॉर्मिंगची समस्या बिकट होताना दिसते. पेत्र त्याविषयी इशारा करतो की ही पृथ्वी शेवटी अग्नीने नाश पावणार आहे. हा ग्रह मानवाच्या वास्तव्यासाठी धोकादायक आहे.

व्यक्तिगत अनैतिकतेने संपूर्ण मानवजात ग्रासून टाकली आहे. अनैतिकतेचे प्रत्येक व्यक्तीवर वर्चस्व आहे. त्यांच्यामधील वासना पापाला व मरणाला जन्म देते. स्वभावत:च हा अधर्म मानवात कार्यरत असतो. नीतिमान कोणी नाही एक देखील नाही. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय सर्व स्तरांवर आत्मिक पातळी अधर्माने भ्रष्ट आहे. अंधाराच्या सत्तेची अनैतिकता अस्तित्त्वात आहे. सर्व जग सैतान व त्याचे दूत यांच्या अधिपत्याखाली

(इफिस ६:१२) आहे. त्यामुळे आत्मिक दृष्ट्याही मानव भ्रष्ट आहे. ते मानवाची कल्पनाशक्ती भ्रष्ट करतात. याच सैतानी शक्तीने येशूला वधस्तंभी जाईपर्यंत त्याला थोपवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याची भरपूर कसोटी घेतली. मानवाचे जीवन खिन्न कष्टमय करायचा तो प्रयत्न करतो. ईयोब, पौल व पेत्र त्याचे उदाहरण म्हणून आपल्यासमोर आहेत. शिवाय हा सैतान मानवाला अनेक  दैवते मानायला उद्युक्त करून खऱ्या एकमेव देवापासून दूर करतो आणि प्राधान्ये बदलून अनेक प्रकारच्या मूर्तींना देवाचे स्थान देण्यात त्याला अडकवून ठेवतो. देव, त्याचे हेतू, त्याची योजना यावर ही शक्ती हल्ला करत असते. जगाच्या चुकीच्या भक्तीवर तिचे वर्चस्व आहे. लैंगिक पापे बोकाळली आहेत. ती भयंकर परिणाम करणारी मानली जात नसून ती कुरवाळली जातात. या अधर्माची व्याप्ती सार्वकालिक अग्निसरोवरापर्यंत आहे. हा अधर्म आपल्या ठायी आहे, आपल्या बाहेर आहे, आपल्या भोवती आहे, आणि आपल्याला तो दृश्य आहे, अदृश्य आहे, एवढेच नव्हे तर तो नियंत्रणाबाहेर आहे.

 

२. देव अस्तित्वात आहे.

बायबलचा देव स्वत:चे प्रकटीकरण करून दावा करतो की तो एकच, खरा, निर्माणकर्ता, सार्वभौम, सर्वज्ञ, त्र्येक देव आहे. तो सर्वावर नियंत्रक आहे. तोच प्राण देणारा, घेणारा आहे. तोच संपूर्ण विश्व चालवतो. जतन करतो. इतिहासावर नियंत्रण ठेवणारा तो आहे. हे सर्व दावे तपशीलवार तो यशया, अनुवाद, उत्पत्ती, निर्गम, लेवीय, स्तोत्रे, विलापगीत इत्यादि पुस्तकांमधून स्पष्टपणे करतो. त्याच्या पावित्र्यापुढे पाप उभे राहू शकत नाही, त्यामुळे जलप्रलयाची जागतिक आपत्तीही त्यानेच पाठवली व पाप खपवून घेत नसल्याचे दाखवून दिले. त्याला योग्य दिसेल ते तो करतो. तो बोलतो तसे करतोच. आणि आपण जे करणार ते आधीच सांगतो. आपण त्याचे ऐकले नाही तर होणारे परिणामही आधीच सांगतो. गर्विष्ठांचे तो काय करतो याची व संकटे, क्लेश, आपत्तींची पूर्ण जबाबदारी तो स्वीकारतो.

 

३.अधर्माचे अस्तित्व असावे अशी देवाची इच्छा आहे (यशया ४५: ५-१२ ; १८-१९;२१-२४वाचा.)

मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्यावेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्यावेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही. प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व  उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. यशया (४५:५-७).
अधर्माच्या अस्तित्वाची जबाबदारी देव स्वीकारतो. तर मानव वरील वचनात देवाने व्यक्त केलेल्या त्याच्या सामर्थ्याला मर्यादा घालू पाहातो. त्यांना वाटते देव अधर्माला मर्यादा घालू शकत नाही. त्याला ते सामर्थ्य नाही किंवा ते मर्यादित आहे. तो अधर्म थोपवू शकत नाही. पण हे लक्षात घ्या की त्याने मुळात अधर्म सुरूच केलेला नाही. लोक चुकीचा समज करून घेतात की देव पुढे काय होणार हे जाणू शकत नाही.

आपण देवाची न्यायपद्धत व अधर्म हे कसे समजून घ्यावे?

याचे उत्तर देवाचे वचन व येशू ख्रिस्त यांच्यातच सापडते. जसे बरे तसे वाईटही अस्तित्वात आहे. अधर्म हे देवाविरुद्धचे बंड आहे. मग लोक प्रश्न करतील, देवाने माणसाला स्वतंत्र इच्छा का दिली? म्हणजे बऱ्या वाईटातून योग्य निवड करण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. तर कोणी म्हणतात, मला स्वतंत्र इच्छा देवाने दिली याचा अर्थ मी अधर्म करायला मोकळा आहे. देवाने अधर्म करायची क्षमता दिली नाही पण सर्वज्ञ देवाने अधर्माच्या अस्तित्वाला  परवानगी दिली. कारण जे काही घडते ते त्याच्या नियंत्रणाखाली घडते. पापाचा उगम मानवाच्या स्वतंत्र इच्छेतूनच होतो. पण तुमच्या पापाचा जेव्हा अंत होतो तेव्हा तुम्ही प्रभूपुढे स्तवन करत येता. म्हणून देवाने अधर्म त्याच्या गौरवासाठी राहू दिला आहे. अधर्माच्या कमी जास्त अस्तित्वाप्रमाणे देवाचे गौरव होत असते.

अधर्माची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळेच देव व्यापकतेने गौरवला जातो, कारण तो पापावर, अधर्मावर विजय मिळवतो. आमच्या अनीतिमुळे देवाचे नीतिमत्त्व स्थापित होते ( रोम ३:५). आपली अनीती, आपला अधर्म,

आपली पतनाची अवस्था यामुळे आपल्या निष्कलंक, निर्दोष पुत्राला देव शिक्षा करतो तेव्हा देवाचा क्रोध

शमवला जाऊन समाधान पावलेल्या देवाची नीतिमत्ता स्थापली जाते. यहुद्यांना देवाची नीतिमत्ता कळत नव्हती.

ते स्वत:ची नीतिमत्ता स्थापित करू पाहात होते. देवाला संतुष्ट करायला ते आपलीच धार्मिकता मिरवत होते

(रोम १०:३). देवाला तर आपली नीतिमत्ता प्रदर्शित करायला पापाला म्हणजे अधर्माला शासन करावे लागले.

येशू वधस्तंभावर असताना तीन तास पडलेल्या अंधारात अवाक्षरही बोलला नाही. अंधार हे देवाचे प्रकट

होण्याचे, त्याच्या अस्तित्वाचे चिन्ह आहे. त्या अंधारात देवाने आपल्या ‘पाप’ लादलेल्या पुत्राला त्या

पापासाठी अमर्याद शासन केले. शासन संपल्यावर पिता निघून गेल्यावर येशूने मोठ्याने पोटतिडकीची आरोळी मारली, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास ?” त्यावेळी देवाची नीतिमत्ता प्रकट होत होती.

येशूचा पापासाठी त्याग होत असता अधर्मातून सुटणाऱ्या मानवाचा स्वीकार होणार होता. त्यामुळे देवाची

नीतिमत्ता त्या पाप्यामध्ये प्रदर्शित होणार होती. देव जर त्याचा क्रोध व दया प्रदर्शित करत असेल (रोम ३:५)

तर ती प्रदर्शित करायचा त्याला अधिकार आहे ( रोम ९:२२-२४).

० प्रकटी १५ मध्ये देवाचा क्रोध संपल्यावर स्वर्गात मोशेचे गीत व कोकऱ्याचे गीत गाईले जाते. त्यात देवाचे गुणगौरव केले आहे. ते गीत वाचा. देव आपले नीतिमत्व स्थापतो तेव्हा ती गोष्ट स्वर्गीय आशीर्वादाचा अर्क असते. ख्रिस्ताचा वधस्तंभ हा महाअधर्माचे कळसाचे प्रदर्शन आहे. हे सर्व देवाच्या पूर्वज्ञानाच्या संकल्पाप्रमाणे झाले. देवाचे नीतिमत्त्व स्थापण्यासाठी त्याने आखलेल्या योजनेप्रमाणे झाले.

० ईयोब देवाला अनेकदा विचारतो देवाने माझ्यावर आपत्तीमागे आपत्ती पाठवून माझी ही दुर्दशा केली ती का?

देव ईयोब ३८ मध्ये त्याला उलट प्रश्न करतो, “अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधार पाडणारा कोण?” ईयोबा, तूच सांग. यापेक्षा अधिक चांगलं मी काय करावं? पुढे देव त्याला एवढे प्रश्न करतो की त्याची जीभच बंद होते.

निसर्ग, देव, प्राणी, देवाचा संकल्प अशा अनेक विषयांवर प्रश्न करतो. अशा मूर्ख प्रश्नांची मी तुला उत्तरे द्यायची ?

ईयोब ४२ व्या अध्यायात म्हणतो, “तू सर्व काही करू शकतो…तुझ्या दिव्य संकेतावर अंधार पाडणारा मी कोण?

जे मला समजत नाही… जे माझ्या आटोक्याबाहेरचे ते मी बोललो; प्रश्न केले. मी माघार घेऊन धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.”

आपण देवाला असाच प्रतिसाद देऊ या. हा असा आहे आमचा देव. देव असाच चांगला असावा हे बरे.

चला आपण त्याची स्तुती करू. अधर्माच्या नियंत्रणाखाली असलेले जग आम्हाला नको आहे (रोम ८: ३७-३९). अधर्म, क्लेश, आपत्ती संकटे ही ज्याच्या नियंत्रणाखाली आहेत, तो आमचा बायबमधला देव आहे.