Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 7, 2023 in जीवन प्रकाश

विश्वाचे सर्वात मोठे दोन प्रश्न

विश्वाचे सर्वात मोठे दोन प्रश्न

जॉन पायपर

१ पेत्र २:११-१२ या दोन वचनांमध्ये या विश्वामध्ये तोंड द्यावे लागणाऱ्या सर्वांत मोठ्या दोन प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पेत्र लिहितो:


“प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.”


ह्या दोन वचनांमध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या समस्या मांडलेल्या आहेत.

खरं तर मी म्हणेन की ह्या विश्वाच्या सर्वात मोठ्या समस्या आहेत. ह्या दोन समस्या बायबलमध्ये सर्वत्र पुन्हा पुन्हा हाताळल्या आहेत. आणि वचन ११ मध्ये म्हटल्याप्रमाणे आपण या जगात प्रवासी व परदेशी आहोत हे आपल्याला समजते कारण बहुतेक सर्व जगच या समस्या महत्त्वाच्या आहेत असे मानत नाही. जर जगाने तसे मानले असते तर आपली वर्तमानपत्रे बदलली असती, टेलीव्हिजन वेगळे दिसले असते, रेडीओवर तुम्ही वेगळेच ऐकले असते, विश्वविद्यालयातले वर्ग वेगळेच बोलले असते, जाहिराती बदलल्या असत्या, बिझनेस निराळे झाले असते. पण सर्वसाधारणपणे बायबल हाताळते त्या या जगातील मुख्य समस्या, जगासाठी समस्याच नाहीत. यामुळे जे आपण देवाच्या वचनातून आपली दिशा शोधतो त्या आपल्याला ते प्रवासी व परदेशी करून टाकते.


ह्या दोन समस्या आहेत : मानवी जिवाचे तारण आणि देवाच्या नावाचा गौरव. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर बायबल नुसार या जगात दोन मुख्य समस्या आहेत: आपल्या जिवाचा नाश होऊ नये म्हणून तो कसा तारला जाईल ? आणि तुम्ही देव क्षुद्र मानला जाऊ नये म्हणून त्याचा गौरव कसा कराल? या दोन वचनांमध्ये या दोन महान समस्या मांडलेल्या आहेत.

जिवाचे तारण


“प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा” (१ पेत्र २:११).  इथे समस्या अशी आहे की जिवात्म्याशी इतके युद्ध केले जाईल की तो मरून जाईल. या जगामध्ये जिवात्म्याविरुद्ध शक्ती आहेत. बहुतेक जग आपल्या जिवाचा विचारही करत नाही. पण हे वचन सांगते की एक युद्ध सुरू आहे आणि जगातल्या इच्छा/ दैहिक वासना हे युद्ध करत आहेत. आणि त्या माझ्या जिवाचा नाश करायला पाहत आहेत. जर या जिवात्म्याविरुद्ध असलेल्या शक्तींचा जय झाला तर माझा जीव गमावला जाईल. आणि जर माझा जीव गमावला तर सर्वच गमावले. ते पुन्हा कधीही मिळणे शक्य नाही.


येशूने काय म्हटले त्याची आठवण आहे ना? “कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल” (मार्क ८:३६,३७)?

याचा अर्थ जर जीव गमावला तर यापुढे बोलाचाली करता येणार नाहीत. जर जीव गमावला तर तो पुन्हा विकत घेता येणार नाही – तो गेला. जर जिवात्म्या विरुद्धच्या शक्ती जिंकल्या, तर त्यांचा जय झाला. सर्व संपले. येशूने लूक १६ मध्ये हेच म्हटले. तो श्रीमंत माणूस व लाझारस यांच्याबद्दल बोलत होता. श्रीमंत माणूस मृतलोकात गेला व लाझारस अब्राहामाच्या उराशी गेला. आणि त्यांना काही क्षणांसाठी  एकमेकांना पाहण्याची व बोलण्याची मुभा देण्यात आली. मृतलोकातला माणूस म्हणाला, “हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.”  आणि अब्राहाम म्हणाला, “जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे.” (लूक १६:१९-३१ वाचा).


सर्व संपले आहे. हे भयानक सत्य आहे. हे सत्य प्रत्येकाशी अनंतकाळासाठी सबंधित आहे. आणि हे स्वर्ग आणि नरक यांच्या संबंधात असल्याने प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि तरीही आपल्या जिवासाठी कसे लढावे यासंबंधात  वर्तमानपत्रात एकही रकाना लिहिला जात नाही, रेडीओवर मदतीची घोषणा केली जात नाही, टीव्ही वर एक अक्षरही उच्चारले जात नाही. शाळा कॉलेजात असा अभ्यासक्रम नाही, तुमच्या कल्याणासाठी इशारा देणारे पत्रक लिहिले जात नाही.


आपला जीव ज्या सर्वात मोठ्या समस्येला तोंड देतो ती जगासाठी समस्याच नाही. त्यामुळेच आपण या जगात परके आणि प्रवासी आहोत. जगाची यंत्रणा आपल्याला एड्सचा कसा मुकाबला करायचा, डासांवर कशी मात करायची, उष्माघात, परागांची अलर्जी, निराशा , बलात्कार, आग, चोरी, कोलेस्ट्रोल, इ. सर्वांचा मुकाबला कसा करायचा हे शिकवते. पण आपल्या जिवासाठी कसे लढायचे हे ते शिकवत नाही. आपले जग हे अशा क्षुल्लक गोष्टींसाठी उत्कटतेने समर्पित आहे. पण एक दिवस येईल आणि हे असे राहणार नाही. जगाचे डोळे उघडतील. आणि तेव्हा आपण ज्या गोष्टी विसरलो त्या इतक्या स्पष्ट दिसतील की जग आपण असे का जगलो हे स्पष्ट करू शकणार नाही. मानवी जिवाची  अनंतकालिक अवस्था ही समस्याच नाही हे गूढ ते स्पष्ट करू शकणार नाहीत. आपल्या न्यायाधीशासमोर जेव्हा आपण उभे राहू तेव्हा आपले मन गोंधळून जाईल.
आपण परके आहोत.

तर ही पहिली महान समस्या आहे. “मनुष्याच्या जिवात्म्याचे सर्वकाळासाठी नाश न होता त्यापासून तो कसा वाचवला जाईल?

देवाचा गौरव


आता दुसरी महान समस्या. “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा” (१ पेत्र २:१२). पहिली समस्या जीव गमावला जाईल. दुसरी समस्या देवाला तुच्छ कसे लेखले जाणार नाही. किंवा होकारार्थी लिहायचे असल्यास : देवाचा गौरव कसा होईल?

जिवाचे तारण आणि देवाचा गौरव ह्या विश्वाच्या सर्वात मोठ्या समस्या आहेत. आणि आज जगाच्या बहुतेक लोकांसाठी या समस्याच नाहीत. हा शास्त्रभाग म्हणतो, “मानवी वर्तनाचे उद्दिष्ट हे देवाचा गौरव हेच असले पाहिजे.” हे विधान तुमच्या जीवनाची उलथापालथ करणारे नाही का? तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री बिछान्यावर पडेपर्यंत देवाकडे लक्ष वेधून घेणे हाच तुमच्या वर्तनाचा विषय असायला हवा. हाच मानवी जीवनाचा अर्थ आहे. आपल्या जीवनात आपण शक्य तितके आपल्याकडे असलेले आपले लक्ष काढून ते देवाकडे लावायला हवे यातच आपल्या जीवनाचा अर्थ आहे. मानवी जीवनाचा हाच अर्थ असावा अशी देवाची इच्छा आहे.


ही मी आखलेली कल्पना नाही. ती या वचनात आहे. “ परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा”  (१ पेत्र २:१२). असे जगा, आचरण करा, वागा, अशा विचाराने वर्तन करा की, इतरांचे देवाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मी कसे जगावे? जर आपण देवाच्या गौरवासाठी जगत नसलो तर आपण देवाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्कृतीचेच पडसाद ऐकवतो. आपण ह्या जगात इतके चपखल बसतो की, आपण कुणाचेच लक्ष  ह्या जगातून बाजूला करून देवाकडे लावू शकत नाही. 


आपल्याला साधेपणाचे जीवन जगण्याची भीती वाटते. साधे कपडे घालणे, चारचाकी नसणे, आधुनिक राहणीमान नसणे, मेकअप नसणे इ. बाबींची. आपण या जगात इतके मिसळून गेलो आहोत की, आता कोणीच म्हणत नाही, “वा! देवाकडे पाहा.” आणि ही आज आपल्या मंडळीची स्थिती आहे.